पिंपरी, दि. 21 (प्रतिनिधी) – ओला आणि सुका कचरा त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्याच्या केंद्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याने भाजपाला उच्चभ्रू वसाहतीतील उच्चशिक्षीत वर्गाचा रोष ओढवून घ्यावा लागला. हा आदेश पाठीमागे घेण्याची घोषणा करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या बैठकीकडे शिंदे गटाचे (बाळासाहेबांची शिवसेना) खासदार श्रीरंग बारणे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठ फिरवल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.
पालकमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांचा आजचा पिंपरी-चिंचवडचा दौरा नियोजत होता. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक घेऊन नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, पक्षाचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी पक्षनेते एकनाथ पवार आणि नामदेव ढाके आदी उपस्थित होते. मात्र, या बैठकीकडे शहरातील शिंदे गटाच्या सर्वच नेत्यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा केली जात आहे. शिंदे गटाचे तगडे नेतृत्व मानले जाणारे खासदार बारणे आणि माजी खासदार आढळराव पाटील यांनी मात्र बैठकीपासून फारकत घेतली. या बड्या नेत्यांव्यतिरिक्त एकही कार्यकर्ता पालकमंत्र्यासोबत उपस्थित नव्हता. या नेत्यांसह कार्यकर्त्यांना शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याबाबत फारसे गांभीर्य नसल्याचे बोलले जात आहे.
भाजपासोबत हातमिळवणी केल्यानंतर राज्यात शिंदे गट सत्तेत आला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करत खासदार बारणे आणि माजी खासदार आढळराव पाटील यांनी बंडखोरीचे निशान हाती घेऊन शिंदे गटात सहभाग घेतला. पिंपरी-चिंचवड, मावळ आणि शिरुरच्या मोर्चेबांधणीची जबाबदारी देखील दोघांनी खांद्यावर घेतली. हे करत असताना भाजप मंत्र्यांचा विश्वास संपादन करूनच दोन्ही लोकसभा मतदार संघाचा कार्यभार सांभाळण्याच्या जबाबदारीचा या आजी-माजी खासदारांना विसर पडल्याचे दिसते.
आज पालकमंत्री पाटील हे वेळ काढून पिंपरी-चिंचवड शहरात आले असताना त्यांच्या बैठकीकडे दोघांनीही पाठ फिरवली. त्यामुळे हे आजी-माजी खासदार भाजपाच्या मंत्र्यांवर नाराज आहेत का?, असा प्रश्न
उपस्थित होत आहे.
आढळरावांची नाराजी
शिंदे गट आणि भाजपा सत्तेत आल्यानंतर भाजपाच्या केंद्रीय समितीने थेट शिरुर लोकसभा मतदार संघात लक्ष घालण्यास सुरुवात केली. मतदार संघाच्या निवडणूक प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली होती. त्यानुसार केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग यांनी शिरुर मतदार संघाचा तीन दिवस दौरा केला. दरम्यान, बुथनुसार नियोजनाची पाहणी, लोकसभा समितीच्या नियोजनाचा आढावा, संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यामुळे भाजपाच्या या रणनितीवर माजी खासदार आढळराव पाटील कमालीचे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घातल्याने त्यांच्यासाठी हा मतदार संघ सुटण्याची तिळमात्र शक्यता दिसत नाही. ही नाराजी आजच्या बैठकीनंतर प्रकर्षाने जाणवल्याने कार्यकर्त्यांवर आवाक होण्याची वेळ आली आहे.