आळंदी- करोना संदर्भात माहिती देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी (दि. 4) फेसबुक लाईव्हद्वारे जनतेसमोर आले. यापुढे कोणतेही राजकीय, सामाजिक, धार्मिक (सगळ्या धर्मांचा समावेश) सोहळे आयोजित करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही, असे सांगितले होते. तसेच पंढरपूर येथील चैत्र वारी रद्द करण्यात आली असल्याचे सुद्ध सांगितले. मात्र, काहींनी श्री संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा रद्द झाल्याचे चुकीचे संदेश पसवण्यात आल्याने वारकरी संप्रदायत पालखी सोहळ्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या.
या अनुषंगाने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब अरफाळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथील चैत्र वारी संदर्भात माहिती दिली. आषाढी वारीचा याच्याशी काहीही संदर्भात नसल्याने कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. संपूर्ण जगासमोर करोनाचे संकट निर्माण झाले असून पांडुरंग हे संकट लवकरात लवकर दूर करतील आणि सर्व संतांच्या पालख्यांचे पंढरपुरच्यादिशेने उत्तम आरोग्यदायी प्रस्थान ठवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.