कॉंग्रेस पक्षाच्या 137 वर्षांच्या वाटचालीत पक्षाध्यक्षपदासाठीची सहावी निवडणूक नुकतीच पार पडली आणि अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला आहे. खर्गेंचा विजय पक्षासाठी अनेकार्थांनी महत्त्वाचा आहे. स्वच्छ प्रतिमा, राजकारणातील प्रदीर्घ अनुभव, संसदीय कामकाजाचा अनुभव या जोडीला गांधी परिवाराशी एकनिष्ठता हे खर्गेंचे मोठे बलस्थान आहे. बाबू जगजीवन राम यांच्यानंतर खर्गेंच्या रूपाने कॉंग्रेसला मागासवर्गीय समाजातील दुसरा अध्यक्ष मिळाला आहे. याचा फायदा कर्नाटक आणि उत्तर प्रदेशासह काही राज्यांत होऊ शकतो. हिमाचल प्रदेश आणि गुजरातची निवडणूक ही त्यांची पहिली अग्निपरीक्षा असेल.
सव्वाशेहून अधिक वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला आहे. खर्गे यांनी 7897 मते मिळवली; तर त्यांच्या विरोधात अध्यक्षपदासाठी दावेदारी करणाऱ्या शशी थरुर यांना अवघी हजारभर मते मिळाली. गेल्या 137 वर्षांमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची ही सहावी वेळ होती.
खर्गे यांच्या रूपाने कॉंग्रेस पक्षाला मागासवर्गीय समाजातील दुसरा अध्यक्ष मिळालाआहे. पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे 1970 च्या दशकामध्ये बाबू जगजीवन राम हे दलित समाजातून आलेले कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष राहिले. मल्लिकार्जुन खर्गे हे 80 वर्षांचे असून कॉंग्रेसच्या विद्यमान नेत्यांमध्ये त्यांची बलस्थाने, शक्तीस्थाने अनेक आहेत. मुख्य म्हणजे गांधी परिवाराशी एकनिष्ठता हे त्यांचे आणि अध्यक्ष म्हणून निवड होण्यामागचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे हे लक्षात घ्यायला हवे.
कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वारावत्ती येथील एका शेतकरी कुटुंबामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचा जन्म झाला. गुलबर्ग्यातील नूतन विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तेथील सरकारी महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. कॉलेजजीवनात असताना ते विद्यार्थी संघटनेचे महासचिव होते. गुलबर्ग्यातील विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. 1969 मध्ये एमकेएस मिल्स कर्मचारी संघटनेचे कायदेशीर सल्लागार बनले. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी मोठी लढाई लढली. याच वर्षी त्यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. 1972 मध्ये कर्नाटकातील गुरमितकल मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली.
उल्लेखनीय बाब म्हणजे या निवडणुकीतील विजयानंतर या मतदारसंघावर जणू त्यांची मक्तेदारीच निर्माण झाली. तब्बल नऊ वेळा खर्गे या मतदारसंघातून विजयी झाले. 2005 मध्ये कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीने त्यांना अध्यक्ष बनवले. 2009 मध्ये ते पहिल्यांदा खासदार बनले आणि तेथून राष्ट्रीय राजकारणातील त्यांचा प्रभाव वाढीस लागला. खर्गे हे सुरुवातीपासून गांधी परिवाराचे अत्यंत विश्वसनीय व्यक्ती मानले जातात. 2014 मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेता बनवण्यात आले. 2019 मधील पराभवानंतर 2020 मध्ये त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले. गुलाम नबी आझादांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. त्यानंतर आता थेट कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची कमान त्यांच्याकडे आली आहे.
अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची भूमिका घेऊन कॉंग्रेस हायकमांडने एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे दिसत आहे. एक म्हणजे कॉंग्रेस पक्ष हा लोकशाहीवादी असून लोकशाहीची ही संकल्पना केवळ राज्यव्यवस्थेपुरती मर्यादित न ठेवता पक्षामध्येही आहे, हे या निवडणुकीतून कॉंग्रेसने दाखवून दिले. दुसरे म्हणजे पक्षसदस्यांनी बहुमताने निवडून दिलेली व्यक्ती अध्यक्ष बनल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी, गटबाजी यांना बऱ्याच अंशी आळा बसणार आहे. गांधी कुटुंबाची पक्षामध्ये एकाधिकारशाही आहे, हा पक्ष एका कुटुंबाचा आहे असे आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न यातून केलेला दिसतो. या आरोपकर्त्यांमध्ये भाजपासारखे बिगरकॉंग्रेसी पक्षच नव्हे तर पक्षातीलही काही अस्वस्थ नेते समाविष्ट होतात. चौथे म्हणजे गांधी कुटुंब सुरुवातीपासूनच खर्गे यांच्या बाजूने राहिले.
