स्वीकार या शब्दामधला “स्व’ हा माझ्या काळजीचा आणि कुतुहलाचा विषय आहे. काळजी यासाठी की त्यात काळीज आहे. कुतूहल यासाठी की यात नियतीनं माझ्यावर सोपवलेली जबाबदारी आहे. मी काळीज वापरून घेतलेली जबाबदारी ही माझी माझ्याशी असलेली बांधीलकी आहे.
आपण जन्माला येतो तेव्हा हा स्वीकार नसतो तर ती अपरिहार्यता असते, पण एकदा जन्माला आलो की स्वीकारपासून आपण लांब जाऊ शकत नाही. आपण जसे आहोत तसे आपल्या आईवडिलांनी आपल्याला स्वीकारलेलं असतं. त्याचबरोबर आईवडील हेही आपण स्वीकारलेले असतात. वंशवृद्धीसाठी आपण मुलं जन्माला घालतो तीही जशी आहेत तशी आपल्याला स्वीकारावी लागतात आणि मुलांनाही आपल्याला स्वीकारावं लागतं. एकूणच आपल्या अवतीभोवतीची नाती जी जन्मानं तयार झालीत ती आपल्याला स्वीकारावी लागतात.
नाती स्वीकारण्याचा प्रवास हा मात्र कुतुहलाचा भाग आहे. या प्रवासातील भल्याबुऱ्या घटना आणि परिणाम हे भोगायचे असतात. हे परिणाम आपण स्वीकारणं हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतो. यातून आपली प्रतिमा उन्नत होते तशी मलिनही होते.
वय जाणतं होईपर्यंत आपण जे शिक्षण घेतो ते आपण स्वीकारलेलं नसतं तर जगरहाटी आणि सामाजिक परिस्थिती किंवा सरकारी धोरण यांनी ते आपल्यावर लादलेलं असतं. परंतु शालेय शिक्षणानंतरचं शिक्षण हे मात्र आपण जाणीवपूर्वक स्वीकारलेलं असतं. शालेय शिक्षण संपलं तरीही पुढं काय शिकायचं हे नेमकं ठरविण्याचं स्वातंत्रय आणि वय आपलं असतंच असं नाही. पालकांची इच्छा आर्थिक स्थिती तगून राहण्याचे सायास या चौकटीत ते ठरवावं लागतं. तरीही त्यात स्वातंत्र्याची शक्यता बरीच असते. जे काही शिक्षण घेतलंय त्यावर आधारित नोकरी किंवा व्यवसाय निवडीचं भान आणि समजूतदारपणा जर आपल्या व्यक्तिमत्वात निर्माण झाला असेल तर हा स्वीकार साजिरा होतो अन्यथा फरपट हा स्थायीभाव होतो. या टप्प्यावर मात्र आपल्या जगण्यामधलं कुतूहल हा घटक जास्त परिणामकारक ठरतो.
नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं आपल्याभोवती माणसं आणि त्यांची आपल्याशी नाती तयार होतात. त्यात निवडीचा भाग जास्त असतो. ही निवड योग्य झाली तर आपली करिअर बनते. ही फसली तर गोते खाणं सुरु होतं. जाणत्या वयापासून मृत्यूपर्यंत आपण मित्र तयार करतो, हे मित्रही आपलं जगणं ठरवतात. प्रत्येक मित्राचा स्वीकार ही मनोरंजक गोष्ट असते. सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांनी त्यांच्या जगण्याबद्दल केलेलं भाष्य मला खूप मोलाचं वाटतं.
