नंदनपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावाजवळच जंगल सुरू होत होतं. गावात जयदेव नावाचा एक तरुण राहात होता. त्याचा एक घोडा होता. त्याचं नाव होतं पवन. पवन म्हणजे वारा. हा घोडा वाऱ्याच्या वेगानं धावायचा. म्हणून जयदेवनं त्याचं नाव पवन ठेवलं होतं. जयदेव शेती करायचा. अधूनमधून कंटाळा आला की, तो पवनबरोबर शेजारच्या जंगलात जायचा. नेहमी जाऊन जाऊन तिथल्या प्राण्यांच्या त्यांच्या चांगल्या ओळखी झाल्या होत्या. पोपटभाऊ, हत्तीदादा, उंटमामा, जिराफकाका सगळे त्यांचे दोस्त झाले होते.
एकदा असेच पवन जयदेवला पाठीवर घेऊन जंगलात फिरायला चालला होता. त्यालाही जंगलात जायला आवडायचे. पण जात असताना अचानक झाडाची एक फांदी जयदेवच्या कपाळावर आपटली. जयदेव खाली पडला. पवन घाबरला. तो ओरडायला लागला, “आम्हाला मदत करा. माझा जयराम खाली पडलाय.’ पण त्याच्या मदतीला कोणीच येत नाही. आता काय करावं? तेवढ्यात फांदीवरून एक शीळ ऐकू येते. पवन वरती बघतो तर काय? पोपटभाऊ! तो म्हणतो, “काय रे पवन? काय झालं?’ पवन म्हणतो, “अरे, दौडत असताना माझं लक्षच नव्हतं. जयदेवच्या डोक्याला फांदी लागली आणि तो खाली पडला. त्याच्या कपाळाला खोक पडलीय.’
“अरे बापरे!” पोपट म्हणाला, “थांब, मी हत्तीदादाला घेऊन येतो.’
“लवकर ये रे… ‘
पोपट उडत उडत गेला. त्यानं हत्तीदादाला बोलावून आणलं. जयदेव असा धुळीत पडलेला पाहून हत्तीदादाला फार वाईट वाटलं. त्यानं जयदेवला अलगद सोंडेत उचललं आणि सावलीत मऊ गवतावर आणून ठेवलं. मग शेजारीच असलेल्या तलावातलं पाणी सोंडेत घेऊन आला आणि त्याच्या तोंडात घातलं. थोडं चेहऱ्यावर शिंपडलं. जयदेवनं डोळे उघडले. म्हणाला, “डोकं खूप दुखतंय.’
हत्तीदादा म्हणाला, “हो रे हो, आधी ते रक्त थांबवायला हवं. मिठू, तू असं कर, उडत उडत जा आणि जिराफकाकाला बोलावून आण. झाडावरचा पाला त्याला आपण काढायला सांगू. लगेच जा आणि त्याला घेऊन ये.’
पोपटभाऊ परत उडत उडत निघाला. हत्तीदादा जयदेवला म्हणाला, “काही काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना?’ जयदेव बिचारा डोळे मिटून पडून राहिला.
थोड्या वेळानं जिराफकाकाच्या पाठीवर बसून पोपटभाऊ येतो. मग जिराफकाका औषधी झाडाची जरा शोधाशोध करतो. एक उपयोगी झाड त्याला दिसतं. उंच होतं फार ते. पण जिराफकाकाची मान म्हणजे तर केवढी लांब! त्याचं तोंड त्या फांदीपर्यंत सहज पोचलं. मग त्यानं लहान लहान डहाळ्या तोडून खाली टाकल्या. घोड्यांचे दात बळकट असतात. पवननं लगेच त्या डहाळ्या तोंडात घेतल्या आणि त्या चावून त्याचा चांगला बारीक गोळा केला. मग त्यानं हळुवारपणे जयदेवच्या जखमेवर तो लेप लावला. सगळेजण काळजीनं जयदेवभोवती बसून राहिले. त्यांचा मित्र होता ना तो! थोड्या वेळानं जयदेवच्या जखमेतून येणारं रक्त थांबलं. मग हत्तीदादा म्हणला, “आता काही काळजी जयदेवची. बरं वाटेल त्याला. ‘
थोड्याच वेळात जंगलभर बातमी कळते की, नेहमी आपल्याला भेटायला येणारा जयदेव जखमी झाला आहे. हळूहळू बाकीचे प्राणीही त्याला बघायला गोळा होतात. कोकिळा येते, ती छान गाणं म्हणते. जयराम ते गोड गाणं ऐकताना आपल्या वेदना विसरतो. मग मोर येतो. तो सुंदर नाच करतो. जयदेव खूश होतो. आता संध्याकाळ व्हायला आलेली असते. जयराम म्हणतो, “आम्ही आता घरी जातो. नाहीतर पुन्हा अंधारात काही दिसणार नाही.’
तेवढ्यात तिथं झाडावरची फळं घेऊन माकड येतं. ते म्हणतं, “जयदेवदादा, ही फळं खाऊन जा. म्हणजे अंगात जरा शक्ती येईल.’ जयदेव माकडाला शाबासकी देतो, कुणाच्या पाठीवरून हात फिरवतो. मग त्या माकडानं आणलेली फळं खातो. त्याला जरा ताजंतवानं वाटतं. तो म्हणतो, “पवन, जा, तूही जरा चरून ये आणि मग आपण निघू या.’
पवन आजूबाजूला फिरून हिरवं गवत, थोडी फळं खातो आणि परत येतो. जयदेवला म्हणतो, “चल जयदेव, मी तुला आता अगदी नीट लक्ष देऊन सावकाश नेतो. काही काळजी करू नकोस.’ मग सगळ्यांचा निरोप घेऊन ते दोघे निघतात.
सगळे त्याला टाटाबायबाय करतात. हत्तीदादा म्हणतो, “पवन, नीट ने रे बाबा त्याला.’
“हो, हो, काही काळजी करू नका.’ पवन म्हणतो. मग पवन काळजीपूर्वक जयदेवला घेऊन घरी येतो.
– माधुरी तळवलकर