पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना “तोशा खाना’ (विदेशी राष्ट्रप्रमुखांद्वारे पाकला मिळालेल्या भेटवस्तू) मध्ये अपहार केल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांना तत्काळ अटक करून सामान्य कैद्याप्रमाणे तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या दरम्यान पाकची नॅशनल असेंब्लीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ती भंग करण्यात आली आहे. कार्यवाहक पंतप्रधान नियुक्त होऊन सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा अपेक्षित आहे. लवकरच नवे सरकार अधिकारारूढ होईल.
इम्रान खान यांना तुरुंगात ठेवून अन् निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवून सरकारला निवडणूक लवकर उरकायची आहे. तसे पाहिले तर पाकमधील कोणाही राज्यकर्त्याच्या तुलनेत इम्रान खान यांना अधिक लोकमान्यता आहे. त्यांच्या प्रभावाचा धसका मावळते पंतप्रधान शाहबाज शरीफ व त्यांच्या पीडीएम (पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट) आघाडीने जसा घेतला आहे, तसा पाक लष्कराने देखील घेतला होता. कोणत्याही स्थितीत इम्रान खान यांना सत्तेतून बेदखल करायचे मनसुबे स्पष्ट दिसत आहेत. ज्या प्रकरणात इम्रान खान सध्या जेलमध्ये आहे, त्यात त्यांना जामीन मिळू शकतो. उच्च न्यायालयात त्यांनी अपील केले आहे.
हे ग्रहित धरूनच की काय अलकादिर ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणी इम्रान खान यांना या आधी सुनावलेल्या शिक्षेप्रकरणी जो अंतरिम जामीन मंजूर होता, नुकताच तो रद्द करण्यात आला आहे. जामीन अटींचे पालन न केल्याचा ठपका ठेवला गेला. म्हणजे तोशा खाना प्रकरणी इम्रान खान जरी उच्च न्यायालयातून जामीन मिळवत बाहेर आले तरी असंख्य प्रलंबित प्रकरणे त्यांच्याविरोधात “आ’ वासून उभी आहेत, या प्रकरणात त्यांच्यावर नव्याने अटकेची कारवाई होऊ शकते.
निवडणूक होईपर्यंत खान यांना येनकेनप्रकारेण तुरुंगात ठेवून त्यांना सत्तेतून बेदखल करण्याचे मनसुबे स्पष्ट दिसतात. त्यामागे शरीफ-भुट्टो-झरदारी ही मंडळी असली तरी याचे कथानक लिहिले आहे ते पाक लष्कराने. अन् ते केवळ पहिल्यांदाच घडत नाहीये. लष्कराशी बिनसलेल्या पाकच्या सात पंतप्रधानांना विविध आरोपांखाली जेलची हवा खावी लागल्याचा इतिहास जुना नाही.
गत निवडणुकीत इम्रान खान सत्तेत आले ते देखील लष्कराची पसंत म्हणूनच. नवाज शरीफ व भुट्टो कुटुंबीयास पर्याय म्हणून खान यांना निवडणुकीद्वारे सत्तेत बसविले गेले. त्या निवडणुकीत गैरप्रकाराचे अनेक आरोप विद्यमान सत्ताधाऱ्यांनी केले होते. “इलेक्शन तो गर्दी है, जिसके पिछे वर्दी है’ या नावाने तेव्हा प्रस्तुत लेखकाने लेख लिहिला होता. इम्रान खान यांचे असे दिवस का फिरलेत? हे समजण्यासाठी मागील अनेक संदर्भ समजून घ्यावे लागतील. सुरुवातीच्या काही महिने इम्रान खान हे लष्कराशी जुळवून घेत कारभार करीत होते. पुढे त्यांचे हे संबंध मधुर राहिले नाहीत. लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी त्यांचे बिनसले. आपण लोकनियुक्त आहोत, लष्कराने आपल्या अंकित राहावे या भावनेतून इम्रान खान वागत होते. त्यांचे हे वागणे घटनाबाह्य मुळीच नव्हते.
