चाळीशीनंतर आजकाल कानाच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. आपल्या शरीराचा महत्वाचा अवयव म्हणजे कान. कान नसते तर ही कल्पना तरी करुन बघा कशी वाटते ती! कान नसते तर माणसं परस्परांशी संवाद साधू शकली नसती. जगात काय चाललंय ते ऐकू शकली नसती. शब्दांची ओळखच न झाल्यामुळे बोलताही आले नसते. अशा महत्वाच्या अवयवाची रचना व कार्य आपण पाहूयात.
कानाचे तीन भाग असतात. चेहऱ्याच्या बाजूला दिसतो तो बहिःकर्ण. म्हणजे आवाज साठवून आपल्या कानाच्या पडदयाकडे पाठवणारा भाग. हा पडदा पातळ पापुद्रयासारखा असतो. तो ध्वनीलहरी झेलून आत पाठवतो.
त्यामागे असतो तो मध्यकर्ण. त्यातली छोटी यंत्रणा या ध्वनीलहरी 22 पटीनं मोठया करून अंतकर्णाकडे पाठवते. तिथं असणाऱ्या छोट्याशा शंखासारख्या यंत्रणेतून ध्वनीलहरी कर्णनसेव्दारे मेंदूकडे जातात. तिथे त्याचे पृथक्करण होऊन माणसाला ध्वनीचे अचूक ज्ञान होते.
याखेरीज काही ध्वनीलहरी कानाभोवतालच्या हाडातून मेंदूकडे पोहचतात म्हणूनच बहिरेपणा आला तर ध्वनीचे नर्व्ह टेस्टींग आणि बोन टेस्टींग करावे लागते. अंतकर्णातल्या शंखात पाणी असते . ध्वनीवहनाखेरीज माणसाचा तोल जाऊ लागला वा वारंवार चक्कर येऊ लागली तर तज्ञ डॉक्टर्स ही यंत्रणा तपासतात. यातलं पाणी जास्ती झाले अथवा त्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात गेले तर माणसाला घाम फुटतो,चक्कर येते आणि उलटी होते. याला मोशन सिकनेस म्हण्तात.
कानाच्या पडद्याला इजा पोहोचणं ही कानाची महत्चाची व्याधी. कानात जंतू शिरल्याने कान खाजू लागला की किंवा कानातला मळ काढण्यासाठी आपण कानात काडी किंवा पिन घालतो ते फार चुकीचे आहे. त्यामुळे पडद्याला भोक पडण्याची शक्यता असते. चाळीशीनंतर वेळ जात नसला की कानात बोटे घालणे, मळ ओरबाडून काढणे, पेन, पेन्सिली घालणे असले प्रकार अगदी सुशिक्षित लोकसुद्धा अगदी बोलता बोलता करता आणि मग बसतात कान धरून. त्याचप्रमाणे मोठ्याने टि.व्ही लावणे, सांऊड सीस्टीमच्या डान्सिंग पार्ट्या चाळीशीपूर्वी गोड वाटतात पण नंतर मात्र कानाचे पडदे फाटण्याची भिती निर्माण होते.
सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यानांही बहिरेपण आल्याची उदाहरणे आहेत. मोठमोठ्या मल्टिफ्लेक्स थिअटरमध्ये वारंवार सिनेमाला जाण्यामुळे चाळीशीनंतर एकदम मोठ्यांदी बोलायला लागते कारण हळूहळू आवाजातील गोष्टी कान ग्रहण करणासा होतो. ध्वनीप्रदूषणाचे दुष्परिणाम चाळीशीनंतर गंभीर स्वरूप धारण करते आणि अकाली बहिरेपणा येतो. हे प्रकार अत्यंत घातक आहेत. त्याऐवजी तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ती औषधे वापरावीत.
