मुंबई – देशातील आणि परदेशातील आर्थिक परिस्थितीचा आढावा रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाने शुक्रवारी नागपुरात घेतला. गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी देशातील आणि परदेशातील आर्थिक परिस्थितीवर चर्चा केली होती. (Review of economic conditions by RBI; The central board meeting of the bank was held in Nagpur)
रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदाला मंजुरी दिली आहे. देशातील आणि परदेशातील परिस्थिती लवचिक आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेवर आणि वित्तीय स्थिरतेवर याचा काय परिणाम होऊ शकतो या विषयावर या बैठकीत चर्चा झाली असल्याचे काही माध्यमांनी सूचित केले आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास होते. रिझर्व्ह बँकेने या संदर्भात काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने देशातील आणि परदेशातील परिस्थितीचा आढावा घेतला. जागतिक पातळीवर सध्या बरीच अनिश्चित परिस्थिती आहे. अनेक देशांमध्ये व्याजदर जास्त पातळीवर आहेत. त्याचबरोबर दोन युद्ध चालू आहेत.
तांबड्या समुद्रातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. खनिज तेलाच्या किमती काही प्रमाणात वाढत आहेत. करोनानंतर जागतिक व्यापारावर झालेला परिणाम अजून संपुष्टात आलेला नाही. तरीही भारतीय अर्थव्यवस्था अधिक ताकदीने मार्गाक्रमन करत आहे. या सर्व बाबींच आढावा या बैठकीत घेतला गेला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंट वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर ग्राहकांच्या शिक्षणासाठी व्यवसायिक बँकांना सक्रिय राहण्यास सांगितले आहे. ज्या ठेवीदारांनी ठेवी परत घेतलेल्या नाहीत अशा ठेवीदारांना माहिती कळवून ठेवी परत देण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावे असे रिझर्व्ह बँकेने या अगोदर सांगितले आहे.
या सर्व बाबींचा आढावा या बैठकीत घेतला गेला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने औपचारिक माहिती जारी केलेली नाही. या बैठकीला रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या संचालकाबरोबरच अर्थ मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.