महिला संघटनांची शिरूर पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी
शिरूर- शिरूर शहरात रोड रोमिओमुळे महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे पोलिसांनी रोड रोमिओ यांना वेळीच आवारावे, अश्या मागणीचे निवेदन आदिशक्ती, रामलिंग उन्नती संस्था, वारसा, युवा स्पंदन या चारही संस्थेच्या वतीने शिरूर पोलिसांना देण्यात आले.
यावेळी आदिशक्ती महिला मंडळाचे अध्यक्ष शशिकला काळे, रामलिंग उन्नती संस्थेच्या अध्यक्ष राणीताई कर्डिले, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला अध्यक्ष पल्लवी शहा, वारसा फाउंडेशनच्या मंजुश्री थोरात, युवा स्पंदनच्या प्रियांका धोत्रे, डॉक्टर वैशाली साखरे, ललिता पोळ, अलका ढाकणे, संगिता रोकडे, मनीषा तरटे व महिला उपस्थित होत्या.
हिंगणघाट येथे तरुणीवर पेट्रोल हल्ला करून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच महिलांना जाळणे व त्यांच्यावर बलात्कार सारखे अत्याचार करणे या प्रकारात वाढ झाली असून असे कृत्य करणाऱ्यांविरोधात न्यायालयात जलदगती खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. तसेच हिंगणघाट येथे घडलेल्या घटनेचा महिलांनी निषेध केला.
शिरूर शहरातही मोठ्या प्रमाणात रोडरोमियो यांचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. यासाठी शिरूर शहरातील कॉलेज शाळा खासगी ट्युशन, एसटी स्टॅंड, निर्माण प्लाझा, जिजामाता गार्डन, बाबुराव नगर या परिसरात महिला व पुरुष पोलिसांचे फिरते पथक असायला हवे, अशी मागणी आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे यांनी पोलिसांकडे केली आहे.
- “त्या’ नराधमांना शिक्षा द्या
राज्यामध्ये महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढत आहे. महिला आयोगाचे वाक्य आहे “साद दे साथ घे’ परंतु महिलांना साथ कोणी देत नाही म्हणूनच महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. तसेच हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही सर्व महिला संघटनांनी केली आहे.