मुंबई – युद्धामुळे जागतिक पातळीवर नकारात्मक वातावरण असतानाच परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेत असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी कमी पातळीवर बंद झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 617 अंकांनी कमी होऊन 56,579 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 218 अंकांनी म्हणजे 1.27 टक्क्यांनी कमी होऊन 16,953 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समध्ये महत्त्वाच्या असलेल्या टाटा स्टील, टेक महिंद्रा, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन ऍण्ड टुब्रो, सनफार्मा या कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही.एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बॅंक, मारुती सुझुकी, भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. हॉंग कॉंग, दक्षिण कोरिया, जपान, चीनमधील शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले होते. युरोपीयन शेअर बाजारातही विक्री चालूच आहे.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री
अमेरिकेमध्ये अगोदरच पाव टक्के व्याजदर वाढ झाली आहे. आगामी एक वर्षांमध्ये आणखी एक ते दीड टक्का व्याजदर वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे भारतातून परदेशी गुंतवणूक परत जात आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 2461 कोटी रुपयांच शेअरची विक्री केली. ही गुंतवणूक टिकऊन ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
6.47 लाख कोटींचे नुकसान
शुक्रवारी आणि सोमवारी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सव्वा दोन टक्क्यांनी कोसळल्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य दाने दिवसात 6.47 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. आता शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य 265 लाख कोटी रुपये असल्याचे दिसून येते. रशिया- युक्रेन युद्ध आणि कच्चे तेल महाग होत असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत असल्याचे सांगण्यात येते.