आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराचा जो धडका लावला आहे तो पाहता त्याचा फटका सत्तारूढ भाजपालाही बसू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, ढिसाळ आणि मंदगतीने होणाऱ्या प्रचारामुळे कॉंग्रेस भाजपाला आव्हान देऊ शकते का, तसेच आपचे आव्हान पेलू शकते का, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रचार-प्रसार, रणनीतीमुळे गुजरातमध्ये आप कॉंग्रेसच्याही पुढे जाईल, असे दिसते. गुजरातमध्ये आतापर्यंत भाजपा आणि कॉंग्रेस या दोन पक्षांत लढत होत असे, आता मात्र आम आदमी पक्षाने या निवडणुकीत उडी घेतली असल्यामुळे ही तिरंगी लढत चुरसदार होणार आहे.
कॉंग्रेस तसेच आम आदमी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे गुजरातमध्ये विधान सभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षात लढत होणार, असे दिसते. जर भाजपाला 2024 मध्ये तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत यायचे असेल तर गुजरातची ही निवडणूक जिंकणे त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण ही निवडणूक जर भाजपाने जिंकली तर त्यांचे मनोधैर्य आणखी वाढून याचा मोठा गाजावाजा 2024 च्या निवडणुकीत करता येईल.
2001 मध्ये गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी सत्ता हातात घेतल्यापासून कॉंग्रेस सतत कमकुवत होत चालली आहे. गुजरातमध्ये पक्षाचे स्थान कायम ठेवण्यासाठी आता कॉंग्रेसला भाजपासोबतच “आप’लाही टक्कर द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे आपली ताकद वाढवण्यासाठी भाजपा आणि आप दोघेही कॉंग्रेसला मागे ढकलण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत आहेत. या त्रिकोणी लढ्यात तिसरा पक्ष म्हणून उतरलेल्या आप पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही. कारण 2017 च्या निवडुणकीत आपकडे एकही जागा नव्हती.
आपने चांगला प्रचारप्रसार केल्याचा थोडाफार फटका भाजपाला बसू शकतो. मात्र सध्या कॉंग्रेसच्या प्रचार-प्रसारातील ढिसाळ कामगिरीचा “आप’ला फायदा होऊन कॉंग्रसला नुकसान होऊ शकते. त्यामुळे “आप’ला आपले पाय रोवण्याची अधिक संधी निर्माण झाली आहे. या महिन्याच्या मध्यात गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबतच आचारसंहितासुद्धा लागू करण्यात येईल. त्यानंतर सत्तारूढ भाजपाला लोकमनावर प्रभाव पडेल असे कोणतेही काम करता येणार नाही. कोणत्याही समाजोपयोगी कार्यक्रमाची घोषणा, नव्या योजना, शासनातर्फे लोकप्रिय घोषणा, कोणतेही उद्घाटन करता येण्यावर मर्यादा येणार आहे.
भाजपा मागील 27 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तारूढ आहे. या दीर्घकाळात केवळ 17 महिन्यांचा अपवाद आहे. या दरम्यान बंडखोर शंकरसिंह वाघेला यांनी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता हस्तगत केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गुजरात हे गृहराज्य आहे. त्यामुळे ते कोणतीही संधी इतरांना देऊ इच्छित नाही. या कारणाने भाजपा नेत्यांचा एक पाय गुजरातमध्येच असतो. केंद्रात भाजपाचेच सरकार असल्यामुळे गुजरात सरकारला याचा पूर्ण फायदा उचलता येतो. लोकप्रिय घोषणा,
मोठमोठ्या योजना एवढेच नव्हे तर फ्लायओव्हर आणि फूटब्रिजचे उद्घाटनसुद्धा मोठा गाजावाजा करत केले जाते. सध्या भाजपाने आपल्या या कृतीत आणखी वेग वाढवला आहे कारण अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने येथे लढत देण्यासाठी उतरला आहे. “आप’ची न्यूज मीडिया आणि वृत्तपत्रांनी दखल घेतली असून बातम्यांमधूनसुद्धा आप लोकांपर्यंत पोहोचत आहे. कॉंग्रेसला त्रिकोणी लढतीत कडू अनुभव येत आहेत. कारण पंजाबमध्ये नुकतेच “आप’ने कॉंग्रेसला सत्तेतून खाली खेचले आहे आणि आता गुजरातमध्येसुद्धा आप कॉंग्रेसच्या समोर एक आव्हान म्हणून उभा राहिला आहे.
