निवृत्तीनंतर पहिल्यांदाच प्रवासाला निघालो होतो, तेव्हाची गोष्ट! माझ्या भाच्याकडे कर्नाटकात रायचूरला जायचं ठरलं होतं. एसीचं रिझर्व्हेशन न मिळाल्यामुळे “स्लीपर कोच’च रिझर्व्हेशन केलं होतं आणि लोअर बर्थ मिळाल्यामुळे आरामात झोपून जाता येईल म्हणून आम्ही दोघंही रिलॅक्स मूडमध्ये होतो. आम्ही दोघं म्हणजे मी आणि माझी सौ.!
अमितनं म्हणजे मुलानं आपल्या गाडीतून पुणे स्टेशनवर सोडलं आणि ट्रेन येण्यास दोन तास असल्यामुळे दोनशे रुपयात एक हमाल ठरवून कंपनीत यूएसचा एक अर्जंट कॉल असल्यामुळे तो लगेच परत गेला. आणि मग खऱ्या अर्थानं आमची “थ्री टायर’ यात्रा सुरू झाली…
बाकी हमालाला इंग्रजीत “कुली’ का म्हणतात हे स्टेशनवर गेल्यावर कळतं. कोणत्याही प्रश्नाचं थंड आणि निर्विकारपणे उत्तर देण्याचं त्याच कौशल्य आणि कसब वादातीत असतं. आमच्या फक्त दोन बॅगा आणि खाऊची एक पिशवी एवढ्याशा सामानाची दोनशे रुपये हमाली घेतल्यामुळे मी न राहवून त्याला विचारलं. “भैया, खाली (इथे खाली हा शब्द “फक्त’ या अर्थानं आला आहे. रिकाम्या नव्हे) दो बॅगके दो सौ रुपये? सेकंड प्लॅटफॉर्मपर तो जाना है?’
“साब, तिसरे प्लॅटफॉर्मके तीनसौ होते है’ (बिल्डर जसा फ्लोअरप्रमाणे रेट वाढवतो तसा त्याचा रेट वाढत असावा) एक बॅग उचलतं तो निर्विकारपणे मला म्हणाला आणि त्याच सुरात पुढे रिक्वेस्ट कम ऑर्डर दिली… “साब तुम्हारे हाथमेंकी बॅग जरा मेरे सिरके बॅगके उप्पर रख देना.’
मी एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि निमूटपणे बॅग त्याच्या डोक्यावर ठेवली. “मेरे पिछे पिछे जल्दी चलो..खाली तीस पायरी फूटब्रीज चढके उतरना है…’ एवढं म्हणत बघता बघता तो पहिल्या प्लॅटफॉर्मवरही पोहोचला. आणि मग त्याचा पाठलाग करत मी आणि माझ्यामागे बायको धापा टाकत टाकत निघालो.
प्रवाशांच्या त्या गर्दीत हळूहळू आमच्यातील अंतर जसजसं वाढू लागलं तसतसं माझं टेन्शन वाढू लागलं. माझं अर्ध लक्ष त्याच्या डोक्यावरच्या बॅगांकडे (खरं म्हणजे गर्दीत आता त्याच्या डोक्यावरच्या बॅगाच तेवढ्या दिसत होत्या) आणि बाकीचं मागून येणाऱ्या सौभाग्यवतीकडै होतं. पाच मिनिटांत आम्ही त्या “तीस’ पायऱ्या चढून उतरून कसेबसे दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचलो आणि एका बाकाजवळ कूलीनं बॅगा खाली ठेवल्या.
“भैया सामान गाडीमें रख दो यहां किधर रख रहे हो?’
“साब, बोगीतक लानेकीच बोली थी.. अंदर रखनेके अलग पैसे पडेंगे..!’ तो पुन्हा त्याच निर्विकारपणे मला म्हणाला.
मी आता पुन्हा “बोली’वरून त्याच्याशी “बोलाचाली’ व्हायला नको असा विचार करून त्याचे पैसे देऊन टाकले आणि येणारया ट्रेनची वाट बघू लागलो. दोन तास म्हणता म्हणता गाडी आणखी अर्धा तास लेट आली आणि मी आमची रिझर्व्हेशनची “डी फोर’ बोगी शोधू लागलो… आमच्या डोक्यावरच “डीफोर’चा स्क्रीनबोर्ड लटकत होता पण आमची बोगी मात्र चौकात सिग्नल क्रॉस करणाऱ्या बेफिकीर बाइकवाल्याप्रमाणे पुढे जाऊन थांबली होती.
