काहीही झालं तरी चार लोकांनी तरी आपल्याला चांगलं म्हणायला हवं. अशी बहुतेक सगळ्यांची अपेक्षा असते. पण चांगुलपणा हा मुळातच असावा लागतो. तो ओढून ताणून आणता येत नाही. किंबहुना त्यांच्या अंगी चांगुलपणा असतो ते कौतुकाची कधीही वाट बघत नाहीत. एखादं चांगलं काम करताना आपल्याला चार लोकं बघतायत ना, याची वाट बघत नाहीत.
चांगुलपणा खरंतर प्रत्येकाकडे असायलाच हवा. पण अलीकडे त्याचा सत्कार करावा लागतो, त्याला बक्षीस द्यावं लागतं. काही जणांकडे उपजतच चांगुलपणा असतो. लहान मुलं आपल्या डब्यातला खाऊ इतरांना देतात, आपली खेळणी दुसऱ्यांना देतात. त्यांच्या घरातलं वातावरण, मोठ्या माणसांचं वागणं चांगुलपणाचं असतं. तेच संस्कार मुलांवर होतात.
आपल्याकडे काही कुटुंबांमध्ये काम करणाऱ्या बायकांना फुटक्या कपातून चहा देणं, चहाच्या चोथ्याचा चहा करून देणं या गोष्टी अजूनही होतात. घरातील मुलं हे पाहात असतात. याचं अनुकरण करतात. बदलत्या काळात शेजाऱ्यांवर विश्वास ठेवणंसुद्धा धोक्याचं वाटू लागलयं. काही ठिकाणी अगदी सख्खे शेजारी असतात. एकमेकांशी चांगले संबंध ठेवतात.
एकमेकांच्या उपयोगी पडतात. अडचणीत हेच उपयोगी पडते.खून, चोऱ्या, फसवणूक अशी परिस्थिती आसपास आहे. चेहऱ्यावर सभ्य दिसणाऱ्या व्यक्ती जेव्हा इतरांना फसवतात, लुबाडतात तेव्हा आश्चर्य वाटतं. ही परिस्थिती फारच निराशाजनक आहे, असं वाटतं असे अनुभवही येतात. पण दुसरीकडे अशीही उदाहरणे दिसतात की मन भरून येतं. साधं बसने जाताना एखादी वृद्ध व्यक्ती उभी असेल तर तिला बसायला जागा दिली जाते.
खेड्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना शैक्षणिक फी, राहण्याची सोय, जेवणाची सोय करणं हे त्यांचं भावी आयुष्य घडविण्यासाठी गरजेचे असते, त्यांना मदत करणारे लोक समाजात आहेत. समाजात अनेक घटक असे आहेत की, ज्यांना कायम मदतीची गरज असते. त्यात दिव्यांग, वृद्ध, अनाथ असे अनेकजण आहेत. आज खूप सामाजिक संस्था त्यांच्यासाठी काम करत आहेत.
अनोळखी व्यक्तींना मदत करणारे आपल्या आसपास दिसतात आणि त्याची कुठेही वाच्यता करत नाहीत. आपल्या घासातला घास काढून देणारे दिसतात. सगळं सुरळीत चालू असताना अचानक वादळ, अतिवृष्टी, भूकंप, पडझड होते आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं होतं. अशावेळी प्रत्यक्ष मदती इतकीच धीराच्या शब्दांचीही गरज असते. सुख आणि दु:ख या दोन्ही वेळेस शब्दांची गरज असते. आपलं यश कुणीतरी मान्य करावं, आपलं कौतुक करावं म्हणजे त्या यशाचं सार्थक झालं असं वाटतं. तर दु:खाच्या प्रसंगी काही हवं तर सांगा, असं कोरडेपणाने न म्हणता प्रत्यक्ष कृती अपेक्षित असते.
अगदी छोट्या गोष्टीत मिळालेल्या यशाची कुणीतरी नोंद घ्यावी अशी अपेक्षा असते. गरीब आणि श्रीमंत व्यक्ती आसपास असतील तर गरीब व्यक्तीला आपल्या गुणांची इतरांनी कदर करावी, असं तीव्रतेने वाटतं. दारावर आलेल्या विक्रेत्याला सौम्य शब्दात नकार देताच येतो. नकोसे पाहुणे आले तरी आदरातिथ्य करून त्यांची पाठवणी करताच येते. मतभिन्नता असली तरी समजुतीच्या सुरात बोलता येतंच.
रॉंग नंबर आला तरी फोन आपटून निषेध करण्याची गरज नसते. कारण कधीतरी आपल्या हातूनही चुकीचा नंबर लागतो. असा कितीतरी चांगुलपणा आपण अंगी बाणवू शकतो. समाधान मिळवू शकतो, ताण वाचवू शकतो.
– डॉ. नीलम ताटके