मुंबई – विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि राज्यातील काही शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी राज्य विधीमंडळात गदारोळ झाला. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाजही काही काळ तहकुब करावे लागले.
आम आदमी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी सोमवारी दरेकर यांच्याविरोधात मुंबई बॅंक घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मजुरांची खोटी संस्था स्थापन करून आणि स्वता मजुर असल्याचे दाखवून दरेकरांनी या कोट्यातून बॅंकेच्या संचालक मंडळावर स्थान मिळवले होते.
दरेकरांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या विषयावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहात गदारोळ निर्माण केला असतानाच शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी थकबाकी न भरल्याने तोडण्यात आलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करावी, अशी मागणी केली त्यावरूनही वातावरण तापले. दोन्ही सभागृहात हेच दृष्य दिसले त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दोन वेळा तहकुब करावे लागले. कामकाज दुसऱ्यांदा तहकूब झाल्यानंतर भाजपचे सदस्य महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाच्या वेलमध्ये आले होते.
त्याचवेळी शिवसेनेचे महेश शिंदे आणि बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मरला वीज पूर्ववत करण्याची मागणी केली. त्यावर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब म्हणाले की, या विषयावर सभागृहात चर्चा केली जाईल.
त्यावर फडणवीस यांनी असा सवाल उपस्थित केला की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही असे जाहीर आश्वासन विधीमंडळात दिले असताना सरकारला अजून कसली चर्चा सभागृहात करायची आहे.
शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याबाबत राज्य सरकारने तातडीने स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.