माधव विद्वांस
“श्यामची आई’चे लेखक, थोर साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते साने गुरुजी यांची आज जयंती. त्यांचा जन्म दापोली जवळील पालगड येथे 24 डिसेंबर 1899 रोजी झाला.साने गुरुजींच्या आईचा त्यांच्या जीवनावर प्रभाव होता. त्यांचे वडील गावाचे खोत होते; पण काही कारणाने त्यांचे वैभव लयाला गेले त्यामुळे गुरुजींचे बालपण खूप खडतर गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पालगड या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी मामांकडे राहण्यासाठी त्यांना पुण्यात पाठविण्यात आले. तथापि, त्यांना पुण्यात मुक्काम करणे आवडले नाही आणि पालगडहून सहा मैलांवर दापोली येथील मिशनरी शाळेत राहण्यासाठी परत आले. दापोली येथील शाळेत असताना कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली आणि शिक्षण सुरू ठेवणे अवघड झाले.
त्यांनी पुढे शिकण्याबद्दल घरातून फारसा प्रतिसाद नव्हता त्यामुळे ते परत पुण्यास आले व नूतन मराठी विद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी पुढील शिक्षणासाठी न्यू पूना महाविद्यालयात (आताचे सर परशुरामभाऊ कॉलेज) मध्ये प्रवेश घेतला.तेथे त्यांनी बी.ए.आणि मराठी आणि संस्कृत साहित्यात एम.ए. या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी वसतिगृह वॉर्डन म्हणूनही काम केले.
वर्ष 1930 मध्ये महात्मा गांधींनी “दांडी मार्च’ सुरू केल्यावर साने गुरुजी यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्यासाठी शालेय नोकरीचा राजीनामा दिला. स्वातंत्र्य लढ्यात साने गुरुजी वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी झाले म्हणून आठ वेळा त्यांना अटक करण्यात आली आणि धुळे, त्रिचिनापल्ली, नाशिक, येरवडा आणि जळगाव येथील तुरुंगात एकूण सहा वर्षे सात महिने त्यांनी तुरुंगवास भोगला. त्यांना त्रिचिनापल्ली तुरुंगात ठेवले होते त्यावेळी तेथे त्यांनी तमिळ आणि बंगाली भाषा शिकल्या. त्यांनी तिरुवल्लुवर यांनी केलेल्या साहित्याचे मराठीत भाषांतर केले. त्यांनी भारतीय भाषा शिकण्याचे महत्त्व ओळखले आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या समस्येच्या संदर्भात आंतरभारती आंदोलन सुरू केले.
अस्पृश्यतेच्या विषयावर जनजागृती करण्यासाठी साने गुरुजींनी सुमारे चार महिने महाराष्ट्रभर दौरा केला. अस्पृश्यांसाठी विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी पंढरपूर येथे मोठे आंदोलन केले. त्यासाठी त्यांनी उपोषणही केले त्यानंतर विठ्ठल मंदिराचे दरवाजे अस्पृश्यांसाठी उघडण्यात आले. नागरी अवज्ञा चळवळीत काम केल्याबद्दल धुळे कारागृहात त्यांना पंधरा महिन्यांहून अधिक काळ तुरुंगवास भोगावा लागला. त्यावेळी तुरुंगात विनोबा भावे होते.विनोबा भावे यांनी प्रत्येक रविवारी सकाळी भगवद्गीतेवर व्याख्यान देत असत. याच भाषणांचे “गीताई’ नावाने पुस्तक प्रसिद्ध झाले.
त्यांचे प्रसिद्ध “शामची आई’ हे पुस्तकही याच कालावधीत लिहिले गेले. या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. ज्या नीतिमूल्यासाठी ब्रह्मचर्य स्वीकारून त्यांनी कार्य केले त्यास स्वातंत्र्योत्तर काळातही सामाजिक परिस्थितीत फारसा बदल होत नव्हता हे पाहून त्यांना नैराश्य आले व त्यांनी आपले जीवन 11 जून 1950
रोजी संपविले.