फार पूर्वीपासून वक्तृत्व हा राजकीय जीवनाचा महत्त्वाचा भाग मानला गेला आहे. आणि व्यवहारात आजही तो तितकाच महत्त्वाचा आहे. सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत वक्तृत्वकलेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. परंतु राजकीय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, आपला प्रभाव वाढविण्यासाठी भाषणकलेला पर्याय नाही.
प्रभावी नेते नेहमी आपल्या उत्तम भाषणातून लोकांच्या हृदयावर राज्य करत असतात. चीनसारख्या विशाल राष्ट्रात साम्यवादी राजवट आणणाऱ्या साम्यवादी क्रांतीचे नेते माओ त्से तुंग यांनी देखील आपल्या प्रभावी भाषणांनी एक क्रांती घडवून आणली. म्हणूनच भाषणाचे महत्त्व मान्य करताना माओ त्से तुंग म्हणायचे, “भाषण ही मानवी मनावर शासन करण्याची एक कला आहे.’
आपल्या जादुई भाषणासाठी प्रसिद्ध असलेल्या ऍडॉल्फ हिटलरलाही भाषणाचे महत्त्व चांगलेच पटले होते. भाषणाच्या कमालीच्या परिणामकारकतेवर प्रकाश टाकून त्यांनी आपल्या “माइन काम्फ’ या आत्मचरित्रात लिहिले आहे की, जगातील महान क्रांती लेखनाने नाही, तर केवळ भाषणाने झाल्या आहेत. बर्फाप्रमाणे गोठलेल्या लोकांची मने वितळण्याची ताकद फक्त भाषणात असते.
हिटलरच्या या ओळी म्हणजेच त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या जणू भावनाच होत्या. अगदी अलीकडच्या काळातील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता लक्षात घेतली असता त्यातही आपल्याला वक्तृत्व कलेचा अंतर्भाव दिसून येतो. नरेंद्र मोदी यांच्या राजकीय यशासाठी पूरक असलेल्या बाबींपैकी वक्तृत्व ही एक जमेची बाजू मानावीच लागेल.
“वक्ता दशसहस्त्रेषु’ ही संस्कृत सुभाषितातील ओळ. अर्थात, दहा हजारांत एकच वक्ता असतो आणि एक उत्तम वक्ताच खऱ्या अर्थाने चांगला नेता बानू शकतो. आजपर्यंतचा इतिहास पाहता राज्याच्या आणि राष्ट्राच्या सामाजिक उत्थानात वक्त्यांचे योगदान अनन्यसाधारण राहिले आहे. एखाद्या व्यक्तीला राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर त्याला प्रभावी भाषण करता येणे हे अपरिहार्य आहे. त्यातही महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केला तर या भाषणकलेने अनेक नेतृत्वांची यशोगाथा अधिक तेजस्वी केलेली केलेली आहे.
लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, डांगे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे आदी मंडळींनी भाषणकलेनेच तमाम जनमानसावर राज्य केले. वक्तृत्वातील महाराष्ट्राची ही परंपरा धगधगती ठेवण्याचे काम आजच्या अनेक नेतेमंडळींकडून सुरूच आहे.
हल्लीच्या राजकारणातील भाषणातील शब्दांच्या खालावलेल्या पातळीचा अपवाद सोडला तर भाषणे आजही लोकप्रियता कायम ठेवून आहेत. आजही गाजणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या राजकीय सभा लोकांतील राजकीय चेतना जागृत करीत आहेत. लोकांना या ना त्या कारणाने व्यक्त होण्याची एकप्रकारे संधी देत आहेत आणि म्हणूनच सोशल मीडियावरून कितीही लाइव्ह येऊन आटापिटा केला तरी सभेतील भाषणेच चर्चेचा विषय ठरत आहेत. यातही निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसा भाषणांचा ज्वर वाढू लागला आहे. एकमेकांची उणीधुणी आणि उट्टे काढण्यासाठी भाषणे प्रभावी अस्त्र ठरत आहे.
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सभा लक्षवेधी ठरत असून इच्छुकांनी देखील वक्तृत्वकलेला धार देण्यासाठी कंबर कसलेली आहे. यात भाषणाचे क्लास घेणाऱ्यांनी देखील जोरदार मार्केटिंग सुरू केले आहे. त्यातही भाषणासारख्या कृतिप्रधान विषयाचे ऑनलाइन क्लास घेऊन पैसे उकळण्याचे धंदेही सुरू आहेत, हे दुर्दैव. हे म्हणजे अंगाला पाण्याचा थेंबही लागू न देता मोबाइलवरून पोहायला शिकविण्यासारखे आहे. सुज्ञ लोकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. इच्छुकांनी एव्हाना तयारीदेखील सुरू केली आहे. मार्केटिंग, ब्रॅंडिंग आणि कॅम्पेनिंगच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जात आहेत. परंतु एवढं करूनही केवळ वक्तृत्व कला अवगत नसल्याने या ना त्याप्रकारे फजिती होण्याची शक्यताही आहेच. त्यामुळे प्रभावी भाषणकला आत्मसात करणे ही आजच्या काळाची गरज आहे. कमीत कमी वेळेत अधिकाधिक लोकांच्या हृदयात घर करण्यासाठी उत्तम वक्तृत्वासारखा दुसरा पर्याय नाही.
सध्याचा काळ हा सादरीकरणाचा आहे जो घड्याळाच्या काट्यांमागे वेगाने धावतोय. बदलाच्या वाऱ्याने फक्त समाजाला आणि परिस्थितीलाच नाही तर राजकारणाला देखील विळखा घातला आहे. ज्याने येणाऱ्या काळातही राजकीय क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होऊन समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. म्हणूनच या बदलत्या राजकीय समीकरणांतदेखील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून आपलं नाणं वाजण्यासाठी वक्तृत्व कलेसारखी दुसरी संधी नाही. “भाषण’च जनमनात तुमचं “शासन’ निर्माण करू शकतं, एवढं मात्र नक्की.
– सागर ननावरे