नांदुर- लोकशाही असलेल्या देशात मतदानाला महत्व असून ते कर्तव्य बजावण्याकरीता प्रत्येक नागरिक पुढे सरसावत असतो. आजच्या विधानसभा निवडणूक मतदानावर पावसाचे सावट होते. यामुळे नांदूर (ता. दौंड) येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदारांची गर्दी तुरळकच होती.
अकराच्या सुमारास पावसाने उघडीप दिल्यानंतर मतदारांची संख्या वाढू लागली. दुपारी 12 पर्यंत 40 टक्के मतदान झाले होते. याच मतदान केंद्रावर जाईबाई कोंडीबा बोराटे या 105 वर्षांच्या आजींनी मतदान केल्याने हे या केंद्रातील वैशिष्ठ्य ठरले. सायंकाळी 4 ते 5 पर्यंत या मतदार केंद्रातील जवळपास 100 टक्के मतदान पूर्ण करून घेण्यात शासकीय अधिकाऱ्यांना यश आले.