मुंबई – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते शेलू बाजार, वाशिम, असा 210 किमीच्या मार्गाचे 2 मे रोजी होणारा उद्घाटन सोहळा अखेर रद्द करण्यात आला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे, अश माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, एमएसआरडीसीकडून नागपूर ते शेलू बाजार अशा 210 किमीच्या मार्गासाठी मुहूर्त ठरविण्यात आला होता. त्यानुसार यासाठीची जय्यत तयारी सुरू होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार होते. मात्र आता अचानक हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
नागपूरपासून 15 किमीवर समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी बांधण्यात येत असलेल्या ओव्हरपासचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या कामादरम्यान ओव्हरपासला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता नव्याने या ओव्हरपासचे काम करावे लागणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच 210 किमीचा महामार्ग सुरू करणे शक्य होणार आहे. त्यामुळे 2 मे चा कार्यक्र रद्द करण्यात आल्याची माहिती मोपलवार यांनी दिली.