हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना नुकतेच फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या सहा दशकांपासून हिंदी चित्रपटजगतात आपल्या खलनायकी भूमिकेने छाप पाडणारे प्रेम चोप्रा यांची वाटचाल आणि कारकीर्द नवख्या कलाकारांना प्रेरित करणारी आणि आदर्शदायी आहे. प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या कारकिर्दीत 400 हून अधिक चित्रपट केले आणि बहुतांश चित्रपटांत त्यांनी खलनायकाचीच भूमिका वठविली आहे. त्यांची खलनायकाची भूमिका लोकांना आवडली.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना नुकतेच फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली सहा दशकांपासून हिंदी चित्रपटजगतात आपल्या खलनायकी भूमिकेने छाप पाडणारे प्रेम चोप्रा यांची वाटचाल आणि कारकीर्द नवख्या कलाकारांना प्रेरित करणारी आणि आदर्शदायी आहे.
प्रेम चोप्रा यांचे अनेक संवाद गाजले आहेत. त्यापैकीच एक जगप्रसिद्ध संवाद हा आजही सर्वांना मुखोद्गत आहे, “”मै जो बला हू… जो शिशे से पत्थर को तोडता हूँ’. पडद्यावर खलनायक म्हणून वावरणारे प्रेम चोप्रा यांचे वास्तविक जीवन अत्यंत साधे राहिले. प्रेमळ स्वभावाचे प्रेम चोप्रा यांचे हृदय अतिशय संवेदनशील आहे.
प्रेम चोप्रा यांचा जन्म 23 सप्टेंबर 1935 रोजी लाहोर येथे झाला. फाळणी झाल्यानंतर प्रेम चोप्रा यांचे कुटुंबीय लाहोरहून सिमल्याला स्थलांतरित झाले. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. कुटुंबही त्यांचे मोठे होते. बालपण सर्वसामान्य राहिले. सिमल्यात शिक्षण घेत असताना प्रेम चोप्रा यांना चित्रपट पाहण्याची आवड निर्माण झाली. जेव्हा जेव्हा संधी मिळायची, तेव्हा ते चित्रपट पाहायचे.
महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांनी नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यामागे एक कारण सांगितले जाते, ते म्हणजे महाविद्यालयातील कॉन्व्हेंटचे विद्यार्थी हे खूपच हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे असायचे. त्यांच्या हुशारीमुळे प्रेम चोप्रा यांच्यावर मानसिक दडपण यायचे. ते स्वत:ला कमी समजायचे आणि खंतही वाटायची. पण अभिनय क्षेत्रात गेल्यास आत्मविश्वास वाढेल, असा विचार प्रेम चोप्रा यांनी केला. या विचाराने त्यांनी नाटक करण्यास सुरुवात केली. अभिनय करताना प्रेम चोप्रा यांच्यात विश्वास दुणावला. याच क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविले. ही गोष्ट जेव्हा त्यांनी वडिलांना सांगितली तेव्हा त्यांनी यास नकार दिला. त्यांच्या मते, चित्रपट विश्व, अभिनयाचे जग अनिश्चिततचे आहे. अशा वेळी सामान्य कुटुंबातील एका व्यक्तीला या क्षेत्रात काम करणे आणि टिकून राहणे कठीण आहे, असे वडिलांना वाटत होते. परंतु प्रेम चोप्रा हे आपल्या निर्णयावर ठाम होते. मुलाचा हट्ट पाहून त्यांनी परवानगी दिली, परंतु त्यांनी अर्थसाह्य करण्यास नकार दिला.
थोडेफार पैसे घेऊन प्रेम चोप्रा हे मुंबईला पोचले. सिमल्याहून निघताना प्रेम चोप्रा यांना अभियनाचा प्रवास किती कठीण आहे, याची कल्पनाही नव्हती. त्यांनी मुंबईत दोन महिने भटकंती केली, परंतु कोणत्याच स्टुडिओने त्यांना प्रवेश दिला नाही. अखेर ते परत सिमल्याला गेले. हताश झालेल्या मुलास वडिलांनी सल्ला दिला की, एखादी नोकरी हाताशी असू दे, त्यानंतर अभिनयाच्या करिअरचा विचार करावा. या मार्गाने अभिनयाचा प्रवास यशस्वी होऊ शकतो. प्रेम चोप्रा यांना वडिलांचे म्हणणे पटले आणि ते परत मुंबईला परतले. यावेळी चोप्रा यांचे नशीब जोरात निघाले. मुंबईत पोचताच त्यांना एका इंग्रजी वृत्तपत्रात वितरण विभागात नोकरी लागली. नोकरी करत त्यांनी काम शोधण्यास सुरू केली. एक दिवस कामाचा शोध घेत असताना प्रेम चोप्रा यांना रेल्वेत एक व्यक्ती भेटली ती त्यांना रणजित स्टुडिओत घेऊन गेली. प्रेम चोप्रा यांना पाहून पंजाबी चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले, की अरे मला असाच नायक हवा होता. अशा रितीने प्रेम चोप्रा यांचा मायानगरीत प्रवेश झाला.
