आपण आयुष्यात सतत अधिकाधिक चांगले काही करण्याचा प्रयत्न करत असतो, याच प्रयत्नांतून आपण आपली ताकद वाढवत असतो. याच शक्तीचा प्रयोग कोठे, केव्हा, कसा करावा नेमके याच विषयी थोडेसे…
आपण आपले ध्येय गाठण्यासाठी बरीच मेहनत घेत असतो. आपली तयारी चांगल्या प्रकारे करत असतो. आपल्या कमजोरी शोधून काढून त्यांवर काम करत असतो. तर आपल्या ज्या जमेच्या बाजू असतात त्याही अधिक मजबूत करता येतील हे पहात असतो. आपण आपली आर्थिक बाजूही मजबूत करत असतो.
आपल्याकडे पैसे आले की आपण वस्तू खरेदी करू लागतो. जीवनावश्यक वस्तू या घेतल्याच पाहिजेत. तसेच अत्यावश्यक सोयीसुविधा घ्यायलाच हव्या. याच प्रयत्नात आपण वहावत जातो आणि अनावश्यक बाबींना महत्त्व देत बसतो. कोणी दोन-तीन किलो सोने अंगावर घालून हिंडते, कोणी लाखो रुपयांची दुचाकी गाडी घेऊन हिंडते, कुणी विवाहासाठी बराच खर्च करते. वास्तविक पाहता आपण विचार करायला हवा की आपण असे शक्ती प्रदर्शन करायलाच हवे का? आपण स्वतःला एखाद्या अनावश्यक स्पर्धेत तर ढकलत नाही ना? दुसऱ्या कोणा पेक्षा माझ्याकडे किती जास्त आहे हे दाखविण्याची आपली ईर्षा याच स्पर्धेतून जागृत होती. अशी ईर्षा आपण टाळायला हवी. आपली तुलना आपण इतर कोणाशीही करायची नाही. आपल्यासारखे आपणच असतो. आपले काम, आपली भूमिका इतर कोणीही करू शकत नाही.
आपली हौस काहीही जरी असली तरी कधी मुरड ही घालावीच लागते. एखाद्या कोणाकडे जास्त पैसे आहेत आणि तो सतत पैशांचा जोर दाखवीत असेल, तर अशा वागण्याने तो कधी अडचणीत सापडू शकतो. जास्त पैसे असणे ही त्याची जमेची बाजू नक्कीच आहे परंतु त्याच पैशांमुळे त्याच्या जीवावर बेतले तर? यामुळेच आपण प्रत्येकवेळी शक्ती प्रदर्शन करणे आवश्यकच असते नाही. आपण शक्ती प्रदर्शन करून कोणी आपल्याला पुरस्कार देणार नसते. आपली ताकद काय आहे हे आपल्याला चांगले माहीत असते. याच ताकदीचा उपयोग आपल्याला योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य कामासाठीच करावयाचा आहे एवढे पक्के लक्षात ठेवावे. जेव्हा खरी परीक्षा देण्याचा प्रसंग असेल त्यावेळी आपली सर्व शक्ती पणाला लावायची. ही शक्ती पणाला लावण्यासाठी आपल्यातील ऊर्जा राखूनही ठेवायची आहे.
आपण शक्ती प्रदर्शन करून आपल्या तयारीचा अंदाजच समोरच्या व्यक्तीला देत असतो. आपला अंदाज समोरच्या व्यक्तीला आल्याने ती व्यक्ती जास्त किंवा पुरेशा तयारीनीशी आपल्यासमोर येते. त्याच्या तयारीचा आपल्याला काहीच अंदाज नसल्याने आपण पराभूत होण्याची शक्यता वाढते. याचसाठी बरेच खेळाडू ऑलिंपिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये सराव करताना आपली खरी तयारी कधीच दाखवीत नाहीत. आपणही छुपे रुस्तूम असायला हवे.
वनवासात असताना राम-लक्ष्मणकडे अरण्यातील काही लोक आले आणि विनंती केली की एका राक्षशीणीपासून आम्हाला संरक्षण द्या. लक्ष्मण लगेच तिला मारण्यासाठी जाऊ लागला. रामाने त्याला थांबवत म्हणाले, “”तू फक्त धनुष्याचा टणत्कार कर, तेवढे पुरेसे आहे.” लक्ष्मणाच्या टणत्काराचा आवाज ऐकूनच ती राक्षशीण पळून गेली.
