नवी दिल्ली – दिल्ली सेवा विधेयकावर कॉंग्रेस पक्षाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता व सभागृहातही कॉंग्रेसने केजरीवालांच्या आप पक्षाला अनुकूल अशीच भूमिका घेतली होती. मात्र कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना पक्षाच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका मांडली आहे. केजरीवाल प्रत्येक लहान सहान गोष्टींवर केंद्र सरकारशी भांडले नसते तर सरकारने हे विधेयक आणलेही नसते अशी टिप्पणी वजा सल्ला संदीप दीक्षित यांनी दिला आहे.
दीक्षित म्हणाले की एक काळ होता तेंव्हा केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्यात परस्पर सामंजस्य आणि सहकार्य असायचे आणि दिल्ली सरकार सुरळीतपणे काम करायचे. त्यावेळी सगळे ठिकठाक सुरू होते.
दुर्दैवाने 2014 मध्ये दिल्लीत केजरीवाल यांचे सरकार आले आणि त्यांनी केंद्र सरकारशी भांडण सुरू केले. या भांडणात त्यांना लोकांच्या भल्याचाच विसर पडला. त्यांच्या या वागण्यामुळेच केंद्राला हे सेवा विधेयक आणावे लागले. अन्यथा हे विधेयक आणले गेले नसते.
केजरीवाल यांनी दिल्लीत काम करण्यापेक्षा राजकारणाला जास्त महत्व दिले. आतातरी केजरीवाल दिल्लीवासीयांसाठी काम करण्याला प्राधान्य देतील अशी अपेक्षा होती, मात्र अजूनही केजरीवाल दिल्लीच्या जनतेला मूर्ख बनवण्याचे काम करत आहेत.