प्रेम चोप्रा यांनी काही पंजाबी चित्रपट केले. पंजाबी चित्रपट चौधरी कर्नलसिंग हा यशस्वी झाला. यादरम्यान ते नोकरी करत होते. ते रजा घेऊन शूटिंग करत. यादरम्यान त्यांची भेट मेहबूब खानशी झाली. प्रेम चोप्राला पाहून मेहबूब खान भारावून गेले. ते म्हणाले, मी तुम्हाला मुख्य नायक म्हणून काम देतो, परंतु काही दिवस थांबावे लागेल. अन्य कोणत्याही भूमिका स्वीकारण्याची घाई करू नका. प्रेम चोप्रा यांना शहीद चित्रपटात महान क्रांतिकारक सुखदेव सिंह यांची भूमिका करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने लोकांच्या मनावर छाप पाडली. त्यामुळे प्रेम चोप्रा यांना ओळख मिळाली. या काळात दिग्दर्शक राज खासला “वो कौन थी’ चित्रपट करत होते. तो एक गूढपट होता. या चित्रपटात चोप्रा यांनी काही वेळ नकारात्मक भूमिका केली. त्यांची भूमिका एवढी गाजली की, की प्रेम चोप्रा हे एका रात्रीतून हिंदी चित्रपटाचे सर्वात मोठे खलनायक बनले.
चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये महेबूब खान भेटले. ते हसत म्हणाले, की मी तुला घाई करू नकोस असे सांगितले होते. तुझ्या या जबरदस्त अभियानंतर आता तुला आयुष्यभर खलनायकाच्याच भूमिका कराव्या लागतील. मेहबूख खान यांचे म्हणणे खरे ठरले. प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या कारकिर्दीत 400 हून धिक चित्रपट केले आणि बहुतांश चित्रपटात त्यांनी खलनायकाचीच भूमिका वठविली आहे. बॉबी, दोस्ताना, उपकार, राजाबाबू, दो अजनबी, पूरब और पश्चिम, दो रास्ते, कटी पतंग, दो अनजाने, जादूटोणा, काला सोना, क्रांती, फूल बने अंगारे यांसारख्या चित्रपटात त्यांची खलनायकाची भूमिका लोकांना आवडली. त्यांनी 1963 मध्ये चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि आजही कायम आहे. प्रेम चोप्रा अनेक चित्रपटात आणि चित्रपट कार्यक्रमात दिसतात.
खलनायकाची भूमिका वठविणारे प्रेम चोप्रा हे सापाला खूप घाबरतात. एका चित्रपटाच्या दृश्यात सापाला पकडायचे होते. जेव्हा शूटिंगची वेळ आली तेव्हा प्रेम चोप्रा घाबरले आणि त्यांचे शरीर थंडगार पडले. शूटिंग सोडून निघून जात असताना दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी त्यांची समजूत काढली. बनावट साप आणून शूटिंग पूर्ण केली. तसेच दोस्ताना चित्रपटात चाबकाने मारण्याच्या दृश्याने देखील ते घाबरले. वास्तविक अभिनेता अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांना चाबूक लागू नये, असे त्यांना वाटत होते.
यावरून प्रेम चोप्रा यांच्यातील संवेदनशीलपणा जाणवतो. चित्रपटात खून करणारा, कारस्थाने रचणारा, गोळीबार करणारा कलाकार एखाद्या गोष्टीने भीत असेल तर त्यांचे मन किती संवेदनशील आहे, हे कळते. प्रेम चोप्रा यांच्या अभिनयात एवढा जिवंतपणा असायचा की त्यांची कन्या देखील त्यांना पाहून घाबरायची. याबाबतचा एक किस्सा प्रेम चोप्रा यांनी कथन केला. ते म्हणाले, की एका चित्रपटाच्या प्रीमियरसाठी मुलीला घेऊन गेलो. पूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर ती माझ्याकडे सतत एकटक पाहत होती. एवढेच नाही तर ती तर एवढी घाबरली होती की ती बोलण्याचेही टाळत होती. त्यानंतर तिला समजून सांगितले. पडद्यावर नायकाच्या जीवावर उठणारा खलनायक हा वास्तविक जीवनात निखळ प्रेमासाठी प्रसिद्ध होता.
प्रेम चोप्रा आणि जितेंद्र यांची चांगली मैत्री. या दोघांचे करियर एकाच काळात सुरू झाले. योगायोगाने ते एकाच इमारतीत राहत होते. याबाबत प्रेम चोप्रा म्हणतात एक नायक आणि एक खलनायक मित्र असू शकतात, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. चाहत्यांना देखील या दोघांची मैत्री पाहून धक्का बसायचा. जितेंद्र हे कुलाबाच्या पोस्ट ऑफिस भागात राहत असताना प्रेम चोप्रा यांच्याशी मैत्री झाली. ते एका सराफ्याच्या दुकानात काम करायचे. दोघेही मोठे स्वप्न घेऊन मुंबईला आले होते. एकाचवेळी ते ऑडिशन द्यायचे. ते दोघेही एकाच टॅक्सीतून जात आणि भाडे आलटून पालटून देत असत. सराफ्याच्या दुकानातच काम करत असताना जितेंद्र यांना व्हि. शांताराम यांनी पाहिले आणि त्यास गीत गाया पत्थरो ने या चित्रपटात ब्रेक दिला, असे म्हटले जाते.
– मानवेंद्र उपाध्याय