सध्या राहुल गांधी “भारत जोडो’ यात्रेत व्यस्त आहेत. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांच्या अनुमानानुसार पक्षाला आधार देण्यासाठी प्रियंका गांधी मैदानात उतरतील, असे दिसते. मात्र याबाबत कॉंग्रेस पक्षाकडून अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्या तुलनेत उशिरा मैदानात उतरलेल्या राहुल गांधी यांनी 5 सप्टेंबरला अहमदाबादमध्ये निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा केला. त्यांनी येथे 50 हजारांपेक्षा अधिक बूथ स्तरीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.
कॉंग्रेस पक्षाचे नेते यामुळे उत्साही आहेत की आजही राहुल गांधी पक्षासाठी गर्दी जमवण्यात यशस्वी ठरत आहेत. मात्र कॉंग्रेसची कन्यकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा गुजरातमधून जाणार नाही. पण या यात्रेदरम्यान त्यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद गुजरातसाठीसुद्धा महत्त्वाचा ठरणार, असे बोलले जात आहे. गुजरात कॉंग्रेसचे प्रवक्ता मनीष दोसी यांनी म्हटले की, होऊ घातलेल्या निवडणुकांमुळेच जाणूनबुजून भारत जोडो यात्रेत गुजरात सामिल केले गेले नाही. कारण या यात्रेचे लक्ष्य निवडणुका नसून “पवित्र’ राष्ट्रीय लक्ष्य आहे.
पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी 24 ऑगस्टला अहमदाबादमध्ये निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. कॉंग्रेसने महाराष्ट्र, राजस्थान व छत्तीसगडमधून सात कार्यकारी अध्यक्ष बनविले आहे. त्यांच्याकडे राज्यातील 26 लोकसभेच्या जागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासोबतच गुजरातचे प्रभारी रघू शर्मा यांच्या मदतीला चार नेते सोबत दिले आहेत. गुजरातचे सध्याचे प्रभारी रघू शर्मा यांच्यानुसार, कॉंग्रेसने राज्यातील एकूण 182 जागांपैकी 125 जागांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार, हे घोषित करण्यात आलेले नाही. “आम्ही सामूहिक संघर्ष करणार’, असे शर्मा म्हणाले आहेत.
पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता शक्तिसिंह गोहिल मात्र आपणच गुजरातमध्ये बाजी मारणार असा दावा करीत आहेत. येथील लढत प्रामुख्याने कॉंग्रेस आणि भाजपमध्येच होणार आहे. “आप’चा या निवडणुकीत फारसा प्रभाव पडणार नाही. कारण गुजरातमध्ये आजपर्यंत कोणत्याही तिसऱ्या पक्षाला विजय मिळवता आला नाही. ही बाब विशेष लक्ष्यवेधी आहे, भाजप किंवा कॉंग्रेसच गुजरातची सत्ता मिळवू शकतात. चिमनभाई पटेल यांची किसान मजदूर लोक पक्ष, शंकलसिंह वाघेला यांचा राष्ट्रीय जनता पक्ष, जन विकल्प आणि प्रजाशक्ती डेमोक्रेटिक पक्ष तसेच केशूभाई पटेल यांच्या गुजरात परिवर्तन पक्ष अशा विविध पक्षांना यशस्वी होता आलेले नाही. मात्र आप या सर्व पक्षांपेक्षा वेगळा आहे. कारण “आप’ने ज्या प्रकारे प्रचाराचा वेग वाढवला आहे तो पाहता आणि