कराड – कराड बाजार समितीचा विकास करण्यात सत्ताधारी गट सपशेल अपयशी ठरला आहे. या अपयशी सत्ताधाऱ्यांना हटवून मतदारांनी शेतकरी विकास पॅनेलला सत्ता द्यावी. येत्या काळात आम्ही कराड येथील बाजारासह उंब्रज, मसूर या उपबाजारांचाही सर्वांगीण विकास करुन दाखवू, अशी ग्वाही आ. बाळासाहेब पाटील यांनी दिली.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र पाल येथे श्री खंडोबाच्या साक्षीने करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बॅंकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवराज पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, प्रशांत यादव, सर्जेराव खंडाईत, भास्कर गोरे, बाळासाहेब निकम, फत्तेसिंह जाधव, नारायण शिंगाडे, महादेव पवार, हणमंतराव जाधव, पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, बाजार समितीत आम्ही सत्तेवर असताना, शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्या काळात आम्ही बाजार समितीचे उत्पन्न वाढवले होते. धान्य बाजारासाठी शेडदेखील उभारली. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने बाजार समितीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून, एकत्र आलो आहोत. कराड बाजार समितीला देशपातळीवर ओळख मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराडमध्ये भाजीपाला, टोमॅटो, सोयाबीन, गूळाची मोठी बाजारपेठ आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळवून देण्याची जबाबदारी असताना, सत्ताधाऱ्यांनी निव्वळ राजकारणासाठी बाजार समितीचा वापर केला. छोट्या सोसायट्या निर्माण करून, तिथे मतदार करायचे आणि आपले सत्तास्थान अबाधित ठेवायचे, असा सत्ताधाऱ्यांचा उद्योग आहे. या परिस्थितीत शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आ. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पॅनेलमध्ये आम्ही अनुभवी आणि काही तरुण उमेदवार दिले आहेत. लोकांनी प्रगतीच्या दिशेने वाट धरली असून, यंदा बाजार समितीत परिवर्तन अटळ आहे.
आनंदराव पाटील म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनवले आहे. शेजारच्या जिल्ह्यातील गोकुळ, राजारामबापू दूध संघाचा विस्तार झाला असताना; कोयना दूध संघ, खरेदी-विक्री संघ यांची परिस्थिती काय आहे? डॉ. सुरेश भोसले म्हणाले, समविचारी लोकांची नैसर्गिक युती म्हणजे शेतकरी विकास पॅनेल आहे. सत्ताधारी केवळ राजकारणाच्या गप्पा मारत आहेत. एढ्या मोठ्या कराड बाजार समितीची उलाढाल तुटपुंजी कशी? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे. आ. बाळासाहेब पाटील यांनी पुढाकार घेतल्याने यशाची खात्री आहे.
बाळासाहेबांनी साधला पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा
आज आम्ही विरोधात लढतोय म्हणून, आम्हाला प्रस्थापित म्हणून हिणवले जातेय; पण यापूर्वीच्या निवडणुकीत आमची मदत घेऊन पदे भोगली, त्यावेळी प्रस्थापितांची मदत कशी चालली? हे दुटप्पी वागणे बंद करा, अशा शब्दांत आ. पाटील यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
जितका प्रचार कराल, तितका तुमचा पराभव अटळ!
मी सहकारातील निवडणुकीत भाग घेत नाही, असे विधान आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी एका सभेत केले होते. त्याचा खरपूस समाचार घेताना डॉ. अतुल भोसले म्हणाले, ज्यांनी एखादी संस्था काढली नाही, ते सहकारात काय भाग घेणार? त्यांच्या पॅनेलच्या उमेदवारांनाही ते ओळखू शकत नाहीत. या निवडणुकीत ते जितका प्रचार करतील, तितके सत्ताधाऱ्यांचे पॅनेल पराभवाच्या जवळ पोहोचेल. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त प्रचार करावा.