पळसदेव – करोनाचा वाढता प्रादुर्भाव व चुकीच्या अफवांमुळे तोट्यात गेलेल्या पोल्ट्री व्यवसायाला पुन्हा उभारी मिळू लागली असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
चिकन खाल्ल्यामुळे करोना होतो, असा समज झाल्याने अगदी मोफत कोंबड्या वाटण्याची वेळ पोल्ट्री व्यावसायिकांवर आली होती. अनेकांनी कोंबड्या शेतात सोडून दिल्या तर कोणी जमिनीत गाडून टाकल्याच्या घटना पाहावयास मिळाल्या. अनेकांनी गाड्याच्या गाड्या भरून अंडी फेकून दिल्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले.
सध्या ग्रामीण भागात 160 ते 180 रुपये किलोपर्यंत चिकनला दर मिळत आहे. सध्या मार्केटमध्ये चिकनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अंड्याचा बाजारभाव देखील 4 ते साडेचार रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे पुन्हा पोल्ट्री व्यवसायाला अच्छे दिन आले असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
पोल्ट्री व्यवसाय कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे तोट्यात जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या करोनामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. तर मागच्या वर्षी दुष्काळामुळे कोंबड्यांचे खाद्य महाग झाले होते. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक होत होता, त्यामुळे फारसा काही फायदा झाला नाही.पळसदेव परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून शेड उभा केले आहेत. यामध्ये सहा हजार पक्षाचे पालन करून दररोज सध्या पाच ते साडेपाच हजार अंड्याचे उत्पादन होते.
यामधून दररोज वीस ते पंचवीस हजार रुपयांचे उत्पादन होते. सध्या अंड्याचा भाव कमी आहे. भाव वाढल्यावर उत्पादन देखील चांगल्या प्रमाणात वाढते. यामध्ये दररोज बारा हजाराचे खाद्य, कामगार, वीज, पाणी, बॅंक हफ्ता हे सर्व धरून पंधरा ते सोळा हजार रुपये रोजचा खर्च होतो. यामधून पाच ते सहा हजार रुपये रोजचे शिल्लक राहतात. अनेक शेतकरी करार पद्धतीने हा व्यवसाय करतात मग नफाही त्याच प्रमाणात होतो. यामध्ये स्वतः व्यवसाय करून विक्री केली तर यामधून चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळू शकते.
नागरिकांमधील गैरसमज दूर
सध्या करोनाच्या संकटात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण एक महिना या कोंबड्यांना त्या केवळ जिवंत राहतील एवढेच खाद्य देण्यात येत होते. या दरम्यान उत्पादन मिळाले नाही ते उत्पादन घेऊन फायदाही होणार नव्हता ग्राहक नसल्याने व्यापारी येत नव्हते म्हणून हा पर्याय निवडला होता. सध्या मार्केटमध्ये कोंबड्याच नाहीत शिवाय नागरिकांमधील गैरसमज दूर झाला आहे, त्यामुळे पुन्हा ग्राहक येत असल्याने आत्ता पुन्हा हा व्यवसाय जोमाने सुरू झाला आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव व सोशल मीडियावर पसरणाऱ्या चुकीच्या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय तोट्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना कमी दरात तर काहींना फुकट कोंबड्या वाटप केल्या होत्या. तरीही नागरिक चिकन, मटन खाण्यास धजावत नव्हते. परंतु सध्या नागरिकांमधील गैरसमज दूर झाल्यामुळे मागणी वाढू लागली आहे. यामुळे सध्या तरी पोल्ट्री व्यावसायिकांना अच्छे दिन येत असल्याचे दिसत आहे.
– प्रवीण काळे,
पोल्ट्री व्यावसायिक.