कर्जत : तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सीना नदीवरील आता 6 बंधारे बांधण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा प्रमाणात फायदा होणार आहे. कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांनी पाठपुरावा करून सीना नदीवरील 10 पैकी 6 बंधाऱ्यांना मंजुरी मिळवली आहे, तसेच उर्वरित 4 बंधारे म्हणजेच निमगाव गांगर्डा, निमगाव डाकू, दिघी व चौंडी यांचेदेखील गेट दुरुस्ती काम प्रस्तावित असून, त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आ. रोहित पवार यांनी राज्याचे तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून सर्व्हेसाठी परवानगी मिळवली होती. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर आता 10 पैकी 6 बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून आ. पवार यांनी उर्वरित 4 बंधाऱ्यांनाही मंजुरी द्यावी, अशी विनंती केली आहे. जेणेकरून पाणी गळती थांबवता येईल.
सीना लाभक्षेत्रात असलेले रातंजन, घुमरी, नागलवाडी, नागापूर, सीतपूर, तरडगाव या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रूपांतर लातूर पद्धतीच्या बॅरेजमध्ये होणार असून, याचा सीना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मार्च-एप्रिलदरम्यान कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने पाणी राहत नव्हते. ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी कमी पडत असे. परंतु आता लातूर पद्धतीचे बॅरेज बंधारे होत असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या शिवाय 2 हजार 880 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राला याचा कायमस्वरूपी फायदा होणार आहे.
या संदर्भात आ. रोहित पवार यांनी विधानसभेतदेखील प्रश्न उपस्थित केला होता. कोल्हापूर पद्धतीच्या बॅरेज बंधाऱ्यांनी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात लातूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात यावेत, अशी विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन सरकारनेदेखील लगेच संपूर्ण महाराष्ट्रात लातूर पद्धतीचे बॅरेज करावेत, असे आदेश दिले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण बंधाऱ्यांच्या सर्व्हेसाठी परवानगी मिळवली होती. तो सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर ते बंधारे होण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अनेकवेळा पाठपुरावा केला होता. तसेच अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर 10 पैकी 6 बंधाऱ्यांना परवानगी मिळाली आहे. उर्वरित चार बंधाऱ्यांनाही परवानगी मिळावी, जेणेकरून पाणी गळती थांबवता येईल, यासाठी पाठपुरावा करत आहे.
– आ. रोहित पवार, कर्जत-जामखेड विधानसभा