नवरात्रापासून नवा ऋतू सुरू होतो. दिवस हा लहान व्हायला लागतो आणि थंडीची चाहूल लागते. हा ऋतूबदल होताना त्याचे शरीरावर होणारे परिणाम टाळण्यासाठी नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. आजही देवीची किंवा शक्तीची नऊ दिवस, नऊ रात्री पूजा आणि प्रार्थना केली जाते.
नवरात्रात अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात आणि अत्यंत भक्तिभावाने देवीची आराधना करतात. नवरात्रामधील नवचा अर्थ नऊ आणि नवा असा दोन्ही होतो. नवरात्रापासून नवा ऋतू सुरू होतो. दिवस हा लहान व्हायला लागतो आणि थंडीची चाहूल लागते. हा ऋतूबदल होताना त्याचे शरीरावर होणारे परिणाम टाळण्यासाठी नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. नवरात्रादरम्यान साधं अन्न घेतलं जातं आणि नऊ दिवस देवीची भक्ती केली जाते. नवरात्रात केलेल्या पूजेला शक्तिपूजा असेही म्हणतात.
भारतात नवरात्र दोन वेळा साजरी केली जातात. पहिलं नवरात्र म्हणजे चैत्र महिन्यातील प्रतिपदा ते नवमी आणि दुसरं बरोबर सहा महिन्यांनी येणारे आश्विन शुक्ल प्रतिपदा ते विजयादशमीच्या आधी एक दिवस. या दोन्हीमध्ये शारदा नवरात्राला समान महत्त्व आहे. नवरात्रीचा उत्सव भारतात सगळीकडे मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. त्यापैकी काही राज्यांमध्ये नवरात्रोत्सव कसा साजरा करतात ते पाहू.
बंगालमधील नवरात्रोत्सव
नवरात्रात बंगालमध्ये देवीच्या खूप मोठ्या मूर्ती बनविल्या जातात, त्यांची पूजा केली जाते. देवीसमोर नऊ दिवस देवीची भक्तिगीत आणि नृत्य सादर केलं जातं. आणि शेवटच्या दिवशी ज्यावेळी या मूर्तींचं विसर्जन केलं जातं तेव्हा भव्य मिरवणूक काढली जाते. नवरात्रातील शेवटचे चार दिवस बंगाली लोकांसाठी खूपच महत्त्वाचे असतात. या दिवसांत बंगाली लोक छोट्या मुलींची म्हणजे कुमारिकांची दुर्गेचं रूप मानून पूजा करतात. नवव्या दिवशी दुर्गा आयुधपूजा केली जाते ज्यामध्ये प्रत्येकजण आपण उपजीविकेसाठी वापरत असलेल्या अयुध, हत्यारांना देवीपुढे ठेवून त्यांची पूजा केली जाते म्हणजे देवीचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांना यश मिळतं असा त्यांचा विश्वास आहे. एवढच काय पण लहान मुलं आपली पुस्तकही देवीसमोर ठेवून त्यांची पूजा करतात. दसऱ्याला भक्तगण आपल्याला ज्ञान मिळण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी सरस्वतीपूजन करतात. नवरात्रात हजारो भक्तगण कोलकाता येथील दक्षिणेश्वर काली मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.
गुजरातमधील नवरात्रोत्सव
गुजरातमध्ये नवरात्रोत्सव हा संपूर्ण समाजाचाच एक महत्त्वाचा सण मानला जातो. त्यामध्ये देवीची भक्तिगीत आणि नृत्य सादर केलं जातं. जुनागढ येथील अंबामाता मंदिरात देवीला प्रसन्न करण्यासाठी दांडिया आणि गरबा नऊ रात्री खेळला जातो. येथे रंगविलेली मातीची भांडी देवीचे रूप समजून त्याच्याभोवती नृत्य केले जाते. या मातीच्या भांड्यांमध्ये देवीचं वसतिस्थान असते, असा या लोकांचा विश्वास आहे. रासच मूळ हे भगवान कृष्णांच्या जीवनापासून येथे आढळतं ज्याचा संबंध शेतीशी लावला जातो तर गरबा हे फक्त पुरुष खेळतात आणि त्याचाही संबंध शेतीतील पिकांशी लावला जातो.