आयएसआय या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांच्या निवडीवरून लष्कर प्रमुखाशी वाद वाढत गेला. नवाज शरीफ यांनीही पूर्वी लष्कराला त्यांची जागा बराकीत असल्याची जाणीव करून दिली होती, त्याची किंमत त्यांनाही मोजावी लागली. लष्कराशी खान यांचा हा सुप्त संघर्ष जारी असतानाच त्यांनी अमेरिकेला अंगावर घेण्याची चूक केली. नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिका हा इम्रान खान यांच्या रशिया दौऱ्यावर खपा होता. रशियाने युक्रेनवर ज्या दिवशी हल्ला केला, त्याच दिवशी खान हे त्यांच्या नियोजित रशिया दौऱ्यावर होते. पुतीन यांच्याशी त्यांनी दीर्घ चर्चा केली.
रशियाकडून स्वस्तात क्रूडतेल आयात करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. युक्रेन हल्लाप्रकरणी अमेरिका व युरोपीय महासंघ रशियाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करीत असताना अमेरिकेचा मित्र म्हणविणारा पाक रशियाच्या वळचणीला जाणे हे बायडेन सरकारला मान्य होणारे नव्हते. इम्रान खान हे मॉस्कोतून मायदेशी परतल्यावर विमानतळावर लष्करप्रमुख बाजवा यांनी त्यांना युक्रेन हल्ल्याबाबत रशियाचा निषेध करणे कसे आवश्यक आहे, हे सुचविले. खान यांनी ते अव्हेरत युक्रेन-रशिया वादाशी आपला काय संबंध म्हणत हात झटकले. अमेरिका व युरोपीय युनियनला हे जिव्हारी लागले.
इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली त्यानंतरच सुरू झाल्या. त्याला लष्कराचा छुपा आशीर्वाद होता हे उघडच आहे. अविश्वास ठराव मंजूर होताना हाय व्होलटेज ड्रामा झाला. खान यांनी आढेवेढे घेत अखेर पदत्याग केला. नंतर मात्र ते देशभर सभा घेऊन आपल्यावरील अन्यायाचे वर्णन करू लागले. त्यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीची तुलना झुल्फिकार अली भुट्टो यांच्या गर्दीशी व लोकप्रियतेशी होऊ लागली. कोणाही प्रस्थापितांना व सत्ताधाऱ्यांना हे मानवणारे नव्हते. ही लोकप्रियता त्यांना टिकविणे जमले नाही. जनमताचा लोंढा आपल्या मागे असल्याच्या भावनेतून त्यांनी थेट पाक लष्करालाच आव्हान दिले. तेव्हढ्यावर ते थांबले नाहीत. आपल्याला पदच्युत करण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा व त्यांच्या इशाऱ्यावर सध्याचे सरकार व पाक लष्कर चालत असल्याचा गंभीर आरोप ते जाहीर सभेत करू लागले. त्यांच्या आरोपांना मिळणारे समर्थन पाहता इम्रान खान अधिकच चेकाळले. त्यांनी जाहिरसभेत काही कागदपत्रे फडकविली.
आपले सरकार पाडण्यात अमेरिकेचा हात असल्याचा पुरावा या कागदपत्रात असल्याचा दाखला ते देऊ लागले. इम्रान खान पंतप्रधान असताना शेवटच्या काही दिवसांत अमेरिकेतील पाक राजदूताने आपल्या सरकारला पाठविलेली ती माहिती होती. ज्यात बायडेन प्रशासन इम्रान खान यांच्यावर नाराज असून अमेरिकेला पाकमध्ये सत्ताबदल हवा असल्याचे सूचित केले होते. हाच कागद इम्रान खान जाहीर सभेत फडकवत होते.
राष्ट्रीय सुरक्षेची निगडित इतका महत्त्वाचा दस्तावेज खान यांनी पदावर नसताना सोबत कसा ठेवला? पुन्हा तो सार्वजनिक कसा केला? यावर गहजब झाला. गोपनीयतेच्या शपथेचा हा भंग होता. इम्रान खान यांचे वागणे देशद्रोहाला निमंत्रण देणारे होते. काहींनी त्यांची तुलना शेख मुजीब यांच्याशी केली. तर काहींना त्यांच्यात झुल्फिकार अली भुट्टोंची छबी दिसू लागली. आपल्या बेबंद वागण्याचे परिणाम जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते भानावर आले. त्यांच्या पक्षाने जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली.
