इथेनॉल वापरावर भर द्या ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे/मांजरी – पेट्रोल-डीझेल इंधन संपण्याच्या स्थितीत आहे, याची जागा येत्या काही वर्षांत “ग्रीन हायड्रोजन’ घेणार आहे. पाणी आणि “बायो मास’पासून ग्रीन हायड्रोजन तयार करण्यात येतो. प्रत्येक साखर कारखान्यात ग्रीन हायड्रोजन तयार झाले, तर अतिरिक्त उत्पादन होईल, यातून इंधनाचा प्रश्नच राहणार नाही, असे मार्गदर्शन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केले.
वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील “साखर परिषद-2022’चे उद्घाटन शनिवारी झाले. यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन, तर सभास्थळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजीत कदम, सतेज पाटील, शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, हेमंत पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, “पेट्रोल आणि डीझेलचे दर कमी झाले की, साखरेचे दर कमी होऊन 25 ते 26 रुपये प्रतिकिलो इतके कमी होतील. इथेनॉलशी संबंधित हा उद्योग आहे. फ्लेक्स इंजिनमध्ये 100 टक्के पेट्रोल ऐवजी 100 टक्के इथेनॉल टाकता येईल. यामुळे मी ऑटोमोबाइल कंपन्यांना फ्लेक्स इंजिन तयार करण्यासाठी आग्रह करीत आहे. पुण्यातील सर्व दुचाकी, रिक्षा इथेनॉलवर कराव्यात, इथेनॉल एक लिटर 62 रुपये, तर पेट्रोल 120 रुपये आहे.
पुण्यात हे सगळ्यात आधी सुरू करा. मी इथेनॉलचे पंप द्यायला सांगतो. टोयोटा, टाटा, महिंद्रा इत्यादी सगळेच ऑटोमोबाइल उत्पादक फ्लेक्स इंजिन आणणार आहेत.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते राज्यस्तरीय “साखर परिषद- 2022′ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
मराठवाड्यात चांगले ऊसबेणे देण्याचा प्रयत्न ः सहकारमंत्री
साखर उद्योगातून राज्याला 6 हजार कोटींपेक्षा जास्त महसूल मिळतो. हा उद्योग वाढण्यासाठी ऊसाचे उत्पादन वाढविण्यासोबत चांगला उतारा असणे गजरजेचे आहे. पश्चिम पट्ट्यात ऊसाचे चांगले उत्पादन होते. पण, व्हीएसआयच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही चांगले ऊसबेणे देण्याचा प्रयत्न आहे, असे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन उच्चांकी झाले आहे. साखरेचे उत्पादन वाढताना साखरेचा उताराही वाढला आहे. आता, साखरेसोबत इथेनॉलचे उत्पादन वाढायला हवे. यावर्षी शासनाने 8 कारखाने चालवायला घेतले, त्यात 26 लाख टन ऊसाचे गाळप झाले. त्या परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे, असे सहकारमंत्री म्हणाले.
साखरेतील गोडवा पवार यांनी राजकारणात आणला
“साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र यावे, असे आवाहन करतानाच साखरेतील गोडवा शरद पवार यांनी राजकारणात आणला आहे आणि सगळ्या पक्षांचे नेते पक्षीय जोडे काढून राज्य आणि देशाच्या हिताचा विचार करत आहे, ही निश्चित चांगली बाब आहे,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.
शरद पवार यांनी केले गडकरींचे कौतुक
महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्रामागे भक्कमपणे उभे राहत असल्याचे सांगत माजी कृषि मंत्री शरद पवार यांनी गडकरी यांचे कौतुक केले. “साखर परिषदेत’ पवार बोलत होते. “राज्य सरकारची मदत साखर कारखानदारीसाठी हवीच असते. सुदैवाने आत्ताच्या राज्य सरकारमध्ये उसाबद्दल, कारखानदारीबद्दल जाण असणारे अनेक सहकारी आहेत. तर, केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील ऊस, साखर, इथेनॉल किंवा कोणताही प्रश्न आला तर एक व्यक्ती भक्कमपणे ऊस उत्पादकांच्या आणि महाराष्ट्राच्या मागे उभी असते ते म्हणजे नितीन गडकरी. आज, या ठिकाणी ते उपस्थित असल्याने मनापासून आनंद होत आहे,’ असेही पवार यांनी नमूद केले.