बऱ्याच वेळा आपल्याकडे असणारी ताकद-क्षमता पूर्णपणे वापण्याची गरज भासत नाही. जसे समजा आपल्या कमरेला तलवार लटकवलेली आहे. तलवार आपल्याजवळ आहे यामुळेही काही प्रश्न निर्माण होत नाही. त्यापेक्षा कठीण प्रश्न आपण नुसता तलवारीकडे हात नेल्यामुळेही सुटतात. त्यापेक्षाही कठीण प्रश्न नुसता तलवारीच्या मुठीला हात लावल्यानेही सुटतात. त्यापेक्षाही कठीण प्रश्न तलवार म्यानेतून अर्धी बाहेर काढून सुटतात. त्यापेक्षाही कठीण प्रश्न नुसती तलवार पूर्ण बाहेर काढून सुटतात. त्याहीपेक्षा कठीण प्रश्न तलवार परजून, उगारून सुटतात. आणि फारच कमी प्रश्न असे असतात की जे केवळ तलवार चालवून सुटतात. अशा प्रकारे आपण वेळ प्रसंग पाहून आवश्यक तेवढीच ऊर्जा वापरायची आहे. जेथे सुई वापरण्याची आवश्यकता आहे तेथे सुई आणि जेथे तलवार वापरण्याची आवश्यकता आहे तेथे तलवार. आपल्याकडे दोन्ही हवे सुई आणि तलवार. कधी नुसता टणत्कारही पुरेसा असतो हे लक्षात घ्यावे.
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे आपल्याला माहीत आहेच. जे माहीत आहे त्याचा व्यवहारात उपयोग आपण कसा करावा हे शिकले पाहिजे.
आपण समोरच्या व्यक्तीचीच जमेची बाजू जर कमजोरी बनवून टाकली तर? त्याचेच शस्त्र जर त्याच्यावर उलटविले तर? यासाठी युक्तीचा वापर करावा लागतो. खेळामध्ये असे नेहमीच पहायला मिळते. कोणी एखादा गोलंदाज तुफान वेगाने चेंडू टाकतो. फलंदाज मात्र फळी मधे घालून त्या चेंडूची दिशा थोडी बदलवून टाकतो आणि चेंडू त्याच तुफान वेगात सीमापार जातो. एकदा युद्धात एका सेनापतीकडे बाण कमी पडतात. त्याने गवताची गादी बनवून ती पुढे केली. त्या गादीवर शत्रूने भरपूर बाण मारले. मग तेच बाण शत्रूविरुद्ध वापरले. जर ताकदच वापरून वर्चस्व मिळवायचे असते तर माणसावर हत्ती, माकडे, गवे या प्राण्यांनी केव्हाच वर्चस्व मिळविले असते. बुद्धी, युक्ती ही शक्तीपेक्षा श्रेष्ठच असल्याने आपण बुद्धी व युक्तीनेच शक्तीचा प्रयोग कोठे केव्हा व कसा करावा हे ठरवावे.
आपल्याकडे असलेल्या शक्तीचा अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. आपल्या संततीच्या लग्नात आपण जास्त खर्च करणार असू तर त्यातील थोडाफार खर्च वाचवून त्यातून एखाद्या जोडप्याचा विवाह खर्च भागवू शकतो. आपण आपल्या गाडीने दुसऱ्या गावाला जात आहोत, तर आपल्यासोबत आणखी कोणाला बरोबर घेऊ शकतो. कोणाचा शिक्षणाचा खर्च भागवू शकतो, कोणाला व्यवसायात मदत करू शकतो. अशा प्रकारे आपण समाजोपयोगी आपली क्षमता वापरू शकतो.
आपली ताकद जशी वाढत जाईल तसतसे जास्त संयम बाळगायला हवा. सिंह कधीच उंदराची शिकार करीत नसतो. अनेक छोट्या छोट्या प्रसंगी आपली ताकद दाखविण्याची काहीच आवश्यकता नसते. झाड जसे फळांच्या भाराने वाकते, त्याचप्रमाणे आपणही नम्रता दाखवून बरेच प्रश्न अलगदपणे सोडवू शकतो. बऱ्याच वेळा दोन्ही हात जोडून जे बिकट प्रश्न सुटू शकतात ते हात उगारून सुटत तर नाहीच पण अधिक बिकट होऊन बसतात.
आपण संयमाने जर वागलो तर बरेच प्रश्न निर्माणच होणार नाही. यामुळे आपोआपच आपले आयुष्य सुखकर बनून जाते. आपण आपल्या मन मंदिराच्या गाभाऱ्यात बसून संयामने शक्ती प्रयोग करण्याचे जर पुष्प अर्पण केले तर मिळणाऱ्या आशीर्वादातून आपणास आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली सापडू शकते.
– अनिकेत भालेराव