एका मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेले शिरवळकर हे एरवी पठडीतलं जगले असते. परंतु स. प. महाविद्यालयाच्या कट्ट्यावर त्यांना जे मित्र मिळाले त्यांनी ही पारंपरिक चौकात मोडून काढली. हे मित्र रुढार्थानं वाया गेलेले होते. त्यांच्या सहवासात शिरवळकरही वाया जाण्याच्या पाऊलवाटेवर चालत राहिले; परंतु या मित्रांचा स्वीकार करताना या वाया जाण्याच्या पाऊलवाटेचा त्यांनी कुतुहलाने विचार केला आणि त्यात त्यांना आपला पिंड शोधता आला. या मित्रांच्या सहवासातून त्यांना अनेक कथा, कादंबऱ्यांचे विषय मिळाले. यातूनच दुनियादारी सारखी अप्रतिम कादंबरीची व सिनेमाची निर्मिती झाली. या लिखाणातून त्यांना त्यांचं व्यक्तिमत्त्व सापडत गेलं आणि सुप्रसिद्ध लेखक ही बिरुदावली मिळाली.
या मित्रांचा सहवास त्यांनी संस्कार लक्षात घेऊन टाळला असता तर 10 ते 5 या चक्रात ते अडकले असते. एक सामान्य आयुष्य त्यांना स्वीकारावं लागलं असतं. परंतु या मित्रांचा वाया जाण्याचा स्वभाव त्यांनी स्वतःमध्ये मुरवला आणि मिरवलाही. कुणी म्हणेल की त्यांना 10 ते 5 या चक्रातही स्वतःची करिअर करता आली असती व त्यातही ते ख्यातनाम झाले असते. पण तसं होणार नव्हतं कारण तो त्यांचा पिंड नव्हता. पिंड स्वीकारणं आणि स्वीकार केल्यानं पिंड बनणं ही आधी छापा की काटा या प्रश्नाचं विलोभनीय रूप आहे.
लग्नामध्ये पतीपत्नीचा स्वीकार ही निवड असते. हा स्वीकार नाईलाजानं केला की नवराबायको नात्यामधली कटुता, बावळटपणा स्वीकारायची सवय लागते. एकदा ही सवय अंगात भिनली की प्रत्येक समोर आलेली गोष्ट आपण स्वीकारत राहतो आणि स्वतःचा आत्मा गमावतो. हे नातं फुलवणं हे स्वीकार नकार या हिंदोळ्यात झुलत असतं. काही नाती फेकून द्यायची असतात हा संस्कार आपल्यावर होताना कधीच दिसत नाही. दिल्या घरी तू सुखी राहा हा मंत्र जपण्यात आपण उभं आयुष्य कोळपून टाकतो. हे नातं सुंदर बनवायचं असेल तर अनिता-अनिल अवचट किंवा सुनीताबाई- पु. ल. देशपांडे यांचं जगणं पाहावं. नवराबायको या नात्याचं सतत परीक्षण करत राहिलं तर ते नातं सुदृढ बनतं. पण परीक्षण न करता अपरिहार्यता म्हणून स्वीकारलं की फरपट सुरू होते. ही फरपट थांबविण्यासाठी घटस्फोट हा पर्याय असूनही आपण तो स्वीकारत नाही. जर हा पर्याय स्वीकारला तर आपलं आयुष्य भकास होईल ही भीती छळत राहते. पण ही भीती दूर सारून ती संधी आहे असं मानलं तर प्रश्न खूप सोपे होतात.
जन्माला येणं, नाती स्वीकारणं, शिक्षण व पेशा स्वीकारणं, मित्र स्वीकारणं, जोडीदार स्वीकारणं या टप्प्यावर आपण यशस्वी झालो अशी आपली पाठ आपण थोपटून घेतली. यामुळं आशावादी झालो, परंतु या गोष्टी मानसिक दौर्बल्यातून स्वीकारल्या तर कायम निराशावादी राहतो. हे सगळे टप्पे ओलांडून गेलं की लागते मृत्यूची चाहूल. येऊ घातलेला मृत्यू आपण टाळू शकत नाही पण अखेरचा हा प्रवास… टाळू शकत नाही पण त्याचं सौंदर्य अनुभवू शकतो. इच्छामरण हे आपण स्वीकारू असं मनाशी बजावलं तरी कायदा तसं करू देत नाही. आत्महत्या हा भेकडपणा असतोच पण ती करावी असं वाटत असूनही आपण हा विचार स्वीकारायला धजत नाही. ही निसर्गानं आपल्यावर केलेली कृपा आहे.
– दीपक पारखी