सिनेसृष्टीतील जुन्या नायिकांमधील एक अत्यंत लोकप्रिय आणि दमदार अभिनयकसब असणारी अभिनेत्री म्हणून वहिदा रहमान यांना सिनेरसिकांची अफाट लोकप्रियता लाभली. आता यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार आहे. निरागसपणा, लोभसवाणे सौंदर्य, नृत्यकलानिपुणता आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जादूने वहिदा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांच्या मनोराज्यावर दीर्घकाळ मोहिनी घातली. वहिदांपूर्वीच्या अभिनेत्रींनी सौंदर्य, अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर प्रगती केली. पण वहिदा यांच्यामध्ये तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि नम्रपणा यांचा अनोखा मिलाफ होता. त्यांना असणारा “कॅमेरा सेन्स’ अफलातून होता. यामुळेच त्या यश चोप्रा, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, महेश भट्ट, राज खोसला आणि गुलजार यांसारख्या दिग्गजांची आवडती अभिनेत्री बनल्या.
बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 1950 ते 1970 हा काळ हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात चित्रपटसृष्टीत अनेक प्रयोग तर झालेच; पण अनेक उत्कृष्ट कलाकारांच्या दमदार अभिनयाची झलकही सिनेरसिकांना लाभली. वहिदा रहमान या कलाकारांपैकी एक होत्या. आपल्यातील निरागसपणा, लोभसवाणे सौंदर्य, नृत्यशास्त्राचे अंगी बाणवलेले कसब आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जादूने वहिदा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांच्या मनोराज्यावर दीर्घकाळ मोहिनी घातली. त्या काळातील बहुतेक कलाकारांना वहिदांसोबत काम करण्याची इच्छा असायची. 1955 साली “जयसिम्हा’पासून सुरू झालेला वहिदा यांचा चित्रपट प्रवास “रंग दे बसंती’ आणि “दिल्ली 6′ सिनेमानंतरही सुरू राहिला.
वहिदा मूळच्या तामिळनाडूच्या. चेंगलपट्टू येथील एका सुशिक्षित तमिळ-मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जिल्हा दंडाधिकारीसारख्या उच्च पदावर होते. मात्र, वहिदांना वडिलांचे प्रेम फार काळ लाभले नाही. त्या नऊ वर्षांच्या असताना पित्याचे छत्र हरपले. पुढे सात वर्षांनी आईही गेली आणि त्या पोरक्या झाल्या. वडिलांच्या निधनानंतर एक वर्षांनी वहिदांनी “रोजुलु मराई’ या तेलगू चित्रपटात बालकलाकाराची भूमिका केली. त्यांच्या सिनेजगतातील प्रवेशाचा तो ओनामा होता. तोपर्यंत त्या भरतनाट्यमच्या उत्कृष्ट नृत्यांगना बनल्या होत्या. चित्रपटसृष्टीच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत असताना प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते-दिग्दर्शक गुरुदत्त यांच्याशी त्यांचा संपर्क आला.
1956 मध्ये गुरुदत्त यांनी देव आनंदच्या “सीआयडी’मध्ये वहिदा रहमान यांना खलनायकाच्या भूमिकेत कास्ट केले आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. यानंतर 1957 मध्ये गुरुदत्त आणि वहिदा रहमान यांचा क्लासिक चित्रपट ‘प्यासा’ रिलीज झाला. त्यानंतर गुरुदत्त यांच्यासोबत वहिदा रहमान यांनी “कागज के फूल’, “चौदहवी का चांद’, “साहिब, बीबी और गुलाम’ यांसारखे चित्रपट केले. वहिदा रहमान आणि देव आनंद यांची जोडी त्याकाळात प्रचंड गाजली होती. यंदाचे वर्ष हे देवसाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असताना त्यांच्या सहनायिकेला सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार जाहीर होणे, हा एक गोड योगायोग म्हणायला हवा. या दोघांनी हिंदी चित्रपटसृष्टीला पाच सुपरहिट चित्रपट दिले होते. हे चित्रपट म्हणजे सीआयडी, सोलवॉं साल, काला बाजार, बात एक रात की आणि गाईड.
