परीक्षांचा काळ संपताच आता क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे पेव फुटले आहे. जागतिक स्तरावर ज्या क्रीडा प्रकारांना सर्वात जास्त लोकप्रियता आहे त्याच खेळांपासून ते अगदी लहान सहान खेळांचीही प्रशिक्षण शिबिरे आता सुरू झाली आहेत. प्रश्न वेगळाच आहे तो हा की, गल्लोगल्ली (म्हणजे सर्व शहरांतील सगळ्याच मैदानांवर) सुरू झालेल्या या शिबिरांची उत्पादन क्षमता काय व त्याची गुणवत्ता काय?
भारतात क्रिकेट हा एकच खेळ मानला जातो. या खेळात तर धावांसारखी पैशांचीही लयलूट असते. एक सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली लोकप्रिय होतो व आपल्या मुलानेही त्यांच्यासारखेच मोठे खेळाडू बनावे म्हणून शेकडो रुपये पाण्यासारखे ओतणारे पालक याच देशात पाहायला मिळतात. क्रिकेट एक उदाहरण दिले जात असले तरीही आता ऑलिम्पिक खेळांनाही व प्रशिक्षकांसह या खेळांच्या प्रशिक्षण शिबिरांनाही सुगीने दिवस आले आहेत. त्यामुळे उन्हाळी शिबिरापासून सुरू झालेल्या या दुकानांचे मॉल कधी झाले ते पण आपल्या लक्षात आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
मात्र, या अशा शिबिरांतून आपल्या जिल्ह्याला, राज्याला किंवा देशाला किती गुणवान खेळाडू मिळाले व त्यांनी काय कामगिरी केली तिचा अभ्यास केला तर बेरजेचे गणित निश्चितच चुकते. अशा शिबिरांमध्ये सराव करत असलेल्या व प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंना स्थैर्य यावे यासाठी काय प्रयत्न केले जातात यावर न बोललेलेच बरे. परंतु एक गोष्ट निश्चित की, अशी शिबिरे रोखण्यापेक्षा त्यांना स्थानिक प्रशासनाचाही पाठिंबा लाभला तर खेळाडूंची गुणवत्ता सिद्ध होईल, त्यांना नवनवे व्यासपीठ लाभेल व खऱ्या अर्थाने दर्जेदार उत्पादन मिळेल.
क्रिकेट एके क्रिकेट कशासाठी?
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर सर्वात जास्त प्रशिक्षण शिबिरे क्रिकेटचीच असतात. त्यात वय वर्षे 8 ते पुढे कितीही वयाची मुले आपल्या आवडीला व्यावसायिक स्वरूप यावे यासाठी धडपडत असतात. त्यांच्या प्रशिक्षणासाठी उन्हाळी शिबिरात विविध क्लब 3 ते 4 हजार रुपये दर महिना असे शुल्क आकारतात. यातील ज्या खेळाडूंकडे टच असतो त्यांना वर्षभरासाठी त्यांच्याच क्लबमध्ये संधी देतात व वर्षभरासाठी त्यांच्याकडून किमान 20 ते 25 हजार रुपयांची कमाई करतात. आत 8 वर्षांचा मुलगा पहिल्यांदा अशा शिबिरात आला तर त्याच्याकडे फारसे लक्ष देता येत नाही, कारण खेळाडूंची संख्या मोठी असते. मात्र, असाच क्रिकेटिंग टच असलेला मुलगा याच शिबिरातून वर्षभराच्या प्रशिक्षण शिबिरात आला तर मात्र त्याच्याकडे पुरेपूर लक्ष दिले जाते.
