मुंबई -अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण आणि टीआरपी घोटाळ्यात कारवाई केल्यामुळेचसचिन वाझे यांना लक्ष्य बनवण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना राऊत म्हणाले, वाझे हे निष्णात तपास अधिकारी आहेत. त्यांनी दोन प्रमुख प्रकरणांना अलीकडील काही दिवसांत हात घातला. अन्वय नाईक हे दडपलेले करण वाझेंनी उघडकीस आणले होते. त्यातील संबंधित व्हाईट कॉलर आरोपींना अटक केली. हा देखील अन्वय नाईक कुटुंबीयांना न्यायच झाला. टीआरपी घोटाळ्यातही त्यांनी कारवाई केली. सचिन वाझेंना लक्ष्य केलं जात आहे. या दोन प्रकरणात त्यांनी आरोपी तुरुंगात टाकले, हा मुद्दा त्यामागे असू शकतो, असा दावा संजय राऊत यांनी केला.
फक्त राजीनामा, बदली हेच विरोधी पक्षांचं काम आहे का? लोकशाहीत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने एक प्रकारे सरकारच चालवायचे असते. तुम्हाला जर राजीनामा किंवा बदलीमध्येच समाधान मानायचे असेल, तर महाराष्ट्राचे राजकारण विरोधी पक्षांना नीट कळलेले नाही, असे संजय राऊत म्हणाले.
जिलेटिनच्या कांड्या सापडल्यावरच गांभीर्य कळणार?
अंबानी उद्योगपती असतील, पण सामान्य माणसाच्या जीवाला देखील तेवढीच किंमत आहे. अन्वय नाईक, मोहन डेलकर यांच्या जीवाला किंमत नव्हती का? रोज गाजीपुरच्या सीमेवर 10 ते 12 शेतकरी मरत आहेत. तिथेही कुणी स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या तरच गांभीर्य कळणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.