पुणे – पंधरवड्यापूर्वी राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला. पण, हे प्रमाण विक्रमी ठरले असून, त्याचा सर्वाधिक तडाखा कोकणाला बसला आहे. तर, संपूर्ण राज्याचा विचार करता या पावसाचे प्रमाण दरवर्षीच्या मार्चच्या तुलनेत तब्बल 53 टक्के अधिक नोंदवले गेले आहे.
राज्यात मार्चमध्ये सरासरी 6 मिलिमीटर पाऊस पडतो. यावर्षी मार्चच्या 30 दिवसांत 9.20 मिमी (सरासरीपेक्षा 53 टक्के जास्त) पावसाची नोंद झाली आहे. देशाच्या उत्तर-पश्चिमी भागात (हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानराज्यांचा प्रदेश) काही ठिकाणी पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव म्हणून मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्याचाच परिणाम महाराष्ट्रात जाणवला आणि पाऊस, गारपीट अशा भौगोलिक घटना घडल्या. या पूर्वमोसमी पावसाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला. त्यामुळे आंबा पिकावर परिणाम झाला. तर, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादनात घट झाली. मराठवाडा आणि विदर्भात कापूस, हरभरा आणि ऊसाच्या पिकालाही तडाखा सहन करावा लागला आहे.
पाऊस, गारपीट होण्याचे कारण…
राज्यात पंधरवड्यापूर्वी वादळ आणि गारपिटीसह पाऊस झाला. आपण याला वारा खंडितता म्हणतो. म्हणजे दोन विरुद्ध वारे एका ओळीत एकत्र येतात. या स्थितीत, हवा वाढेल आणि वातावरणात असलेल्या आर्द्रतेमुळे ढग तयार होतील. त्याचा परिणाम म्हणून गारपीट होऊन आणि पाऊस पडेल. अशीच परिस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवली आहे. अरबी समुद्रातून वाहणारे थंड व कोरडे वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे एके ठिकाणी एकत्र आले आणि त्यामुळे महाराष्ट्रात आणि गारपीट झाली, असे निरीक्षण हवामान विभागाने नोंदवले आहे.