आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, आपल्याशी दुसऱ्यांनी नीट बोलावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. पण मुला-मुलींनो, आपल्याला जर एखादी गोष्ट व्हावी असं खूपच वाटत असेल तर त्यासाठी तसे खास प्रयत्न करावे लागतात. काही गोष्टी टाळाव्या लागतील आणि काही गोष्टी आवर्जून कराव्या लागती. उदाहरणार्थ, एखादी मुलगी वागायला साधी असेल. आरडाओरडा, भांडण करत नसेल, तर बाकीची मुलं तिला चिडवतात, एकटं पाडतात.
अशा वेळी तुम्ही काय कराल? तुम्हीही ही मजा बघत बसाल? कदाचित तुम्हाला मनातून वाटेल, खरं तर ही स्वभावानं चांगली आहे. पण पुढे होऊन तुम्ही तसे बोलाल? तिच्या पाठीशी उभे रहाल? तसे झाले तर ती मुलगी तर तुमची मैत्रीण होईलच पण त्रास देणाऱ्यातली सगळीच मुलंमुली काही वाईट नसतात. त्यांच्यातला कोणीतरी आगाऊ मुलगा तसा वागतो म्हणून मग बाकीचेपण त्याचं अनुकरण करतात. तुम्ही जर या चुकीच्या वागण्याच्या विरोधात उभे राहिलात तर काहीजण तुम्हाला येऊन मिळतील. तुमचे दोस्त होतील. त्यांना वाटेल, उद्या आपल्यावर जर काही असं छोटंसं संकट आलं तर ही मुलगी जशी तिच्या पाठीशी उभी राहिली तशी आपल्यामागेही उभी राहील.
शिष्टपणानं वागणं, बेफिकीरपणे बोलणं हे तर खूप सोपं आहे. पण संयम हा फार मोठा गुण आहे. जी शहाणी मुलं असतात, त्यांना माहीत असतं की, आपल्यापेक्षा हुशार मुलं कितीतरी आहेत तेव्हा आपण शिष्टपणा करणं चुकीचं आहे. त्यामुळं लोक आपल्याला हसतील. मैत्री करायला मुलं पुढं येणार नाहीत. बोलणं हे तर आपल्या स्वभावाचं पहिलं निदर्शक आहे. आपण कसं बोलतो, यावर आपलं वळण कसं आहे, संस्कार कसे आहेत हे कळतं. जी व्यक्ती बेफिकीरपणे बोलते, दुसरे कुणी दुखावेल की काय याची काळजी न घेता बोलते, तिच्यावर बाकीचे नाराज होतील आणि तिच्यापासून दुरावतील. मग पुन्हा तुम्ही काय म्हणणार? “काय बुआ… मी इतकं चांगलं वागतो-बोलतो लोकांशी, तरी माझ्याशी मैत्री का नाही कुणी करीत?
नुसत्या बोलण्यावरून, भाषेवरून माणसाची कशी परीक्षा केली जाते याबद्दलची एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. एकदा काय झालं, एक ऋषी एका वनात देवाची साधना करीत डोळे मिटून बसलेले असतात. तेवढ्यात काहीजण धावतधावत तिथे येतात. एकजण त्या ऋषींना विचारतो, “काय रे बुवा, इथून कुणाला जाताना तू पाहिलंस का?’ ऋषी म्हणतात, “नाही रे, मला तर काही चाहूल लागली नाही.’ निघताना तो म्हणतो, “चला रे, याला तर काहीच माहीत नाही.’ थोड्या वेळानं घोड्यावरून दोघे-तिघे येतात. त्यातला एकजण विचारतो, “काय हो साधुबुआ, इथून कुणी जाताना तुम्हाला कळलं का?’ ऋषी उत्तरतात, “नाही हो, मला तर काही कळलं नाही.’
आणखी थोड्या वेळानं एक घोडेस्वार येतो. तो घोड्याला तिथे बाजूला थांबवतो. घोड्यावरून उतरून त्या ऋषींजवळ जातो आणि किंचित वाकून नम्रतेनं म्हणतो, “प्रणाम मुनीवर!’ ऋषींचे डोळे मिटलेलेच असतात. ते हात उचलून म्हणतात, “राजा, तुझे कल्याण असो. बोल, तुला काय हवे?’ राजा म्हणतो, “आम्ही या वनात शिकारीसाठी आलो आहोत. माझी आणि माझ्या शिपायांची चुकामूक झाली. मी त्यांना शोधतोय पण ते कुठल्या रस्त्याने गेले हे काही समजत नाही.’ ऋषी म्हणतात, “याच रस्त्याने पश्चिमेच्या दिशेने गेले बघ. आधी चार-पाच शिपाई गेले. मग प्रधानांबरोबर दोन-तीन शिपाई गेले आणि महाराज, आता आपण आलात. राजन्, तुम्ही जर लगेच पश्चिमेच्या दिशेनं गेलात तर ते तुम्हाला नक्की भेटतील.’
हे सारे ऐकून राजाला नवल वाटते. तो म्हणतो, “मुनीवर, तुमचे डोळे तर मिटलेले आहेत. तुम्हाला कसे कळले, मी राजा आहे, ते शिपाई व प्रधान आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोललात का?’
ऋषी म्हणतात, “मी नाही जास्त बोललो पण ते बोलले ना आणि त्यावरून मला त्यांची योग्यता कळली. आधीचा शिपाईच असणार. तो अडाणी असल्यामुळे मला त्यानं गोसावड्या म्हटलं. नंतर आलेला प्रधान होता, हे मी ओळखलं. तो माझ्याशी घोड्यावरूनच थोडाफार आदरानं बोलला आणि निघून गेला. पण राजन् तुम्ही मात्र सुसंस्कृत, उत्तम शिक्षण घेतलेले, जबाबदार पदावरील आहात हे मी तुमच्या बोलण्यावरून, वागणुकीवरून ताबडतोब ताडले.’
तेव्हा मुलांनो, आलं लक्षात? आपल्या वागण्या-बोलण्यावरून लोक आपली पारख करीत असतात. आणि तुम्ही तर चांगले आहातच; तर मग तुमचं वागणं आणि बोलणंही चांगलंच असणार, होय ना?
– माधुरी तळवलकर