शिक्षण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अगदी लहान मुलसुद्धा सतत काहीतरी नवीन शिकत असतं. शिक्षण हे कुतूहलातून जन्म घेतं. एखाद्या लहान मुलाला एखादी नवीन गोष्ट दिसली, की त्याचं कुतूहल जागृत होतं आणि तो ती गोष्ट आपल्या परीने हाताळतो, त्याच्याशी खेळतो, ती उलगडतो. त्यातून त्याला झालेल्या चांगल्या आणि वाईटाच आकलन म्हणजे ज्ञान आणि या अनुभवातून जे प्राप्त होतं ते खरं शिक्षण आणि या शिक्षणाचा उपयोग तो पुढे वेळप्रसंगी करत असतो, पण आपलं बाळ असं काही करायला लागलं, की आपण मात्र म्हणतो, झाले याचे उपद्व्याप सुरू व ती गोष्ट आपण त्याच्याकडून काढून घेतो आणि पुढे तो त्या अनुभवाला मुकतो.
आपल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीत घोकमपट्टी वर जास्त भर दिला जातो. विषय समजो अथवा न समजो, पाठांतर केलं की गुण मिळतात. परीक्षेत चांगले गुण मिळवणं हे आपलं एकमेव ध्येय असतं. चांगले मार्क मिळवणं ह्याच्या पलीकडे आपण विचारच करत नाही. बऱ्याचदा आपण जे शिकतोय त्याचा काय उपयोग आहे, हे आपल्याला माहीतच नसतं. परंतु ते निव्वळ पाठ्यपुस्तकात आहे म्हणून त्याचा अभ्यास आपण करत असतो. म्हणूनच आजकालच्या विद्यार्थ्यांवर शिक्षणाचा ताण किंवा दबाव दिसून येतो.
अपेक्षित मार्क मिळाले नाहीत की त्यातून नैराश्य उत्पन्न होतं. म्हणूनच आपल्या शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडविण्याची नितांत गरज आहे. शिक्षण जितकं प्रॅक्टिकल म्हणजेच प्रत्यक्ष कृतीद्वारे घडेल तितकं ते समजण्यास सोपं जातं. शाळांमधून याची सुरुवात नक्कीच झाली आहे; परंतु अजूनही सुधारणेस वाव आहे.
ऍरिस्टॉटल या ग्रीक तत्त्वज्ञाने शिक्षणाविषयी असं म्हटलंय की “एर्वीलरींळपस ींहश ाळपव ुळींर्हीीें शर्वीलरींळपस ींहश हशरीीं ळी पे शर्वीलरींळेप रीं रश्रश्र”. म्हणूनच शिक्षण हे आपल्या आवडीप्रमाणे, हवं तेव्हा आणि हवं तसं जर मिळालं, तर त्या शिक्षणाची गोडी निर्माण होईल आणि अनावश्यक ताणही येणार नाही, पण प्रश्न असा आहे की असं शिक्षण आपल्या देशात शक्य आहे का? तर त्याचे उत्तर हो असं आहे. म्हणजे शाळेत जायचं नाही.
धक्का बसला ना! पण हे खरं आहे. म्हणजे सकाळी लवकर उठून शाळेत जायला नको, सात सात तास शाळेत बसायला नको, नावडत्या विषयांचा अभ्यास नको, गृहपाठ नको, ट्युशन्स नको किंवा ते पाठांतरही नको, पण मग करायचं काय? तर आपल्याला ज्या विषयाची किंवा विषयांची आवड आहे, त्या विषयांचा अभ्यास करायचा, पण हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नाहीये.
आपल्या मुलाला शाळेत पाठवायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी पालकांचा असतो. एकदा का मुलाला शाळेत न पाठवण्याचा निर्णय झाला, की सगळी जबाबदारी ही पालकांवरच येऊन पडते. आता त्या मुलाचं सगळं शिक्षण हे घरातून होतं, यालाच होम स्कूलिंग म्हणतात. पारंपरिक पद्धतीत एक चौकट आखलेली असते. त्या चौकटीत राहूनच प्रत्येक मुलाला शिक्षण घेणं भाग असतं. परंतु जेव्हा मुल घरातून शिकतं, तेव्हा त्याचं खऱ्या अर्थानं चौकटी बाहेरच शिक्षण सुरू होतं.