त्यामुळे अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबाचा हात ज्याच्या खांद्यावर असेल तोच पक्षाच्या प्रमुखपदी असेल हेही आता सिद्ध झाले आहे. याचाच दुसरा अर्थ पक्षाध्यक्ष हा केवळ नामधारी असणार आहे. प्रत्यक्षात पक्षाच्या ध्येयधोरणांविषयीचे निर्णयाधिकार हे हायकमांडच्या सल्ल्याने आणि मर्जीनेच होणार आहेत. शशी थरुर अध्यक्ष बनले असते तर यामध्ये काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता होती. कारण थरुर हे स्वतंत्र विचारांचे, स्वतंत्र बाण्याचे व्यक्तिमत्त्व आहे. प्रसंगी नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीरपणाने स्तुतीसुमने उधळतानाही त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही. स्वाभाविकपणे अशा व्यक्तीला गांधी कुटुंबाचे समर्थन मिळणे अशक्यच होते. मल्लिकार्जुन खर्गे हे पक्षाचा अध्यक्ष म्हणून पुढे असलेला चेहरा असले तरी रिमोट कंट्रोल हा निर्विवादपणाने गांधी कुटुंबाच्या हाती असणार आहे. आता खर्गे यांच्या विजयाचे परिणाम आणि त्यांच्यापुढील आव्हाने कोणकोणती आहेत, हे पाहूया.
मल्लिकार्जुन खर्गे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्याचा सर्वांत मोठा फायदा पक्षाला कर्नाटकात होण्याची शक्यता आहे. विशेषतः कर्नाटकातील सात मागासगवर्गीयबहुल जिल्ह्यांमध्ये याचे परिणाम दिसून येऊ शकतात. कारण 2012 मध्ये संपुआ सरकार केंद्रात असताना खर्गे यांच्या प्रयत्नांमुळे या भागात कलम 371 जे लागू करण्यात आले होते. खर्गे तेव्हा केंद्रीय मंत्री होते. हे कलम लागू झाल्यामुळे या भागाला विशेष दर्जा मिळाला. परिणामी, गुलबर्गा, बिदर, रायचूर, कोप्पल, यादगीर आणि अविभाजित बेल्लारी या भागांच्या विकासासाठी कर्नाटकचे राज्यपाल आवश्यक ती पावले उचलू शकतात. या सात जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या 39 जागा आहेत. 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये येथे काट्याची टक्कर झाली होती. या निवडणुकांत कॉंग्रेसने 19 जागांवर तर भाजपाने 16 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपाने कॉंग्रेसच्या दोन जागा जिंकल्या. खर्गे अध्यक्ष बनल्यामुळे कर्नाटकातील डीके शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्यातील द्वंद्वालाही काही अंशी लगाम बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अर्थात गेल्या काही वर्षांत खर्गे यांची कर्नाटकातील लोकप्रियता कमी झाली होती; परंतु आता थेट पक्षाध्यक्ष बनल्यामुळे ते पुन्हा एकदा शक्तीकेंद्र बनले आहेत. येत्या काळात त्यांना कर्नाटक कॉंग्रेसमधील बेदिली कमी करुन एकजूट निर्माण करावी लागेल. कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष रामालिंगा रेड्डी यांनीही खर्गे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यामुळे पक्षांतर्गत अनेक समस्यांची सोडवणूक करप शकतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. 2023 मध्ये या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मागासवर्गीयांची मते मिळवण्यासाठीही खर्गेंची निवड फायदेशीर ठरू शकते. अलीकडील काळात कर्नाटकातील मागासवर्गीयांमध्ये कॉंग्रेसविषयी नाराजी दिसून आली आहे. पक्षाला संधी असूनही तीन वेळा त्यांच्या जातीच्या नेत्याला पक्षाने मुख्यमंत्री बनवले नाही, असे या वर्गाचे म्हणणे आहे. कर्नाटकच्या एकूण लोकसंख्येमध्ये दलितांचा मतांचा टक्का 23 टक्के इतका आहे.
