राजगुरूनगर : शिवसेनेच्या वतीने नुकतीच घोषणा केल्या नुसार राज्यात आज गरीब गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आले आहे. सध्या करोना विषाणूच्या महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे गरीब जनतेला एकवेळचे जेवण मिळावे यासाठी शिवभोजन सुरु झाले आहे. राजगुरुनगर येथे तहसीलदार कचेरीजवळ शिवभोजन आज सुरु झाले. दरम्यान शिवभोजनास शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
करोना विषाणूच्या महामारीमुळे खेड तालुक्यात अनेक गरीब गरजू आणि हातावर पोट असणाऱ्या कामगारानावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाच्या अगोदर काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींकडून अन्नधान्य व जेवण वाटप केले जात आहे. तालुक्यात जवळपास २० ते २५ हजार गरीब आणि गरजू नागरिक आहेत त्यांना लॉकडाउनच्या काळात दानशूर व्यक्तींकडून संस्थानाकडून जेवण पुरवले जात आहे. केंद्रसरकारने सर्वाना धान्य देण्याची घोषणा केली मात्र आतापर्यंत ती प्रत्यक्षात अमलात आली नाही. त्यामुळे राज्य सरकारने राज्यभर तात्काळ शिवभोजन सुरु केले आहे.
राजगुरूनगर येथे तहसीलदार कार्यालयात असलेल्या झुणका भाकर केंद्रात आज पासून शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेच्या जिल्हा संघटक विजया शिंदे या पूर्वी येथे झुणका भाकर केंद्र यशस्वीरीत्या चालवत होत्या त्यांना शिवभोजन थाळी केंद्र देण्यात आले आहे. येथील शिवभोजन केंद्राचे उदघाटन नायब तहसीलदार मालती धोत्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना पुणे जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, समन्व्यक गणेश सांडभोर, कैलास गोपाळे, तुषार सांडभोर, रामदास शिंदे, मंदार शिंदे उपस्थित होते.
दररोज १२ ते ३ या वेळेत शिवभोजन थाळी नागरिकांना देण्यात येणार आहे. आज पहिल्याच दिवशी तासाभरात १०० थाळी गरीब गरजू व्यक्तींनी सोशल डिस्टंस ठेवून शिभोजन थाळी घेतली. येथील केंद्रावर केवळ १०० थाळीला मान्यता असल्याने येथे येणाऱ्या इतर नागरिकाचे काय होणार हा प्रश्न समोर येत आहे. राजगुरूनगर येथील शिवभोजन थाळी सुरु केल्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्हिडीओ कॉल करून शुभेच्छा दिल्या आहेत . त्या म्हणाल्या, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन थाळी सुरु केली आहे.
अनेक गरजू गरीब नागरिकांची जेवणाची सोया झाली आहे. या उपक्रमामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामाजिक कामाला प्रेरणा मिळेल अशी अशा त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला. शिवभोजन थाळी केंद्राच्या संचालिका विजया शिंदे म्हणाल्या कि, आज पहिल्याच दिवशी तासाभरात १०० थाळी नागरिकांना देण्यात आल्या आमच्या केंद्रावर केवळ शंभर थाळी देण्याला मान्यता मिळाली आहे.
शहरातील व परिसरातील गरीब गरजू नागरिकांची सात ते आठ हजार संख्या आहे. शिवाय आता लॉकडाऊन असल्याने अनेकजण येथे गर्दी करतील. प्रशासने केवळ शंभर थाळीला दिली असून ती अपूर्ण आहे. तहसीलदारांनी शिवभोजन केंद्रास ४०० थाळीला मान्यता द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.