पहाट म्हणजेच सकाळ. दिवस उजाडण्याची वेळ. प्रभातेचा मनोरम्य समय.रात्रीच्या अंधारातून काळोखाला चिरत रवी आपलं मार्गक्रमण करीत असतो. क्षितिजावर हळुवार तांबूस लालसर आभा नजरेस पडू लागते अग्निपुंज अलगद वर सरकू लागतो. पहाटेचा थंडगार वारा मनाला वेगळाच आल्हाद देत आपला सुगंध चौफेर उधळीत असतो. पहाटेची चाहूल लागलेली असते. पक्ष्यांचा मधुर किलरव आसमंती निनादत असतो. रात्रीची मरगळ झटकत सगळेच प्राणिमात्रा प्रभातेच्या स्वागतास सज्ज झालेले असतात. हळूच कुठेतरी दूर मस्जिदीतून पहाटेची पहिली अजान कानावर पडू लागते.
गावटेकडीवरच्या मंदिरातून सकाळचा तो रम्य घंटानाद ऐकू येताच वातावरण भक्तिमय व प्रसन्न वाटू लागतं. भूपाळीचे मधुर सूर शरीरात भक्तिमय चैतन्य प्रदान करून जातात. चराचर प्रफुल्लित होऊन जातं. आळसाला दूर सारत सगळे प्राणिमात्रा आपल्या दैनिक चर्येत गर्क होऊन जातात. सूर्याची ऊर्जादायी प्रभात किरणे जसजशी वर येऊ लागतात, तसतशी माणसातली शाश्वत क्रयशक्ती वाढू लागते. पोटापाण्याच्या शोधात प्राणिमात्रांची धावपळ सुरू होऊन जाते. कदाचित हेच ते जीवनचक्र असावे जे मनोरम्य पहाटेसवे सुरू होऊन रात्रीच्या घनगर्द काळोखात विसावून जात असावं.. नाही..!
पहाटेची सुरुवात अद्भुत रम्य अन मनोहारी असते. तिची वेगवेगळी रूपे आपल्याला त्या त्या वेळच्या वातावरणाशी समरूप होण्यास भाग पाडतात. किंबहुना मनाला मोहित करून समयानुरूप पहाटेचा मधुगंध कोमल वाऱ्यासवे हळुवार पसरवू पाहात असतात. मला अजूनही आठवते ती पावसातली चिंब भिजरी पहाट. धो धो कोसळणारा पाऊस समस्त चराचरात बेभान होऊन कोसळत असतो. तेव्हा ती पावसाळी पहाट काळपट ओलसर धुक्यात चिंब न्हात असते. वारा बेहोश होऊन वृक्षलतांशी झोंबत मिलनाचे चिंब ओले गीत गात असतो. मनाला भुरळ घालणारं हे दृश्य खिडकीतून पाहताच मी ही माझं देहभान विसरून पाऊस होऊन जातो काही क्षणांसाठी..! तेव्हा अलगतचं सुमधुर मराठी भावगीतांची गुंजारव मनातून स्फुरत अलवार ओठांवरती तरारू लागते. मग मात्र मला गुणगुणल्या वाचून राहवत नाही.
श्रावणातली रिमझिमणारी ती ओली पहाट माझ्यातला कवी जागा करून जाते. कधीकधी खिडकीच्या बाहेर डोकावत असताना ही भिजरी पहाट मला काव्यलेखनाची साद घालत नवी ऊर्मी देऊन जाते. अन् मी लिहीत सुटतो सुसाट वेगाने. आभाळातून टिपटिपणाऱ्या पावसाची रिमझिम गाणी सोबतच खळखळणाऱ्या पाण्याच्या झरझरणाऱ्या वाऱ्याच्या ओलसर कविता. म्हणूनच कदाचित पावसातली ती झिम्माड ओली पहाट मी केव्हाच विसरू शकत नाही.
मनोभाव श्रावण संपून शिशिराची चाहूल लागलेली असते. त्याचबरोबर पहाटदेखील आपलं शीतल व लोभस रूप धारण करून समस्त चराचरातील प्राणिमात्रांना आत्यंतिक सुंदर भुरळ घालू लागते. काकड आरतीचे सूर मंदिरात उमटू लागतात. वातावरणातली शीतलता तिच्या चरण सीमेवर पोहोचलेली असते. पांढऱ्याशुभ्र धुक्यांची दाट चादर सगळीकडे पसरलेली असते. वृक्षलता ओलसर दवांनी चिंब भिजून गेल्या असतात. शेताकडे जाणाऱ्या हिरव्यकंच वळणवाटा या दाट धुक्यात धूसर झालेल्या असतात. पहाटेचे हिमतुषार समस्त वातावरणात चैतन्य पसरवीत मनाला अधिकचं प्रसन्न करीत असतात. पहाट आपल्या सुंदरतेच्या चरण सीमेवर पोहोचलेली असते. शिशिरातल्या याचं गुलाबी थंडीत तिचं मनोवेधक सौंदर्य अधिकच आकर्षित व मंत्रमुग्ध करून जाते. शरदाच्या आगमनासवे पहाटेची पानगळती सृष्टीला नवंरूप व नवचैतन्य प्रदान करण्यास सज्ज झालेली असते.
अलगदचं वसंताची चाहूल लागताच पहाटदेखील पळस फुलांच्या रंगात बेधुंद भिजून जाते. वृक्षांच्या नवफुलोरांनी व कोवळ्या हिरव्या पानांनी वसंतातली हिच पहाट अनेक रंग उधळू लागते. तेव्हा तिचे अद्भुत लावण्य चराचराला गंधित करून जाते. पहाटे उठणाऱ्या चिवचिवत्या पक्ष्यांचे मधुर सूर अन् कोकिळेचे मनमोहक कोकिळगान वसंतगुलाल उधळीत चौफेर निनादू लागतात. सृष्टीतल्या विविधांगी रूपांतून ऋतुचक्रावर स्वार होऊन पहाट आपल्या बहुरंगी सौंदर्याचा परिचय समस्त प्राणिजनांना देत असते.
विविध रूपातील पहाटेचं हे अप्रतिम लावण्य मी कायमचं साठवत आलोय माझ्या हृदयस्थ साठ्यात एक अद्भुत नैसर्गिक देणं म्हणून. आयुष्यात जगण्याची नवी उमेद देण्याचे काम हीच मनोरम्य पहाट अतिशय खुबीने करत असते. तेव्हा ऋतुचक्रासवे होत असलेल्या पहाटेच्या या शाश्वत परिक्रमेकडे मी बघत राहतो माझ्या आश्वस्त नजरेतून जीवनाचा व जगण्याचा सुंदर शोध घेण्यासाठी.
– अनामिका