असे असले तरी दक्षिण भारताबाहेर पक्षाचा नेता म्हणून खर्गे यांची जनमानसात असणारी ओळख अत्यल्प आहे. त्यामुळे पूर्वोत्तर राज्यांत, उत्तरेकडील राज्यात खर्गे यांना कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. खरगे यांच्यासारख्या बुर्जुग आणि दीर्घकाळ राजकारणात असणाऱ्या व्यक्तीच्या हाती पक्षाची कमान आल्यामुळे ज्येष्ठ विरुद्ध तरुण हा कॉंग्रेस पक्षामधील वाद कायम राहणार आहे. वास्तविक, शशी थरुर यांना कॉंग्रेसमधील युवावर्गाची पसंती अधिक असल्याचे सार्वजनिक कार्यक्रमातून दिसून यायचे; परंतु प्रत्यक्ष मतदानातून ते दिसून आले नाही. तथापि, आगामी काळात खर्गे यांची भूमिका गांधी कुटुंबाप्रमाणेच राहिली तर पक्षांतर्गत बदलांबाबत आग्रही असणारा कॉंग्रेसमधील वर्ग फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका हे खर्गेंपुढील पहिले सर्वांत मोठे आव्हान असणार आहे. या दोन्ही राज्यांत भाजपाची दावेदारी प्रभावी आहे. ती मोडून काढण्यासाठी खर्गे कोणती भूमिका घेतात हे पहावे लागेल. विशेषतः या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला आम आदमी पक्ष कडवी झुंज देत आहे. “आप’ हा या राज्यांत विशेषतः गुजरातेत कॉंग्रेसची जागा घेऊन दुसऱ्या स्थानावर जाण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे खर्गे यांच्यापुढे भाजपाबरोबरीने “आप’चेही आव्हान आहे. या निवडणुकांमध्ये खर्गे यांना पक्षाचे युवराज राहुल गांधी यांची साथ मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. कारण राहुल गांधी सध्या “भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून देशभरात फिरत आहेत. 150 दिवस चालणाऱ्या या यात्रेची सुरुवात झाल्यापासून राहुल गांधी हे एकदाही दिल्लीला गेलेले नाहीत. कॉंग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठीचे मतही त्यांनी पदयात्रेतूनच दिले आहे. त्यामुळे गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील कॉंग्रेसची खिंड खर्गे यांनाच लढवावी लागणार आहे.
खर्गे अध्यक्ष झाल्याचा फायदा कॉंग्रेसला उत्तर प्रदेशात काही प्रमाणात होऊ शकतो. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या काळात उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला मागासवर्गीयांचे समर्थन मोठ्या प्रमाणावर मिळत असे. “गरिबी हटाओ’चा इंदिराजींचा नारा उत्तर प्रदेशात चांगलाच लोकप्रिय झाला होता. परंतु नंतरच्या काळात कॉंग्रेसची ही हक्काची व्होटबॅंक काशीराम आणि मायावती यांच्याकडे आणि भाजपाकडे सरकली. अलीकडेच उत्तर प्रदेशात बसपाचे संस्थापक काशीराम यांचे शिष्य बृजलाल खाबरी यांना कॉंग्रेसने प्रियंका गांधी यांच्या सूचनेवरुन प्रदेशाध्यक्ष बनवले आहे. आता खरगे अध्यक्ष बनल्याचाही फायदा उत्तर प्रदेशातील दलित मतगठ्ठा आकृष्ट करण्यात होऊ शकतो.
एकंदरीत पाहता मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष बनल्यामुळे कॉंग्रेस लागलीच भलेही फिनिक्स भरारी घेण्याची शक्यता नसली तरी निस्तेज झालेल्या पक्षाला थोडीशी का होईना धुगधुगी मिळेल असे वाटते. यादृष्टीने खर्गेंची आगामी काळातील कार्यपद्धती, रणनीती कशी राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
– प्रसाद पाटील