महाराष्ट्रातील नवरात्रोत्सव
महाराष्ट्रात नवरात्रोत्सवात नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केली जाते. दहाव्या दिवशी दसऱ्याला सरस्वतीची पूजा केली जाते. शाळेत जाणारी मुलं सरस्वतीचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्या वहीवर सरस्वतीचं तांत्रिक चिन्ह काढून त्याची पूजा करतात. दसरा हा दिवस कोणत्याही महत्त्वाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो. स्त्रिया या दिवशी सोने किंवा चीजवस्तू खरेदी करतात. नवरात्रामध्ये देवीची रोज पूजा केली जाते आणि भक्तगण दुर्गादेवीला रोज एक फुलांची माळ अर्पण करतात. महाराष्ट्रातील देवीची साडेतीन पीठ प्रसिद्ध आहेत. ती म्हणजे तुळजापूर, कोल्हापूर, माहूर आणि वणी येथील अनुक्रमे भवानीमाता, महालक्ष्मी, रेणुका आणि सप्तशृंगी देवीचे दर्शन नवरात्रात घेण्यासाठी हजारो भक्तगण जमा होतात.
काश्मीरमधील नवरात्रोत्सव
काश्मीरमधील लोक नऊ दिवस पाणी किंवा फळं खाऊन उपवास करतात किंवा उपवासाचे पदार्थ फक्त रात्री खातात. नवरात्रात नऊ दिवस भक्त हीर भवानी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. नवरात्रामध्ये शेवटच्या दिवशी मंदिरात आरती केली जाते आणि त्यानंतरच लोक आपला उपवास सोडतात. नवरात्रात अनेक भक्तगण वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जातात. वैष्णोदेवीचं मंदिर उंच पर्वतावर एका गुहेत आहे.
केरळमधील नवरात्रोत्सव
केरळमध्ये एक परंपरा आहे की लहान मुलांचे शालेय शिक्षण, ज्यांचं वय 3-5 वर्षांच्या दरम्यान आहे, नवरात्रात सुरू केलं जातं. अष्टमीला पारंपरिक प्रथेनुसार अस्त्रांची पूजा केली जाते आणि त्या दिवशी त्याचा वापर केला जात नाही. नवमीला सरस्वतीचा आशीर्वाद मिळावा म्हणून घरात पुस्तकांची आणि व्यापारी आपल्या रेकॉर्डची पूजा करतात. नवरात्रामध्ये हजारो भक्तगण कोट्टयाम येथील सरस्वती मंदिरात देवीचे दर्शन घेऊन जातात. कोट्टयाम येथे असलेल्या पवित्र तळ्यामध्ये भक्तगण आंघोळ करतात. थेक्केग्रामच्या (पालघाट) प्रसिद्ध मंदिरातही नवरात्रात भक्तांची गर्दी पाहावयास मिळते.
म्हैसूर, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश- म्हैसूरची चामुंडी ही येथील राजांची देवी असून नवरात्रात येथील राजांकडून तिची पूजा शाहीथाटात केली जाते. दहाव्या दिवशी पर्वतावरील देवीची पूजा करण्यासाठी जाताना येथे महाराजांची भव्य मिरवणूक काढली जाते ज्यामध्ये हत्ती, घोडे आणि आपला विशेष पोशाख करून आलेले सर्व भक्तगण या मिरवणुकीत सहभागी होतात. तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये महिला “बोम्मई कोलू’ची रचना करतात ज्यामध्ये एक खास प्रकारच्या बाहुल्या फुलांनी आणि दागिन्यांनी सजविल्या जातात, नऊ लहान मुली किंवा कुमारिकांना कपडे आणि मिठाई दिली जाते. विवाहित महिला एकमेकींना कुंकू, फुलं आणि फराळाचे पदार्थ देतात. अशा प्रकारे नवरात्रोत्सव हा भारताच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो.
– चिं. वि. खाडीलकर