आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून आता नवोदित खेळाडूंनाही कोट्यवधींचे करार मिळतात. यातूनच मग घमेंड नावाचा अत्यंत उपद्रवी घटक जन्माला येतो. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कधीही कोणालाही मिळत नाही, अशी म्हण या स्पर्धेने खोटी ठरवली आहे. आता नवोदितांनाही इतका प्रचंड पैसा मिळतो, तोदेखील वेळेच्या व नशिबाच्याही आधी. मग हाच अती पैसा घातक ठरतो.
वयाची विशीही गाठलेली नसलेले खेळाडू जेव्हा स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण धावा करतात तेव्हा ते आयपीएलच्या रडारवर येतात. यातूनच खरेतर त्यांची प्रगती सुरू होणे गरजेचे असते; परंतु काही खेळाडूंची सध्याची कारकीर्द पाहता त्यांच्याकडे अत्यंत कमी वयात आलेला पैसाच त्यांच्यासाठी घातक ठरला व त्यांची कारकीर्द फारशी यशस्वी ठरलेली नाही. आपल्याला करोडोंचे करार मिळाले या भ्रमात ते राहतात व त्यांची मानसिकता बदलते व परिणामी ते ज्या खेळामुळे मोठे झाले, श्रीमंत झाले ते विसरतात व अहंकारी बनतात. इथेच त्यांच्या कारकिर्दीला पूर्णविराम बसतो.
दिशाभूल होऊ नये
भारतीय क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंचा एक संघ जेव्हा मैदानावर सामना खेळत असतो तेव्हा हजारो खेळाडू या 11 खेळाडूंमध्ये कधी संधी मिळेल यासाठी घाम गाळत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेली युवा पिढी आयपीएलचे स्वप्न पाहात असते. या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत नावारुपाला आलेले खेळाडू पाहिले तर त्यांची कौटुंबिक स्थिती फारशी चांगली नसते. तरीही ते या परिस्थितीशी झगडा देत इथपर्यंत पोहोचतात.
यशाच्या शिखरावर असतानाही पाय जमिनीवर घट्ट ठेवणे यामुळेच काही खेळाडूंना जमत नाही व तिथेच घडी विस्कटते. केवळ आयपीएल नव्हे तर जगभारत सुरू असलेल्या विविध टी-20 क्रिकेट लीगमध्ये हेच चित्र कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळते. एखादा प्रशिक्षक किंवा सहकारी खेळाडूकडूनच दिशाभूल होण्याचा धोकाही असते. तोच आपल्याला चुकीच्या वाटेवरही घेऊन जात असतो. परंतु आपले नुकसान होईपर्यंत आपल्याला त्याची कल्पनाही येत नाही. या दिशाभुलीसारख्या प्रकारापासून युवा खेळाडूंनी दूर राहिले पाहिजे व आपल्या कारकिर्दीबाबत अत्यंत गंभीर असले पाहिजे.
पैसा उपयुक्त, परंतु धोकादायकही
आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या मोसमापासून मी पाहात आलो आहे की वेळेपूर्वी मिळालेला पैसा युवा खेळाडूंना खेळापासून भरकटवणारा ठरला आहे. त्यांना असे वाटते की आपल्यावर इतक्या मोठ्या रकमेची बोली लावली आहे म्हणजे आपण कोणीतरी मोठे खेळाडू आहोत. मात्र, आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली तसेच रोहित शर्मा नाही हे समजेपर्यंत त्यांची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर आलेली असते. आपले लक्ष सतत वेधून घेणे, कर्णधाराच्या पुढे पुढे करणे यामुळे सुरुवातीला काही लाभ होतो मात्र, जर गुणवत्ता प्रत्यक्ष मैदानावर दिसलीच नाही तर अशा हुजरेगिरीचा लाभ होत नाही, हे त्यांना खूप उशिरा लक्षात येते. लहान वयात मोठा क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहणे गैर नाही; पण जर संधी मिळाली तर स्वप्नातच जगत राहण्यापेक्षा आपल्या कामगिरीने ही स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मेहनतीला पर्याय नसतो.
जो खेळाडू हे जाणतो तोच टिकून राहतो, बाकीचे कधी मागे पडतात हे त्यांनाही कळत नाही. कारकीर्द घडवण्यासाठी तसेच आर्थिक तंगीतून बाहेर येत चांगली जीवनशैली मिळवण्यासाठी पैसा गरजेचा आहेच, परंतु मिळालेल्या पैशांचे योग्य नियोजन केले तरच त्याचा नंतर उपयोग होतो. विनाकारण महागड्या गाड्या व घरे घेणे, पार्ट्यांना उपस्थित राहणे, मद्यपान करणे ही पैसा उडवण्याची फॅशन झाली आहे. देशातील युवा खेळाडूंनी हे टाळले तर भारताला आयपीएलसारख्या स्पर्धांमधून भक्कम सेकंड बेंच निश्चितच मिळेल.
