बाळू, शमी या उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी येऊन खूपच खूश होते. “खा, प्या, खेळा, वाचा नि नाचा’ हाच त्यांचा रोजचा एककलमी कार्यक्रम. गावाला येताना त्यांनी महिनाभर पुरतील एवढी मुंबईहून गोष्टींची, कवितांची पुस्तकं सोबत आणली होती.
आज उन्हाचा ताप. बापरे बाप. दुपारची वेळ. जेवणं आटोपल्यावर मामा, मामी, मामाची मुलं आणि बाळू,शमी लगेच पडवीत येऊन हवेला बसले. पण छे! वाऱ्याची साधी झुळूकही येत नव्हती. मामी पदराने चेहऱ्यावरचा घाम टिपत म्हणाली, हा वारा कुठे परागंदा होऊन बसलाय कुणास ठाऊक. तेवढ्यात मामेभावाचा गावचा मित्र म्हादू नेमका टपकला. “ये यंक्या, शेवंता, येता का रं गावच्या नदीत पवायला? आम्ही चाललोय बघ समदे’. मामा पटकन म्हणाला, “अरे नगा जाऊ नदीकडं. केवढा कचरा साचलाय नदीच्या पात्रात. नदीचं पाणीबी लय गढूळ झालंय. आता घरोघरी नळ झालेय.
कोण देतंय का त्या नदीकडं लक्ष? घेतंय का तिची काळजी? पूर्वी याच नदीच्या काठावरच संतोषीमातेचं देऊळ. देवळात येता जाता गावकऱ्यांच्या केवढ्या तरी फेऱ्या व्हायच्या. गावच्या या नदीला सारेच संतोषी नदी म्हणायचे. ती द्यायचीच साऱ्यांना आनंद, संतोष. माहेरवाशिणी, सासुरवाशिणी इथं नदी काठावर बसून तासन्तास सुखदुःख सांगत बसायच्या. त्यांच्या जीवनातल्या केवढ्या तरी हकीकती या नदीने ऐकल्या असतील. नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर मोठी झाडे होती. नदीचा परिसर केवढा सुंदर दिसायचा. नदीच्या काठावर घाट बांधलेले होते. आता ते झिजलेत सारे. पूर्वी त्या घाटाच्या पायऱ्या धावत चढण्यात उतरण्यात केवढी मोठी मौज असायची. मुलं नदीत डुंबायची, पोहायची.
श्रावणात, आषाढात नदीला हमखास पूर यायचा. नदीचं पाणी वाढायचं. तवा सगळ्या पायऱ्या पाण्याखाली यायच्या. पाणी वाढत वाढत देवळाच्या पायरीपर्यंत यायचं. जणू ते पाणी संतोषीमातेला वंदन करायलाच आलंय, असं वाटायचं आम्हाला. नदीच्या काठावर केवढे तरी रंगीत, वेगवेगळ्या वाटोळ्या आकाराचे दगड गवसायचे. गावच्या पोरांसोरांना तर छंदच लागला व्हता ते दगड गोळा करण्याचा. खूप भारी दिवस होते ते. आता पाऊसपाणीच न्हाय तर मग नदीला कुठून असणार पाणी. पाण्याशिवाय नदी लय केविलवाणी दिसतीय बघ.’ मामा हरवून गेला नदीची हकीकत सांगता सांगता. मग भानावर येत म्हणाला, “कबूल हाय उन्हाचा उकाडा घालवायला नदीत पोहणं चांगलं. पण आता नदी शुद्ध, स्वच्छ राहलीय कुठं? कुणीच नदीकडं जायचं नाय. बसा इथंच निवांत.’
मामाने तंबी दिल्यावर आता कसलं आलंय नदीवर जाणं. मामाच्या बोलण्यानं साऱ्यांचाच हिरमोड झाला. आता मुलांच्या गप्पा सुरू झाल्या. पोतडीतील पुस्तकं बाहेर आली. हा हा म्हणता मुलं वाचनात गढून गेली. बाळूचं मन मात्र वाचनात रमेना. नदीवर जावं, नदीशी बोलावं, असंच त्याला राहून राहून वाटत होतं.
