संगमनेर – संगमनेर तालुका दुष्काळाचे रोलमॉडेल असल्याची वाहवाह बाळासाहेब थोरात एकीकडे करतात, मात्र दुसरीकडे तालुक्यात सर्वाधिक टॅंकर चालू असल्याचे सांगतात. हे तुमचे दुष्काळाचे रोलमॉडेल का? हे मॉडेल आता कालबाह्य होणार असल्याची टिका थोरातांचे कट्टर राजकीय विरोधक गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
संगमनेर शहरातील शासकीय विश्राम गृहासमोरील व्यापारी संकुलात जनसंपर्क आणि माहिती सुविधा केंद्राचे उद्घाटन सोमवारी विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
विखे म्हणाले की, काही लोकांनी सोशल मिडीयावर राज्यात पुरस्थिती उद्भवलेली असतांना कार्यालयाच उदघाटन म्हणजे असंवेदनशीलतेच कळस असल्याची टीका सुरु केल्याचे सांगत शीला दीक्षितांच्या निधनानंतर दिल्लीला न जाता भोजनावळीत येथील नेते व्यस्त होते. सोशल मिडीयाचा वापर टिकेसाठी करण्याऐवजी तालुक्यातून दुध, तूप, सुगंधी दुधाच्या बाटल्या पूरग्रस्तांना मदत म्हणून पाठवायला हव्या होत्या. मात्र तसे न करता पूरग्रस्तांन प्रती दाखवलेली ही सुद्धा असंवेदनशीलता असल्याचा टोला त्यांनी लगावला.
निळवंडेसाठी पुढाकार घेतल्याचे सांगणाऱ्यांनी नेमका काय पुढाकार घेतला असा प्रश्न उपस्थित करत धरणाच्या कामावर मुठभर ठेकेदारांची पोट भरली गेली, मात्र जनतेच्या पोटाची खळगी कोणी भरायची. निळवंडेच्या कामा संदर्भात पिचड यांचे अभिनंदन करायला हवे. त्यांनी कालव्याच्या कामांना मान्यता दिली. राज्य सरकारने देखील याबाबत निर्णय घेत धरणाच्या कामासाठी बाराशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र ज्यांनी या पाण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहायला लावली त्यांचे नेमके काय करायचे हे ठरविण्याची वेळ आली आहे.त्यासाठी तुम्ही सर्वांनी एक राहण्याचे आवशकता असल्याचे ते म्हणाले.