परंतु प्रश्न आहे की त्याला खेळण्याची संधी किती मिळते. त्यातही देशातील जवळपास सर्वच जिल्हा व राज्य संघटनांच्या स्पर्धांची संख्या खूपच कमी होताना दिसते. त्यातही वर्षभराच्या शिबिरांतही खेळाडूंची संख्या किमान तीन ते चार संघ तयार करता येतील इतकी असतेच. म्हणजे किती जणांना प्रत्यक्ष संघात संधी मिळते व त्यात त्यांना किती सामने खेळायला मिळतात व त्यात ते कशी कामगिरी करतात हे सगळे प्रश्न सातत्याने भेडसावतात. केवळ क्रिकेटची क्रेझ म्हणून याच खेळाकडे वळण्यापेक्षा अन्य खेळांमध्येही कारकीर्द घडवता येते, हे लक्षात घेतले गेले पाहिजे. केवळ क्रिकेटच का अन्य खेळांतही अनेक खेळाडू पुढे येत आहेत, त्यांचा आदर्श घ्या. क्रिकेटमध्ये पैसा आहे; पण तो आंतरराष्ट्रीय किंवा प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये. गल्लीबोळात चालत असलेल्या क्रिकेटमध्ये चेंडू आणण्यासाठीही वर्गणी गोळा करावी लागते.
ड्रॉपआउट होऊ नये
अनेकदा भारतीय क्रीडा क्षेत्राला सर्वाधिक फटका बसतो तो खेळाडूंच्या ड्रॉपआउटमुळे. आपल्याकडे शिक्षण पद्धतीचा इतका अतिरेक झाला आहे की आपण क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवू शकतो हा विश्वास कोणत्याही खेळाडूमध्ये किंवा त्याच्या पालकांमध्ये दिसत नाही. केवळ परीक्षा संपल्या व घरी बसून पाल्य सतत त्रास देत राहण्यापेक्षा चार पैसे खर्च करून त्याला अशा शिबिरांमध्ये घालण्याचाच कल जास्त आहे. खूप कमी खेळाडू किंवा पालक आहेत की ज्यांना आपण किंवा आपला पाल्य खेळात कारकीर्द घडवेल व यशस्वी ठरेल, असा विश्वास असतो. सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत तर सानिया मिर्झापासून अंकिता रैनापर्यंत सगळ्या खेळाडूंनी हे सिद्ध केले आहे. मात्र, ड्रॉपआउट ही आपल्या क्रीडा क्षेत्राला लागलेली वाळवी आहे व त्याचा निचरा जोवर होत नाही तोवर आपल्या देशाच्या एकूण क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी यश दिसणार नाही.
मुलगा किंवा मुलगी दहावी किंवा बारावीला असतील तर त्यांचे खेळ थांबवले जातात. या परीक्षा संपल्या की त्यांचा महाविद्यालयीन प्रवास सुरू होतो व खेळाडू परदेशी जाण्यासाठी विद्यार्थी बनून एमएस करतो. बक्कळ पैसा कमावण्याच्या प्रयत्नात त्याच्यातील खेळाडू मागे राहतो. मग त्याचा विवाह होतो व तो त्याच्या मुलाला किंवा मुलीला त्याच्या क्रीडाक्षेत्रातील कामगिरीच्या कथा सांगतो व मी आज कुठे असतो वगैरे बाताही मारतो. यावेळी तो स्वतःलाच फसवत असतो हे त्याच्या लक्षातच येत नाही. अभ्यास किवा शैक्षणिक पदवी आवश्यकच आहे कारण खेळात अपयशी ठरलो तर पोटापाण्यासाठी वणवण करावी लागत नाही. पण स्वतःला एक खेळाडू म्हणून आधी सिद्ध करून पहायला काय हरकत आहे. एका बाजूला खेळ तर दुसऱ्या बाजूला शिक्षण करायला काहीही हरकत नाही. हल्ली तर काय याला मल्टिटास्किंग म्हणतातच की. फक्त ड्रॉपआउट होऊ नये इतकेच.
