बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन हिच्या फेक न्यूजसंदर्भातील प्रकरणाची सबंध देशभरात बरीच चर्चा झाली आणि या प्रकरणी न्यायालयाने गूगल-यू-ट्युबलाही फटकारले. या प्रकरणाच्या निमित्ताने समाजमाध्यमांवरील खोट्या बातम्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा खोट्या बातम्यांमुळे मागील काळात सामाजिक तणाव निर्माण झालेले दिसून आले आहे. त्याचबरोबर एखाद्याची नाहक बदनामी करून, अपप्रसिद्धी करून खासगीपणाच्या अधिकारावरही अशा फेक न्यूज गदा आणत आहेत. सेलिब्रेटी कुटुंबातील असल्याने आराध्याची चर्चा झाली; पण अशा अनेकांना या फेक न्यूजचा त्रास होत आहे. याबाबत समाजमाध्यमांची जबाबदारी निश्चित केली जाणार की नाही, हा खरा प्रश्न आहे.
साधारण: पंचवीस वर्षांपूर्वी ब्रिटनची सौंदर्यवती डायनाचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने जग हादरले. डायना म्हणजे ब्रिटिश रॉयल फॅमिलीतील राजकन्या. तत्कालीन काळात नामांकित सेलिब्रिटी आणि तिच्या बातम्या या माध्यमांच्या टीआरपी वाढविणाऱ्या होत्या. तिचा मृत्यू अपघाताने झाला असला तरी त्याचे कारण शोधताना “पापाराझ्झी’ हे नाव पुढे आले.
हे पापाराझ्झी कोण? तर तिचा पाठलाग करणारे आणि तिच्या खासगी आयुष्यात डोकावणारी मंडळी. डायनाची प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी उत्सुक असलेली ही मंडळी तिच्यावर 24 तास लक्ष ठेवून असायची. त्यांचा ससेमीरा चुकवताना गाडी आदळली आणि दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. अर्थात त्याकाळी आतासारखे सोशल मीडियाचे पेव फुटलेले नव्हते.
आज सोशल मीडियामुळे सिनेसृृृष्टीतीलच नव्हे तर एकंदरच वलयांकित व्यक्तींचे खासगी आयुष्य त्रासदायक बनत चालले आहे. विशेषतः चोवीस तास दळण दळणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि इंटरनेटवरील ऑनलाइन चॅनेल्स हे सेलिब्रेटींच्या आयुष्यात सतत डोकावत असतात. त्यांच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या घटना दाखवून अकारण तर्कहीन प्रश्न उपस्थित करत असतात. यामध्ये काही नातेसंबंधांचे असतात, प्रेमसंबंधांचे असतात, कौटुंबिक कलहांचे असतात तर काही वेळा संपत्तीशी संबंधित असतात. माध्यमस्वातंत्र्य असल्याने त्यांच्याविषयी बोलण्याची सोय नसल्याने अनेक सेलिब्रेटींना या बातम्यांमधून पसरवल्या जात असलेल्या अफवांचा त्रास मुकाट्याने सहन करावा लागतो.
अलीकडेच, महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन हिच्याबाबत घडलेला प्रसंग या सर्वांतील कडी म्हणावी लागेल. बच्चन कुटुंबाची ही नात थेट अत्यवस्थ असल्याचा व्हिडिओ यू-ट्युबर प्रसारित करण्यात आला. प्रत्यक्षात ती फेक न्यूज होती. ही खोटी बातमी दोन यू-ट्युब चॅनेल्सवर आणि एका वेबसाइटवर दाखवण्यात आली. ते पाहून बच्चन कुटुंब हादरले आणि त्यांनी याबाबत थेट न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी दरम्यान दिल्ली हायकोर्टाने आराध्याविषयी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशी बातमी असेल तर ती काढून टाकण्याचे आदेश दिले.
तसेच आराध्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी खोटे दावे करणारे कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ किंवा आर्टिकल असतील तर तेही ताबडतोब काढून टाकण्याचे आदेश दिले. तसेच याप्रकरणी न्यायालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यू-ट्युबला फटकारले. आराध्याबद्दल एकही खोटी बातमी यू-ट्युबवर असता कामा नये असे आदेशही दिले आहेत. भविष्यात अशा फेक न्यूज शेअर करू नयेत, असेही न्यायालयानं म्हटले आहे. दिशाभूल करणारा मजकूर पोस्ट केला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी कोणतीही धोरणे नाहीत का, अशी विचारणा न्यायालयाने केली केली. परंतु, यू-ट्युब एक मंच आहे, तिथे काय शेअर केले जाते याला आम्ही जबाबदार नाही, असा युक्तिवाद यू-ट्युबकडून करण्यात आला. न्यायालयाने तो फेटाळून लावला. यानिमित्ताने पुन्हा एकदा खासगीपणाच्या अधिकाराचा मुद्दा चर्चेत आला आहे.
मनोरंजनाच्या झगमगाटात एकीकडे सेलिब्रिटींच्या कामाचे कौतुक होत असताना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. आज सोशल मीडियामुळे सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्यावर एकप्रकारे संक्रांत आली आहे. प्रत्येक जण स्वत:ला सांभाळून राहण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करत असताना कोणाचा तरी कॅमेरा नको असलेली गोष्ट टिपतो आणि सोशल मीडियावर एकच हल्लकोळ उडतो. अशा प्रकारच्या ट्रोलिंगचा फटका केवळ कलाकारांना नाही तर त्यांच्या मुलांना देखील सहन करावा लागतो. काही स्टारकिड्स सोशल मीडियावर सदैव चर्चेत असतात.