दुसऱ्या दिवशी पहाटेचा वारा अंगावर घेत बाळू एकटाच घराबाहेर पडला. त्याने सरळ नदी गाठली. नदीच्या काठावरील एका दगडावर त्याने बैठक मारली. सगळीकडे शांत शांत. नदीच्या वाहत्या पाण्याचा आवाज ऐकण्यासाठी त्याचे मन खरंतर धडपडत होते. तेवढ्यात, “बाळू, ये बाळू…’ हा आवाज त्याच्या कानावर पडला. त्याने आजूबाजूला पाहिले. पण कुणीच दिसेना. ना कसली चाहूल. ना कुणाचे पाऊल. पुन्हा तोच आवाज, “बाळू, मला भेटायला आलास का रे? अरे, मी नदी बोलतेय. तू एवढा मला भेटायला आलास, वाटलं तुझ्याशी बोलावं. तुझ्याकडे मन मोकळं करावं.’ बाळू सरसावून बसला. कान मन एक करून तो ऐकू लागला. नदी म्हणाली, “बाळू, या गावच्या लोकांसाठी स्वच्छ गोड पाणी घेऊन मी दुरून न थकता, न थांबता धावत येते. पण आता खरोखरच माझ्यावर खंत करण्याची वेळ आली आहे.
बाळू, असं म्हणतात, “सरिता करिते का कधी खंत?’ पण बघ ना, आज माझ्या पात्रात किती कमी पाणी आहे. पाण्याशिवाय मी अपूर्णच रे. माझे खळाळतेपण थांबल्यावर मी श्वास तरी घेऊ कसा? पर्यावरणाचा समतोल ढासळतोय. गावात पाऊस येईनासा झालाय. पाऊस नाही मग नदीला पाणी मिळणार कुठून? लोकांनी देवळातील निर्माल्य प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधून त्या पिशव्या तशाच माझ्याकडे फेकल्या. गावातलं सांडपाणी माझ्याच पात्रात सोडलं. प्लॅस्टर ऑफ पॅरिसने तयार केलेल्या गणपतींचे विसर्जन माझ्याच पाण्यात केले. मग बाळू तूच सांग, माझं पाणी स्वच्छ कसं राहणार? वर तोंड करून हीच लोक उलट मलाच बोल लावतात.
“या नदीचं पाणी किती घाण!’ आहे की नाही चोराच्या उलट्या बोंबा.’ बोलता बोलता नदी गप्प झाली. तिने हुंदका दिला. बाळू हळहळला. नदीला म्हणाला, “नदीमाय, तुझं काम थोर आहे. तू सर्वांना जीवन देतेस. सारे गावकरी एक होऊन तुझं गेलेलं वैभव आम्ही पुन्हा तुला मिळवून देऊ. तुझ्या नदीच्या पात्रातला साठलेला कचरा सगळे मिळून काढू, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करू, कारखान्याचे घाण, सांडपाणी नदीत न सोडता त्याची योग्य विल्हेवाट लावू. नदीवरच कपडे धुणे, भांडी घासणे थांबवू. कचऱ्यापासून शेतीसाठी कंपोस्ट खत तयार करू. नदीचं पाणी दूषित होणार नाही याची काळजी घेऊ. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक माणसी झाड लावण्याचा संकल्प करू. मी तुला वचन देतो… …मामा बाळूला झोपेतून हलवून उठवत म्हणाला, “ये बाळू, अरे कुणाला दिलंस वचन?’ बाळू झोपेतून उठला. अरेच्चा, म्हणजे हे स्वप्न होतं तर. ते स्वप्न आता आपण सत्यात उतरवलंच पाहिजे.
एकनाथ आव्हाड