फलटण – परस्पर उमेदवारी अर्ज न भरण्याचे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी करुनदेखील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 121 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राजे गटात बंडाळी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बंडाळी रोखण्याचे आव्हान राजे गटाच्या नेतृत्वासमोर आहे. दरम्यान, ही निवडणूक खासदार गट लढवणार नसल्याचे दिसत आहे. कॉंग्रेस, शिंदे शिवसेना, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि रासपने या निवडणुकीत नशीब आजमावण्याचे ठरवले आहे. तालुक्यातील सत्ताधारी वगळता इतर पक्षांची या निमित्ताने “लिटमस टेस्ट’ होणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. बुधवार (दि. 5) रोजी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. गुरुवार (दि. 6) ते गुरुवार (दि. 20) पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. खऱ्या अर्थाने या निवडणुकीत किती उमेदवार रिंगणात असतील, हे दि. 20 रोजीच समजेल. एकंदरीत 121 जणांचे आलेले उमेदवारी अर्ज म्हणजे राजेगटाच्या नेतृत्वाला डोकेदुखी ठरली आहे. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार फलटण तालुक्यात कोणतीही निवडणूक लढवली जात नसल्याचा आरोप करत कॉंग्रेसने आपले अर्ज दाखल केले आहेत. एकनाथ शिंदे याचा शिवसेना पक्ष तालुक्यात नशीब आजमावणार आहे.
उध्दव ठाकरे यांची शिवसेना तालुक्यातील डीपी किंवा इतर ग्रामीण भागातील कामे सातत्याने पाठपुरावा करुन पूर्ण करुन घेताना दिसत होती. आता या कामांची पोचपावती
उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार का, अशी चर्चा आहे. दुसरीकडे धनगर समाजाचे मताधिक्य ओढून घेण्याच्या विचारात राष्ट्रीय समाज पक्ष उभा ठाकला आहे. पण, रासप कितपत तग धरेल, हे सध्या कोणीही सांगू शकत नाही. अर्थातच राजेगटाअंतर्गत बंडाळी सोडल्यास इतरांची लिटमस टेस्ट होणार आहे.
खासदार गटाची भूमिका आस्ते कदम
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या निवडणुकीत आस्ते कदम भूमिका घेतली आहे. त्यांच्या गटाचा एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. ही बाब देखील आश्चर्याची नाही, बाजार समितीतील मताधिक्य विचारात घेतल्यास खासदार रणजितसिंह यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ही चाल त्यांना पूरक ठरणार आहे. सोबतच भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातील खासदारांच्या वलयाला या आजच्या चालीमुळे धक्का पोहोचू शकणार नाही, हेही तितकेच खरे. पण, पक्षाचा आदेश काय असतो आणि नेत्याचा आदेश कसा पाळायचा असतो, याचे उदाहरणच फलटण तालुक्यासमोर खासदारांच्या कार्यकर्त्यांनी ठेवले आहे. एकीकडे भरमसाठ अर्ज दाखल करुन वेळप्रसंगी बंडखोरी करण्याची तयारी राजेगटातील कार्यकर्त्यांची आहे. याचाच उलट भाग एकदा आदेश दिला की तो सर्वांनी पाळायचा हे चित्र खासदार गटात दिसत आहे.