पृथ्वी शॉसारखे होऊ नये
सचिन तेंडुलकरचा वारसदार असे ज्याचे वर्णन केले जात होते तो पृथ्वी शॉ आज काय करत आहे? तो रणजीसह देशांतर्गत काही स्पर्धांमध्ये खेळत आहे तर दरवर्षी त्याला आयपीएल स्पर्धेतच जास्त अंकुर फुटलेला दिसतो. यंदा तोही फारसा दिसला नाही. एखाद्या सामन्यात त्याची खेळी होते बाकी सामन्यात तो हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी करतो व माघारी परततो. त्याच्याकडे सर्वकाही आहे. तंत्र आहे, दर्जा आहे, धमक आहे, कोणत्याही खेळपट्टीवर कोणत्याही गोलंदाजाची पिसे काढण्याची क्षमताही आहे. केवळ जिद्द नाही आणि अहंकारी वृत्तीमुळे आपले काही चुकत आहे हे देखील त्याला कधी कळले नाही. एखाद्या चांगल्या प्रशिक्षकाकडे जाऊन पुन्हा पहिल्यापासून धडे गिरवावे असेही कधी त्याला वाटले नाही. मध्यंतरी बंदी असलेले औषध घेतल्याने त्याच्यावर निलंबनाचीही कारवाई करण्यात आली होती. यातूनही त्याने काही बोध घेतल्याचे समोर येत नाही. त्याच्याबरोबरचे अन्य खेळाडू आज आयपीएलच नव्हे तर भारतीय संघातही स्थिरावलेले दिसतात. मग गुणवत्ता असूनही पृथ्वी का मागे पाडला यावर विचार केला तर सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी यांचे उदाहरण समोर येते. दर्जा दोघांकडेही होता किंबहुना विनोद सचिनपेक्षा जास्त सरस होता हे खुद्द त्यांचे गुरू रमाकांत आचरेकर सरही सांगायचे. परंतु संस्कार हा एकच फरक या दोघांमध्ये होता व तोच निर्णायक ठरला. पैसा जास्त आला म्हणून सचिन कधी पबमध्ये दिसला नाही. त्याने कधी घमेंड दाखवली नाही. बहराच्या काळात कोणाशी फटकून वागला नाही. जे काही सचिनने केले नाही ते सर्व विनोदने केले आणि आज सचिन जिथे आहे त्याच्या जवळपासही विनोद नाही. शॉ याच विनोदच्या मार्गावर प्रवास करत आहे.
वर्तन सुधारणे गरजेचे
कोणत्याही क्रिकेटपटूला लोकप्रिय होण्यासाठी जशी सातत्यपूर्ण कामगिरी करणे गरजेचे असते तसेच त्याचे वर्तनही चांगलेच असावे लागले. विराट कोहली आजच्या घडीचा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे, परंतु तो मीडिया फ्रेंडली नाही. त्यामुळे त्याच्यावरच टीकेचे बाण सोडले जातात. या उलट रोहित शर्मा मीडिया फ्रेंडली असल्याने तो अपयशी ठरत असतानाही त्याच्यावर कोहलीवर झाली तितकी टीका होताना दिसत नाही. हा व्यक्तींमधील व प्रवृत्तींमधील फरक असतो. कोहली माध्यमांसमोर कसा वागतो ते पाहा व रोहित कसा वागतो ते पाहा फरक आपोआप लक्षात येतो. रोहित संतापला तरीही मैदानाबाहेरचे त्याचे वर्तन कायम शांत राहिले आहे. कोहली मात्र मैदानावर जितका संतापलेला असतो त्याच्या दुप्पट तो ड्रेसिंगरुममध्ये थयथयाट करतो. कोणत्याही खेळाडूला चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनण्यासाठी खूप वर्षे लागतात, परंतु चाहत्यांच्या मनातून उतरण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो. नवोदित खेळाडू अशाच मोठ्या खेळाडूंकडे पाहात मोठे होतात; पण तिथे पोहोचण्यासाठी या खेळाडूंनी काय केले, कोणते त्याग केले ते पाहात नाहीत. ते पाहतात केवळ त्यांचे उच्च राहणीमान, त्यांची स्टाइल, त्यांचा फॅनबेस व त्यांच्या मागे निर्माण झालेले प्रसिद्धीचे व चाहत्यांच्या गर्दीचे वलय. मग दुसरे काय होणार.
पंड्या ब्रदर्सचे उदाहरण घ्या
जागतिक क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी अत्यंत गरिबीच्या झळा सोसलेल्या हार्दिक व कृणाल पंड्या या बंधूबाबत जनसामान्यांत मोठी उत्सुकता होती. केवळ काही दिवस मॅगी खाऊन दिवस काढले वरैगे बातम्या त्यावेळी झळकल्या होत्या. मात्र, रणजीसह देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली व त्यानंतर त्यांच्यासाठी भारतीय संघाची कवाडे खुली झाली तसेच पाठोपाठ आयपीएल स्पर्धेतील संघांनीही त्यांना करोडो रुपयांची बोली लावून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. त्यांचे दिवस बदलले. पैसा, पत, प्रतिष्ठा, मान-सन्मान सगळे काही मिळाले. जसे त्यांचे दिवस बदलले तसे त्यांचे वर्तनही पालटले. आज त्यांच्या चेहऱ्यावर तो निरागसपणा कुठेच दिसत नाही. उलट दिसतो तो प्रचंड अहंकार. संघातील वरिष्ठ खेळाडूंशीही त्यांचे वर्तन फटकून असते, अशा बातम्या सातत्याने वाचनात आल्या आहेत. कोणत्याही चागल्या मार्गदर्शकाशिवाय हाती आलेला प्रचंड पैसा किती नुकसान करू शकतो याची यांच्या व्यतिरिक्त खूप उदाहरणे देता येतील मात्र, यातून काय बोध घ्यायला ते नवोदित खेळाडूंनीच ठरवायला हवे. असो, वयाच्या विशीत किंवा पंसविशीत मिळालेला प्रचंड पैसा, लोकप्रियता, चाहत्यांचे प्रेम व दडपण आणि आपली स्वतःची इमेज व आपल्या कुटुंबियांची जबाबदारी कशी हाताळायची हे एकदा सचिन तेंडुलकरकडे पाहून शिकलं की बाकी प्रश्नच निर्माण होणार नाहीत.
अमित डोंगरे