शिवाय पक्षाचे एक शिष्टमंडळ अमेरिकेला पाठवून खेद व्यक्त केला. या चुकीतून सावरत असताना दुसरी अक्षम्य चूक केली ती खान यांच्या समर्थकांनी. 9 मे 2023 रोजी इम्रान खान यांना अलकादिर ट्रस्ट प्रकरणी शिक्षा कोर्टाने सुनावली, त्यांना तत्काळ कोर्ट परिसरातून अटक केली गेली. यानंतर त्यांच्या समर्थकांनी देशभर धुडघूस घातला. जाळपोळ केली. दंगली केल्या. कहर म्हणजे लष्करी आस्थापनेवर हल्ले करून मोडतोड अन् जाळपोळ केली. येथूनच त्यांचे दिवस फिरले. ही बाब शरीफ सरकारने गांभीर्याने घेतली. कठोर कारवाई करीत दंगेखोर गजाआड केले. शिवाय दंगलीत नसणारे मात्र इम्रान खान समर्थक असणारे असंख्य कार्यकर्ते, नेते तुरुंगात घातले. या सर्व कृत्यास इम्रान खान यांनी चिथावणी दिल्याचा आरोप ठेवला गेला. या सर्व आरोपींवर आर्मी ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यासाठी लष्कर सरसावले.
लष्कर व इम्रान खान यांच्यात कधीही न दुरुस्त होणाऱ्या चुका घडत गेल्या. त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागणार होते. खान यांची अटक, जुन्या गुन्ह्यात जामीन रद्द होणे, निवडणूक प्रक्रिया सुरू होणे, खान यांना निवडणूक आयोगाने पाच वर्षे निवडणूक लढविण्यास व कोणतेही पद स्वीकारण्यास अपात्र ठरविणे, खान यांच्या अतिशय निकटच्या सहकाऱ्यांनी साथ सोडणे, काहींनी तर राजकारण संन्यास घेणे, काहींचे विदेशात पळून जाणे या साऱ्या घटना मागील कारणे जाणून घ्यायची असतील तर वर उल्लेखित घडामोडी आधी समजून घ्याव्या लागतील.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इम्रान खान यांना नुकत्याच झालेल्या अटकेनंतर पाकमध्ये त्या विरोधात कसलीही प्रतिक्रिया उमटलेली नाही. सर्व काही चिडीचूप होते. कार्यकर्ते रस्त्यावर आले नाहीत. जाळपोळ अन् दंगे तर दूरच. युवकांनो! घरात बसू नका, ही लढाई मी तुमच्यासाठी लढतोय असे व्हिडिओ संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले, मात्र कोणी हूं की चू केले नाही. इम्रान खान यांची लोकप्रियता ढासळली असे अनुमान काढणे घाईचे होईल. मात्र, कार्यकर्ते 9 मे 23 च्या घटनेनंतर शहाणे झालेत किंवा सरकारी दहशतीपुढे नमलेत हे म्हणावे लागेल. राजकीय शक्ती म्हणून इम्रान खान यांना ठरवून निस्तेज केले जात आहे.
निवडणुका नियोजित वेळेत झाल्यास खान हे (अटकेमुळे) प्रचारात भाग घेऊ शकणार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे. निष्पक्ष निवडणूक हे पाकसाठी कायम मृगजळ राहिले आहे. पीडीएम आघाडी पुन्हा सत्तेत येण्याची वाट प्रशस्त केली जात आहे. भले नवाज शरीफ यांना भावी पंतप्रधान म्हणून शहबाज शरीफ यांनी सूचित केले असले तरी लष्कराला मान्य असणारा नेताच त्या पदावर येईल. या साऱ्या गदारोळात इम्रान खान यांचा खेळ खल्लास होण्याची शक्यता अधिक आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत हार न मानणारा हा जिगरबाज खेळाडू राजकीय पटलावरील अस्तित्वाच्या लढाईचा कसा सामना करतो हे येत्या काही दिवसांत दिसेलच.
– आरिफ शेख