आता यातून अनेक प्रश्न निर्माण होतात, की जी मुलं शाळेत जात नाहीत, जी घरातून शिकतात, त्यांचं पुढचं भवितव्य काय? त्यांना विद्यापीठात कोण प्रवेश देणार? त्यांचं करिअर कसं होणार. याचं उत्तर आहे, भारतात असलेल्या मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था म्हणजेच जशिप डलहेश्रळपस. दहावी व बारावीच्या परीक्षा ह्या या संस्थेद्वारे आपण देऊ शकतो, ते सुद्धा शाळेत न जाता व याचे प्रमाणपत्र हे बऱ्याच महाविद्यालयांमध्ये (परंतु सगळ्या नाही) प्रमाण मानले जाते. म्हणजेच मुक्त विद्यालया तर्फे दहावी पास झालेला किंवा बारावी पास झालेला विद्यार्थी पुढे त्याला हव्या असलेल्या महाविद्यालयीन शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकतो.
या संस्थे तर्फे दहावी व बारावीच्या परीक्षेला बसताना विद्यार्थ्याला विषयांचे बंधन नसते. त्याला हवे ते विषय तो परीक्षेसाठी निवडू शकतो. एखाद्या विषयात आपण अनुत्तीर्ण झालो तर, पुढच्या वेळेस तेवढाच विषय घेऊन परत परीक्षेला बसता येते. इतर उत्तीर्ण झालेल्या विषयांची परीक्षा देण्याची गरज नसते (प्रत्येक मुक्त विद्यालयाच्या वेगळ्या अटी किंवा नियम असू शकतात). विद्यार्थ्याला कोणताही विशिष्ट अभ्यासक्रम घेण्याची सक्ती नसते. आपल्याला हव्या असलेल्या विषयांचे अभ्यासाचे साहित्य म्हणजे स्टडी मटेरियलसुद्धा उपलब्ध असते.
ज्या मुलांना जवळपास चांगल्या शाळा उपलब्ध नसतात किंवा ज्या मुलांना शारीरिक व्याधी असतात आणि म्हणून ज्यांना शाळेत जाता येत नाही, किंवा इतर काही वैयक्तिक समस्या असतात, बहुतांशी अशी मुलं मुक्त विद्यालयाचा पर्याय निवडतात; परंतु कोविडनंतर बऱ्याच पालकांनी आता मुक्त विद्यालयाचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे; परंतु हे प्रमाण अत्यल्प आहे.
मुक्त विद्यालयाचा पर्याय निवडल्यास मुलांना त्यांचे छंद जोपासण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. आपल्याला कोणत्या विषयात आवड आहे, हे तपासून बघण्यासाठीही विद्यार्थ्याकडे बराच वेळ असतो. परंतु असे करण्यासाठी पालकांना मुलांच्या अभ्यासाचे पूर्व नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे. आई किंवा वडिलांपैकी एकाने तरी पूर्ण वेळ मुलाबरोबर राहणे आणि त्याचा अभ्यास घेणे गरजेचे आहे किंवा एखाद्या शिक्षकाची नियुक्ती तरी करणे गरजेचे आहे. शिवाय वेळोवेळी आपल्या मुलाचा अभ्यासाविषयीचा कल बघत राहणे हेही तितकेच महत्त्वाचे ठरते.
घरी अभ्यास करताना काही आव्हानांना मात्र सामोरं जावं लागतं. जसं एखाद्या विद्यार्थ्याला विज्ञानाची गोडी असेल, तर त्याला वैज्ञानिक प्रयोगशाळा उपलब्ध करून देणे हे गरजेचे असते. म्हणजेच एखाद्या विषयाला लागणाऱ्या पायाभूत सुविधा घरी उपलब्ध करून देणं हेही आव्हानात्मक आहे.
दुसरं आव्हान म्हणजे, मूल सतत घरी असल्याने ते एकटं पडण्याची भीती असते. इतर मुलांमध्ये व समाजात आपलं मूल मिसळतंय की नाही हे बघण्याची जबाबदारी पालकांची असते. मुख्य म्हणजे सगळ्याच महाविद्यालयांमध्ये मुक्त विद्यालयाचे प्रमाणपत्र चालत नाही. यात नावाजलेल्या महाविद्यालयांचाही समावेश असू शकतो. तेव्हा अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता असते.
तरीही मुक्त विद्यालयाचा पर्याय निवडून यशस्वी झालेलेसुद्धा काही विद्यार्थी आहेत. आपल्या मार्कांमुळे नाही तर निव्वळ आपल्या योग्यतेमुळे मुलं यशस्वी होतात, हेच यातून सिद्ध होते; परंतु हा प्रवास खूप खडतर आहे. मुक्त विद्यालयाचा पर्याय निवडणे हा खरोखरच एक धाडसी निर्णय आहे. मुक्त विद्यालयाच्या अटी आणि नियम यांचा अभ्यास करून मगच हा निर्णय घेणे केव्हाही योग्य ठरेल. यातील फायदे आणि तोटे जाणून घेऊन आणि सारासार विचार करून मगच या मार्गाचा स्वीकार केला तरच पुढचा प्रवास सुकर होईल.
प्राजक्ता पांगारकर