विशेषत: बच्चन कुटुंबीय हे ट्रोलर्सच्या आणि समाजमाध्यमांच्या नेहमीच रडारवर राहिले आहे. महानायक अमिताभपासून आराध्यापर्यंत सोशल मीडियावर त्यांच्याविषयी खऱ्या आणि खोट्या बातम्या पसरवल्या जातात. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या, अभिषेक आणि जया बच्चन ही चारही मंडळी सिनेसृष्टीतील असल्याने त्यांचा चाहता वर्ग सबंध देशभरात आहे. अशी बहुलोकप्रियता असणारी व्यक्तिमत्त्वे सनसनाटीच्या शोधात असणाऱ्या चॅनेल्सच्या रडारवर असतात. आज ज्या आराध्याची चर्चा होत आहे, तिच्या आईविषयी म्हणजेच ऐश्वर्या रायच्या गर्भारपणाविषयी आराध्याच्या जन्मापूर्वी अनेक फेक न्यूज पसरवल्या जायच्या, पण त्यावेळी बच्चन कुटुंबीयाने संयमाची भूमिका घेतली. करिना कपूर, शिल्पा शेट्टी, सुश्मिता सेन, काजोल, शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट, दीपिका पदुकोण, रणवीर अशा अनेक सेलिब्रेटींच्या वक्तव्यांचा,
छायाचित्रांचा वाट्टेल तो अर्थ काढून यू-ट्युब चॅनेल्स आपल्याकडे व्ह्यूअर्सना आकर्षित करत असतात. यातून यू-ट्युबलाही फायदा होत असतो. त्यामुळेच न्यायालयाने “तुम्हाला व्यवसायातून पैसे मिळत असतील तर तुमची सामाजिक जबाबदारी नाही का, असा सवाल यू-ट्युबलाही केला आहे. सुनावणी करताना न्यायालयाने प्रत्येक मुलांना सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार आहे, असे म्हटले आहे. एखाद्या मुलाच्या बाबतीत चुकीची माहिती पसरवणे हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. ज्या लोकांनी हा व्हिडिओ तयार केला आहे, त्यांची नावे जाहीर करावीत, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले आहेत. न्यायालयाचा हा निर्णय हजारो मुलांना खासगी आयुष्य जपण्यास तसेच कंपन्यांना जबाबदार वर्तन करण्यास उपयुक्त ठरणार आहे. समाज माध्यमांना बेजबाबदार वागता येणार नाही, असेही या निर्णयाने अधोरेखित केले आहे.
या प्रकरणाची दुसरीही बाजू लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे अनेकदा सेलिब्रेटींना आपल्याप्रमाणेच आपल्या मुलांनाही प्रचंड प्रसिद्धी मिळावी अशी इच्छा असते. त्या उद्देशाने ही मंडळी सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडिओ अपलोड करत असतात आणि चाहत्यांकडून प्रशंसा मिळवत असतात, पण बालमानसोपचार तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियावर अल्पवयात मिळणारी प्रसिद्धी मुलांसाठी हिताची नसते. तसेच नंतरच्या काळात मुलांना कमी वयात सोशल मीडियाचे व्यसन लागण्याची शक्यता असते.
त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे, आपल्या पाल्यांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी त्यांना एक्स्पोज करताना किंवा प्रमोट करताना त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. आराध्याच्या प्रकरणाने हा मुद्दा अधोरेखित केला आहे. चंदेरी नगरीत “बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ’ हा फॉर्म्युलाही वापरला जातो. त्यामुळे अनेक सेलिब्रेटी आपल्याविषयी प्रसिद्ध होणाऱ्या उलटसुलट बातम्यांकडे दुर्लक्षही करत असतात. त्यातून आपले नाव चर्चेत राहते याचा आनंद घेत राहतात. पण अशातूनच आराध्यासारखी प्रकरणे घडतात हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे बच्चन कुटुंबीयांप्रमाणेच सर्वच सेलिब्रेटींनी अशा फेक न्यूज विरोधात त्या-त्या क्षणी पावले उचलणे गरजेचे आहे.
शेवटचा मुद्दा आहे तो सोशल मीडिया कंपन्यांचा. या कंपन्यांना आजवर अनेकदा विविध प्रकरणात कडक इशारे देण्यात आले आहेत; परंतु त्या केवळ आणि केवळ नफाकेंद्री असल्याने त्यांना अशा प्रकारची तंबी देऊनही फारसा फरक पडत नाही, असे दिसून आले आहे. त्यामुळेच मध्यंतरी केंद्र सरकारने देशविघातक माहिती पसरवणारे अनेक यू-ट्युब चॅनेल्स थेट बंद करून टाकले होते, पण अनेकदा अशी कारवाई झाली की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा पुढे येतो, पण त्यामुळेच काळ सोकावत जातो हे लक्षात घेतले पाहिजे. हा काळ सोकावत जाण्यामागे समाजमाध्यमे वापराविषयीच्या तारतम्याचा अभाव असल्याने सदैव त्यावर रेंगाळणारी जनताही तितकीच कारणीभूत आहे.
– अपर्णा देवकर