पडदा फाटला तर बहिरेपणा येऊ शकतो. मध्यकर्णा आणि घसा यांना जोडणारी नलिका म्हणजे युस्टॅशियन टयूब. घसा धरणे,सर्दी होणे, टॉन्सिल्स फुगणे यामुळे युस्टॅशियन टयूबमधून जंतू मध्य कर्णात शिरतात आणि तो दूषित होतो. वेळीच उपचार केले तर ही व्याधी पूर्णा बरी होते. अन्यथा, मध्यकर्णात पाणी होऊन पुढे त्यात पू होऊ शकतो. तो पू पडद्याला भोक पाडून ताबडतोब कानाबाहेर काढला नाही तर मेंदूपर्यंत पोहोचतो. या आजारात माणूस दगावण्याचीही शक्यता असते. ध्वनीप्रदूषण हा कानाचा सर्वात मोठा शत्रू आहे. हल्ली सगळीकडे कानठळ्या बसवणाऱ्या म्युझिकचा मारा केला जातो त्यामुळे श्रवणयंत्रणा खराब होऊन माणूस बहिरा होऊ शकतो म्हणून ध्वनीप्रदूषणाला आळा घालणे आणि कानाची काळजी घेणे फार महत्वाचे आहे.
योग्य आयुर्वेदिक सल्ला कान ठिक असतानाचा चाळशीत प्रवेश केल्यावर घ्यावा. कानात शुद्ध खोबरेलतेल कोमट करून आठवड्यातून एकदा घालावे. त्यामुळे कोरडा पडलेला कोरडा घट्ट मळ ओला होतो व तो अलगद कापसाच्या काडीवर अलगद निघून येतो. तसेच रोज कर्णभ्रमरी हा प्राणायामाचा प्रकार चाळीशीनंतर रोज करावा. कोमट खोबरेलतेलात दोन्ही हातांच्या तर्जन्या बुडवून ती बोटे कानामध्ये घालून हलक्या हाताने गोल फिरवत कानाला गोल गोल मसाज हा आठवड्यातून चार ते पाच वेळा करावा. ध्वनीप्रदूषणापासून लांब रहावे. किंचाळून, ओरडून बोलू नये. चाळीशीनंतर शांत व डोक्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने जीवन जगायची सवय स्वतःला आणि आपल्या कानांना लावावी. म्हणजे लगेच बहिरेपण येणार नाही. तसेच काही योगोपचार नियमित करण्याची सवय लावली असता बहिरेपणावर मात करता येते.
महिलांना लठ्ठपणामुळे बहिरेपणा…
लठ्ठपणामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्या तरी त्याचा महिलांना जास्त त्रास होत असल्याचे दिसून येत असते. लठ्ठपणामुळे शरीराच्या अंतर्गत होत असलेल्या परिणामांबरोबरच आता बाह्य परिणामही दिसून येऊ लागले आहेत. परंतु कसून व्यायाम केल्याने लठ्ठपणासोबत बहिरेपणाचाही धोका टाळता येऊ शकतो. बऱ्याचदा आपल्याला येणारा बहिरेपणा हा वाढत्या वयानुसार येत असल्याचे समजून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण हा बहिरेपणा शरीरातील वाढत्या लठ्ठपणामुळे येत असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. उत्तम आरोग्य व शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिल्यास या बहिरेपणावर मात करता येऊ शकते, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.
महिलांच्या शरीराच्या वस्तुमानाचे मोजमाप करणाऱ्या बॉडी मास इंडेक्सची (बीएमआय) मोजणी केली असता, ज्या महिलांचे बीएमआय 30 ते 34 इतके होते त्यांच्यामध्ये 17 टक्क्यांपर्यंत तर बीएमआय 40 पेक्षा जास्त असलेल्या महिलांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा जास्त बहिरेपणा असल्याचे दिसून आले. तसेच 80 ते 88 सेमी इतका कमरेचा घेर असलेल्या महिलांमध्ये 11 टक्के, तर 88 सेमीपेक्षा जास्त घेर असणाऱ्या महिलांमध्ये 27 टक्क्यांपेक्षा अधिक बहिरेपणा असल्याचे दिसून आले.
तसेच रोज ठरावीक व्यायाम करणाऱ्या महिलांमध्ये बहिरेपणाचा धोका कमी असल्याचेही संशोधनात उघड झाले आहे. आठवडाभरात रोज दोन तास चालणाऱ्या महिलांमध्ये एक तास चालणाऱ्या महिलांपेक्षा 15 टक्के बहिरेपणाचा धोका कमी असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगामध्ये 360 दशलक्ष लोक हे वाढत्या शरीरामुळे बहिरेपणाचे बळी ठरलेले आहेत. हे संशोधन अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.