Sanjay Raut – आडवाणींपासून महाराष्ट्रात माधव भंडारींपर्यंत भाजपची जुनी माणसे अडगळीत गेली. काल आलेल्या अशोक चव्हाणांना शुद्ध करून राज्यसभेवर घेतले. ‘राम लहर’ ओसरल्याचा हा सर्वांत मोठा पुरावा.
भाजपच्या जुन्या-निष्ठावान कार्यकर्त्यांची अवस्था ही राम नाम सत्य आहे! अशी झाली आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी पक्षाच्या मुखपत्रातून पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश म्हणजे मोदी-शहा-फडणवीसांच्या पराभवाची सुरुवात आहे. चारशे पारचा नारा झूठा आहे व ‘राम लहर’ वगैरे काहीच उरली नसल्याचा हा पुरावा आहे.
‘आदर्श’ कारगिल घोटाळय़ावर मोदींपासून फडणवीसांपर्यंत चव्हाणांवर जोरदार हल्ले केले. शहिदांचा अपमान झाल्याची ओरड केली . त्याच चव्हाणांच्या स्वागतासाठी फडणवीसांनी भाजप कार्यालयात सतरंजी अंथरली, असेही राऊतांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाण हे महाविकास आघाडीच्या बैठकांत या काळात उपस्थित राहिले. लोकसभेच्या जागावाटपांच्या चर्चांत ते सहभागी झाले. काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी ते बैठकांत भांडत होते.
आम्हाला आमचा पक्ष टिकवू द्या, अशी त्यांची भूमिका होती. वंचित बहुजन आघाडीमुळे २०१९ च्या निवडणुकीत आपला पराभव झाला. त्यामुळे या वेळी वंचितला सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे,
असे त्यांनी बैठकीत वारंवार सांगितले पण त्यांच्या मनात वेगळेच काही चालले होते. त्या राजकीय व्यभिचाराची कल्पना त्यांनी कुणालाच येऊ दिली नाही, असेही भाष्य राऊत यांनी केले आहे.