Samruddhi Highway Accident – समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) डिसेंबर 2022मध्ये उद्घाटन झाले, तेव्हापासून मागील नऊ महिन्यांत चारशे-साडेचारशे छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यातील बळींची संख्या दीडशेपेक्षा जास्त आहे.
सरकार मात्र फक्त शोक आणि आर्थिक मदतीचे आकडे जाहीर करणे एवढेच करीत आहे. हा “मृत्यू महामार्ग’ का बनला आहे, राज्याची समृद्धी होण्याऐवजी अपघातांची “समृद्धी’ का होत आहे, याचा आता तरी गांभीर्याने शोध घ्या, असा सल्ला ठाकरे गटाने (thakrey group) सरकारला दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गावर रविवारी झालेलया अपघातात 12 प्रवाशांचे बळी गेले. हा समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) प्रवाशांची सोय व्हावी म्हणून बनवला की लोकांना असे निर्घृण मरण यावे म्हणून बनवला?
असा एकही दिवस जात नाही की समृद्धी महामार्गावर अपघात घडला नाही अशी बातमी येत नाही, असे सवाल ठाकरे गटाच्या (thakrey group) वृत्तपत्रातील अग्रलेखातून करण्यात आले आहेत. हा अपघात पुढे धावणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने मागे असलेली टेम्पो ट्रॅव्हलर त्यावर जोरात धडकली, असे सांगण्यात येत आहे.
असेही सांगितले गेले की, या ट्रकचा पाठलाग आरटीओची गाडी करीत होती. त्यातून ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारला आणि हा अपघात झाला. हे जर खरे असेल तर ट्रकचा पाठलाग का होत होता? या प्रश्नाचे उत्तरही सरकारने दिले पाहिजे.
सरकारने जरूर शोक व्यक्त करावा, पण ट्रक आणि आरटीओ पाठलाग हे कोडेही जनतेला सोडवून सांगावे, असे थेट आवाहन ठाकरे गटाने दिले आहे. हा पाठलाग असेल अथवा नसेल, पण समृद्धी महामार्गावरील प्रवाशांचा पाठलाग “यमदूत’ मात्र नक्कीच करीत आहे.
गेल्या वर्षभरात या महामार्गावर झालेले अपघात आणि दुर्घटना, त्यातील बळींची मोठी संख्या हेच सिद्ध करते. समृद्धी महामार्गावरील प्रवास म्हणजे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार ठरत आहे, असे त्यात नमूद केले आहे.