नवी दिल्ली : भारतात येणारी टपाल सेवा थांबवण्याचा एकतर्फी निर्णय घेऊन पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग केला आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पाकिस्तानला फटकारले.
पाकिस्तानचा हा निर्णय म्हणजे आंतरराष्ट्रीय टपाल संघाच्या नियमांचे सरळसरळ उल्लंघन आहे. पण पाकिस्तान पकिस्तान आहे. या निर्णयाची भारताला कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आली नव्हती, अशी पुस्तीही प्रसाद यांनी जोडली. असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
पाकिस्तानने भारतातील बटवडा देण्याचे 27 ऑगस्टपासून थांबवले आहे. काश्मिरातून 370 कलम हटवल्याच्या रागातून त्यांनी हे पाऊल उचलले होते. याबाबत बोलताना पोस्टाचे संचालक आर व्ही चौधरी म्हणाले, हा त्यांनी त्यांच्या बाजून घेतलेला निर्णय आहे. त्यांनी अशा भूमिका प्रथमच घेतली आहे. हा आदेश ते कधी उठवतील, याची आम्हाला कोणतीही कल्पना नाही.