कसेबसे आम्ही बॅगांसह आमच्या डब्यात घुसलो आणि आमचं कंपार्टमेंट शोधू लागलो. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. दोन चार रिकामे बर्थ सोडून सगळी बोगी निद्रिस्त होती. वरचा एक बर्थ दोन होल्डॉल हॅंडबॅग सतरंजी तांदुळाची गोणी दोनतीन पिशव्या गुंडाळी, जेवणाचा डबा डीश अशा संसाराला लागणारया यच्चयावत वस्तूनं पूर्ण भरलेला होता. (लोक तांब्या भांड्यापासून ते किराणाच्या गोणीपर्यंत अख्खा संसार बरोबर घेऊन सबंध हिंदुस्थानचा का आणि कसा प्रवास करतात हे एक मला न उलगडलेले कोडे आहे) रिझर्व्हेशन असलेल्या आमच्या लोअर बर्थवरही कुणीतरी आरामात झोपलं होतं. मी पुन्हा एकदा नंबर चेक केला आणि त्याला उठवू लागलो.
“ओ भाईसाब उठो इधर हमारा रिझर्व्हेशन है!’ तो तोंडावर चादर घेऊन झोपला होता. मी दोनतीन वेळा त्याला हलवलं पण तो ढिम्म हलायला तयार नव्हता. शेवटी मी चिडून त्याच पांघरुण ओढू लागलो तसा तोंडावरच्या पांघरुणातूनच तो फुसफुसला.
“भैया मुझे बुखार है. वो उपरकी सामानवाली बर्थ मेरी है, आप वहां सो जाव…’
त्याला चादरीतून ओढून काढून त्याचा “बुखार’ चांगलाच उतरवावा असा एक दुष्ट विचार माझ्या मनात येऊन गेला… पण मी कसंबसं स्वतःला आवरलं आणि टीसीला शोधायला लागलो. तो पलीकडच्या “डी टू’ मध्ये यूट्यूबवर गाणी ऐकत बसला होता. नाईलाजाने टीसी उठला आणि माझ्याबरोबर येऊन जबरदस्तीनं बुखारवाल्याला त्याच्या बर्थवर पाठवलं.
“आजकल लोग आरामसे सोनेभी नही देते.’ असं काहीतरी मोठ्याने पुटपुटत तो सामानानं गच्च भरलेल्या आपल्या बर्थवरती चढला आणि मुटकुळं करून झोपी गेला. आता त्याचा “तो’ बुखार गायब झाला होता.
एव्हाना रात्रीचे एक वाजून गेले होते आणि आमच्या झोपेचं नुसतं खोबरे नाही तर चांगला खोबऱ्याचा खीस झाला होता. डोळे पेंगायला लागले होते. ट्रेनचा स्पीड वाढला की खालचा बर्थ भूकंप झाल्यासारखा हालायला लागायचा आणि उठून बसावं म्हटलं तर मधल्या बर्थमुळे मान नव्वद अंशात “नतमस्तक’ होऊन थोड्याच वेळात दुखायला लागायची. त्यात मधल्या बर्थवरचा एक पॅसेंजर कोणत्याही स्टेशनवर गाडी थांबली की खिडकी उघडून “कौन सा स्टेशन है?’
असं बाहेर जाणाऱ्या येणाऱ्याला विचारायचा आणि पुन्हा झोपी जायचा. काही काही मंडळी ट्रेनमध्ये बसल्यापासून चुकून आपलं उतरण्याचं स्टेशन येऊन जात की काय याच्या कायम टेंशनमध्ये असतात. खरंतर त्याला बेंगलोरला म्हणजे शेवटच्या स्टेशनला उतरायचंय होतं (हे त्यानं टीसीला सांगताना मी ऐकलं होत) तरी रात्रभर त्याच हे “चौकशीसत्र’ चालूच होतं. वैतागून मधल्याच कुठल्यातरी निर्जन स्टेशनवर बेंगलोर आ गया असं सांगून त्याला खाली उतरवावं असा एक क्रूर विचार माझ्या डोक्यात येऊन गेला.
पहाटेचे चार होत आले. डोळ्यावर झोप अनावर झाली होती. एवढ्यात चाय गर्रम्.. ए मस्साला चाय.. असं खर्जात ओरडत चहावाल्यानं अख्ख्या बोगीला उठवायला सुरुवात केली आणि त्याबरोबरचं माझ्या झोपेच्या उरल्या सुरलया आशेवर चहाचं गरम पाणी ओतून तिचा थंडगार “फालुदा’ करून टाकला. थंडीमध्ये रात्रभर अंगावर रजई घेऊन छानपैकी झोपून प्रवास करण्याचं आमचं स्वप्न जुन्या काळातल्या रेल्वे इंजिनाच्या धुराप्रमाणे विरून गेलं होतं.
सकाळी आमचं स्टेशन आलं. अजूनही तसा मी पेंगुळलेलाच होतो. रेल्वेच्या त्या “थ्री टायर’नं मला पूर्ण ‘टायर'(ड्) करून टाकलं होतं. आणि मग अर्धवट झोपेतच मी आम्हाला घ्यायला स्टेशनवर आलेल्या माझ्या भाच्याला विचारलं.
“भैया, कौनसा स्टेशन है?’
– कृष्णकेशव