सुविधा व मार्गही आहे
केवळ खेळाडू म्हणूनच यशस्वी होता येते असे नाही तर खेळाशी संबंधित विविध क्षेत्रे आता भारतातही उपलब्ध आहेत की, ज्यातून आपण आपले आयुष्य स्थिर करू शकतो. प्रशिक्षक, आहारतज्ज्ञ, संगणकित विश्लेषक, फिजीओ, मार्गदर्शक, सल्लागार, क्रीडावैद्यकशास्त्र, क्रीडातज्ज्ञ असे विविध अभ्यासक्रमही आता संपूर्ण देशभरात विविध संस्थांमध्ये तसेच विद्यापीठांमध्येही सुरू झाले आहेत. खेळत असताना आपल्याला निश्चितच समजते की आपण कुठवर जाऊ शकतो. एकदा जर लक्षात आले की आपण फार मोठी मजल मारणार नाही, तर मग या क्षेत्रांत पाऊल ठेवले तर त्यातूनही बक्कळ कमाई होऊ शकते. एक आयपीएल संघासाठी किती जणांचा सपोर्ट स्टाफ असतो व त्यांना किती प्रचंड मानधन मिळते त्याचे आकडे पाहिले तरीही भोवळ येईल. आंतरराष्ट्रीय सामन्यासाठीही भारतीय संघासाठी इतका मोठा सपोर्ट स्टाफ नसतो हे विशेष. असो, विषय शिबिरांचा आहे व त्यातून केवळ आणि केवळ गुणवत्ताच पुढे यावी यासाठी जे काही करणे शक्य आहे ते केले जावे. केवळ पैसा कमावण्याचे साधन म्हणून न पाहता आपल्याला जे यश मिळू शकले नाही ते आपल्याकडे प्रशिक्षण घेत असलेल्या आपल्या शिष्याने मिळवावे हा हेतू ठेवला तरच या शिबिरांना व शिबिरांचे महत्त्व आबाधित राहील.
उत्पादन दर्जेदार असेल तर बाजारात कितीही मंदी असली तरी ते खपते हे जसे व्यापाराचे सूत्र आहे तसेच खेळाच्या बाबतीत प्रशिक्षक कोणीही असो तो रत्नपारखी असेल तर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नसलेल्या रमाकांत अचरेकर सरांच्या हातून सचिन तेंडुलकर घडतो हे लक्षात ठेवले पाहिजे. शिबिरे चालवणारे प्रशिक्षकच बनून राहू नयेत. आचरेकर सरही प्रशिक्षकच होते, पण सचिन, विनोद कांबळी, संजय मांजरेकर असे शिष्य घडवल्याने त्यांचा उल्लेख गुरू असा होतो. प्रशिक्षक ते गुरू हा प्रवास सोपा नाही. परंतु तो प्रवास करण्याचा हेतू निश्चित केला गेला, तर अशा शिबिरांतून सचिनसारखे शिष्य तर घडतीलच, परंतु त्या प्रशिक्षकाचाही गुरू म्हणून आदर केला जाईल.
ठरावीक खेळांवर भर द्या
क्रिकेटच्या बरोबरीने सध्या बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, फुटबॉल असे कितीतरी खेळ आहेत की ज्यांच्या शिबिरांत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षण देतात. त्यांचे शुक्ल जरी जास्त असले तरीही त्यात संधीही जास्त मिळते कारण या खेळांकडे वळणारे खेळाडू सध्यातरी कमी आहेत. बॅडमिंटन व फुटबॉलमध्ये हे प्रमाण आता वाढत असले तरीही त्याला क्रिकेटचे स्वरुप आलेले नाही. त्यातच दर्जेदार मैदाने तयार होत आहेत. आपल्या राज्यातच नव्हे तर अन्य राज्यांतही अनेक मैदानांवर सुसज्ज यंत्रणा व सुविधा निर्माण होताना दिसत आहेत. ऑलिम्पिक दर्जाची मैदाने, त्याच स्तरावरचे किंवा लेवल वन गटातील प्रशिक्षकही आता सहज उपलब्ध आहेत. मग केवळ क्रिकेट एके क्रिकेट होऊ नये. मुला-मुलींनी सुनील छेत्री, लक्ष्य सेन किंवा सध्याचा नवोदित प्रियांशु राजावत, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू किंवा मनिका बात्रा यांचेही आदर्श ठेवावेत. या खेळाडूंनीही क्रिकेट न निवडता वेगळे खेळ निवडले व त्यांचे नाव व त्यांची कामगिरी जगभरात पोहोचली. त्यांनीही आपली ओळख आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून प्रस्थापित केली. असे खेळ निवडायचे की त्यात केवळ कारकीर्दच घडली पाहिजे असे नाही, तर त्यातून आर्थिक स्थैर्यही मिळाले पाहिजे व नवोदितांनाही मार्गदर्शन करणे शक्य झाले पाहिजे.
अमित डोंगरे