Sanjay Raut । लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा निर्णय अजूनही होत नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबच्या (ठाकरे गट) युतीवर मोठं विधान केलं होतं. त्यांच्या याच विधानावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. युती संपुष्टात आल्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्णय हा एकतर्फी आहे, असे राऊत म्हणालेत.
त्यावेळी लोकसभेचा विचार नव्हता Sanjay Raut ।
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी, “प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीबरोबर शिवसेनेची (ठाकरे गट) युती झाली. त्याला दीड वर्षे होऊन गेले. ही युती अत्यंत चांगल्या हेतूने झाली होती. ही युती करताना विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र काम करता येईल असे ठरले होते. लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) त्यावेळी विचार करण्यात आला नव्हता, असे राऊतांनी सांगितले.
तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आंबेडकर भवनात जाऊन प्रकाश आंबेडकर सोबत असताना या युतीची घोषणा करण्यात आली होती. या युतीमुळे महाराष्ट्रात चैतन्याची लाट उसळली होती. ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं खूप जुनं आहे. ही युती करताना राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करावं, अशी भूमिका होती. या दोन्ही नेत्यांत उत्तम चर्चा, उत्तम संवाद झाला होता, अशी माहिती देखील राऊत यांनी दिली.
आमचा चार जागांचा प्रस्ताव अजूनही कायम Sanjay Raut ।
प्रकाश आंबेडकर यांनी ही युती तुटल्याची एकतर्फी घोषणा केली. हे दुर्दैव आहे. अगोदर दोन नेत्यांत चर्चा होणं गरजेचं होतं. युती करताना चर्चा झाली होती, तर मग दूर होतानाही चर्चा होणं गरजेचं होतं. ते राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं. मात्र हे दुर्दैवाने झालं नाही. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. आम्ही लोकसभा निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव अजूनही कायम आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.