लोकांचा “आप’ला मिळणारा प्रतिसाद पाहता आपसुद्धा भरारी घेईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आप भाजपाला धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे आपकडे दर्लक्ष करणे भाजपाला महागात पडू शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः गुजरातच्या निवडणुकीकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांनी 27 ऑगस्ट तसेच 29 सप्टेंबर या दोन दौऱ्यांदरम्यान भाजापाच्या निवडणुकीच्या तयारीबाबत विस्तृत चर्चा केली. भाजप आणि आपद्वारे कॉंग्रेसवर निशाणा साधला जात आहे त्यामागचे कारण म्हणजे सौराष्ट्र-कच्छ क्षेत्रात मागील निवडणुकीत एकूण 54 जागांपैकी 30 जागांवर कॉंग्रेसने विजय मिळविला आहे. त्यामुळे विधानसभेत कॉंग्रेस आमदारांची संख्या 78 वर पोहोचली होती. सुरुवातीला भाजपाकडे 182 जागांपैकी केवळ 99 जागा मिळाल्या होत्या. ही संख्या 2001 मध्ये मोदी मुख्यमंत्री बनल्यानंतर आतापर्यंतची सर्वात कमी आहे. विशेष म्हणजे भाजपाला सौराष्ट्र-कच्छमध्ये 2012मध्ये 35 जागा मिळाल्या होत्या मात्र 2017 मध्ये यात घट होऊन केवळ 23 जागा मिळाल्या.
निवडणुकीनंतरच समजेल की, विरोधी मते भाजपाला मिळणार की, कॉंग्रेस आणि “आप’ला विभागून मिळणार. उत्तर गुजरातमध्ये भाजपा आणि कॉंग्रेसने 2017मध्ये अनुक्रमे 32 व 21 जागा मिळवल्या. दक्षिण गुजरातमध्ये भाजपाला मात्र फटका बसला. तेथे 35 पैकी 25 जागा मिळाल्या विशेष म्हणजे 2012 मध्ये येथे 28 जागा मिळाल्या होत्या. कॉंग्रेसला मात्र भरपूर जागांमध्ये वाढ करता आली. 6 जागांवरून त्यांनी 10 जागांवर मजल मारली. मध्य गुजरातमध्ये भाजपाला 40 पैकी 25 जागा मिळाल्या, तर कॉंग्रेसच्या जागा 13 वरून कमी होऊन 5 झाल्या. मागील निवडणुकीत पाटीदार समाजाच्या नाराजीचा फायदा कॉंग्रेसला झाला होता. मात्र 2022 मध्ये पाटीदार समाजाची नाराजी कॉंग्रेसच्या मदतीला धावून येणार नाही, असे दिसते. तरीदेखील महागाई, शेतकऱ्यांचा असंतोष यामुळे ग्रामीण भागात भाजपाला फटका बसू शकतो. तर भाजपाची लोकप्रियता शहरी भागात कायम असल्याचे दिसून येते.
“आप’ने आकर्षक घोषणांचा पाऊसच पाडला आहे. त्यामध्ये प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज, सरकारी शाळांमध्ये मोफत शिक्षण, बेरोजगारी भत्ता तसेच महिलांना प्रत्येक महिन्याला 1 हजार रुपये भत्ता अशी आश्वासने देण्यात आली आहेत. कॉंग्रेसनेसुद्धा या घोषणांसोबतच अन्य घोषणाही केल्या आहेत. त्यात एलपीजी सिलिंडर 500 रुपयांत, कोविड पीडितांना 4 लाख रुपये, शेतकऱ्यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, अशी आश्वासने देण्यात आली आहे. ही आश्वासने प्रत्यक्ष मतदानावेळी किती प्रभावी ठरतात, हे निकालानंतर दिसून येईल. कॉंग्रेसला मात्र जीव ओतून निवडणुकीचा प्रचार करावा लागणार आहे, तरच भाजपा आणि आपच्या आव्हानांना रोखता येणार आहे.
– विनिता शाह