याशिवाय “रूप की रानी चोरों का राजा’ आणि ‘प्रेमपुजारी’ या चित्रपटातही देव आनंद आणि वहिदांची जोडी समीक्षकांची पसंती मिळवून गेली. “गाईड’मधील वहिदांनी साकारलेल्या रोझीच्या व्यक्तिरेखेचे आणि अभिनयाचे त्यावेळी प्रचंड कौतुक झाले होते. आपल्या पतीला सोडून तिच्या प्रियकराशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या एका महिलेची कथा तत्कालीन सामान्य भारतीय कुटुंबाला मान्य होणारी नव्हती; परंतु वहिदा आणि देवसाहेब यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. 1960 चे दशक वहिदा रहमानच्या कारकिर्दीसाठी अत्यंत यशस्वी मानले पाहिजे. या काळात, सुपरहिट चित्रपट देण्यात त्या समकालीन अभिनेत्रींमध्ये आघाडीवर राहिल्या. “बीस साल बाद’, “कोहरा’, “राम और श्याम’, “पत्थर के सनम’, “एक फूल चार कांटे’, “मुझे जीने दो’, “मेरी भाभी’ यांसारख्या चित्रपटांनी वहिदा यांची कारकीर्द उत्तरोत्तर बहरत राहिली.
अर्थात, याकाळात त्यांच्या काही चित्रपटांनी तिकीट खिडकीवर आपटीही खाल्ली. सशक्त कथानक आणि चित्रपट समीक्षकांकडून प्रशंसा मिळूनही, 1966 मध्ये आलेला “तिसरी कसम’ आणि 1971 मध्ये आलेला “रेश्मा और शेरा’ या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर निराशा पत्करावी लागली. 1974 मध्ये तत्कालीन सुपरस्टार अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबतचा “खामोशी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला. 1959 ते 1964 दरम्यान, वहिदा रहमान सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होत्या. 1966 ते 1969 या काळात समकालीन अभिनेत्री नंदा आणि नूतन यांच्यासोबत त्या या यादीत दुसऱ्या स्थानावर होत्या. अभिनेत्री नंदा ही वहिदांच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक होती. 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या “काला बाजार’ या चित्रपटात दोघींनी सहकलाकाराच्या भूमिका केल्या होत्या.
विवाहानंतर वहिदांनी चित्रपटातील आपला अभिनय कमी कमी करत नेला. 1976 ते 1994 या काळात त्यांनी जवळपास 24 चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. यामध्ये अदालत, कभी कभी, त्रिशूल, नमक हलाल, हिम्मतवाला, कुली, मशाल, अल्लारखा, चांदनी आणि लम्हें यांचा समावेश होता. 2000 मध्ये पतीच्या निधनानंतर त्यांनी पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन केले. “अदालत’ चित्रपटात वहिदांनी अमिताभ बच्चन यांच्या मैत्रिणीची भूमिका केली होती, तर “त्रिशूल’मध्ये त्या अमिताभच्या आईच्या भूमिकेत होत्या.
वहिदा यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला त्याकाळात देशात शिक्षण आणि साहित्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत होते. पूर्वीच्या नायिका तितक्या शिकलेल्या नव्हत्या. पण वहिदा यांनी विचारपूर्वक या क्षेत्रात प्रवेश करताना नृत्य प्रशिक्षण आणि शिक्षण घेतले. तीन पिढ्यांची आवडती अभिनेत्री होण्याचे भाग्य त्यांना लाभले. अत्यंत शांत, हुशार आणि संयमी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख अवघ्या सिनेसृष्टीत आहे. कुशल नृत्यांगना असल्याने वहिदा यांच्यासाठी चित्रपटांतील संधींची दारे उघडू लागली.
वहिदांपूर्वीच्या अभिनेत्रींनी सौंदर्य, अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर प्रगती केली. पण वहिदा यांच्यामध्ये आणखी एक गोष्ट होती, ती म्हणजे बौद्धिक वेगळेपण किंवा तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि नम्रपणा यांचा अनोखा मिलाफ. त्यांना असणारा “कॅमेरा सेन्स’ अफलातून होता. अभिनय करताना कॅमेऱ्यासमोर आपल्याला कसे आणि किती सादर व्हायचे आहे, याचे भान त्यांना कायम असायचे. “तिसरी कसम’मधील हीराबाई, “प्यासा’मधील गुलाबो यांसारख्या व्यक्तिरेखा साकारताना वहिदांचे भुरळ पाडणारे भाव निरागस आणि नैसर्गिक वाटत.
यामागचे रहस्य म्हणजे त्यांची अभिनयशैली. “चौदहवी का चांद’मध्ये आपल्या पतीवर मनापासून प्रेम करणारी व्यक्तिरेखा साकारताना वहिदांच्या अभिनयातून दिसलेला समर्पित भाव अजोड होता. यामुळेच त्या यश चोप्रा, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, महेश भट्ट, राज खोसला आणि गुलजार यांसारख्या दिग्गजांची आवडती अभिनेत्री बनल्या. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान होणे हा त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतला सर्वोच्च बिंदू म्हणावा लागेल.
-सोनम परब