पिंपरी – करोना प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाऊनचा सर्वच घटकांना फटका बसला आहे. मात्र, या दुष्टचक्रातून सुटका करण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरु आहे. हातचे काम गेल्यानंतर उद्योगनगरीत दुसरे काम न मिळाल्याने अनेक जण आता गावावरुन ज्वारी, बाजरी, गहू आणून विक्री करत आहे. “बुडत्यास काडीचा आधार’ या म्हणीप्रमाणे या धान्याच्या विक्रीतून रोजगार गमावलेल्या अनेक जणांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा मार्ग सापडला आहे.
करोनाची दुसरी लाट ओसरु लागली आहे. निर्बंध हटविल्यामुळे जनजीवन सुरळीत झाले आहे. बाजारपेठांमधील आर्थिक उलाढाल वाढली असली, तरीदेखील तज्ज्ञांकडून करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रोगप्रतिकारक शक्ती हाच करोना व सर्वच आजारांशी मुकाबला करण्याची गुरुकुल्ली आहे. तर शरिराला पौष्टीक घटक मिळावेत, याकरिता शहरातील दुकानांमध्ये मिळणाऱ्या धान्याच्या दर्जाबाबत अनेक जण साशंक असतात.
त्यांच्याकडून गावाकडील ज्वारी, बाजरी व गव्हाची मागणी होत असते. तर लॉकडाऊनमध्ये रोजगार गमावलेल्या अनेकांनी उमेद न गमावता गावाकडे पिकविलेल्या धान्यविक्रीचा नवा व्यवसाय सुरु केला आहे. नेमकी कोणाला या धान्याची गरज आहे हे माहीत नसल्याने महामार्ग व शहरातील अंतर्गत रस्त्यांवर तीन किलोच्या पॅकींगपासूनच्या पिशव्यांमधून ही धान्यविक्री केली जात आहे. गावाकडील विनाभेसळ धान्य वाजवी दरात मिळत असल्याने नागरिकांचा या धान्य खरेदीचा कल वाढत आहे.
उद्योगनगरीत पंधरा वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या तुळजापूर तालुक्यातील तिराडूनच्या अतुल भिसे यांनी लॉकडाऊनमध्ये चालकाची नोकरी गमावली. मात्र हताश न होता निर्बंध शिथील होताच नव्या उमेदीने गावाकडच्या कसदार ज्वारीची शहरात विक्री करायला सुरुवात केली.
नोकरी गेली; पण खचलो नाही
भिसे यांनी सांगितले की, चालकाची नोकरी करत असतानाच परिचयाच्या नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार गावाकडची पौष्टीक ज्वारी उपलब्ध करुन द्यायचो. लॉकडाऊनमध्ये शाळा वाहतूकच बंद असल्याने हाताला काम नव्हते. त्यामुळे गावाकडून आणलेली ज्वारीच पूर्णवेळ विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मी ज्वारीची विक्री करत आहे.
त्यामधून घरभाडे, मुलांची शाळा फी, लाईटबिल,भाजीपाला अशा खर्चाची जुळवा-जुळव करता येत आहे. दर्जाबाबत खात्री पटल्याने अनेक ग्राहक आवर्जून मोबाइल नंबर घेऊन, माझ्याकडूनच ज्वारीची खरेदी करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गावाकडून ज्वारीची आवकदेखील वाढविली असल्याची माहिती त्यांनी दिली.