पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- महामेट्रोने परतीच्या प्रवासाची (रिटर्न) तिकीट सेवा येत्या एक मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना जाताना आणि येताना वेगळे तिकीट काढावे लागणार आहे. त्यासाठी प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पुन्हा रांगेत थांबून किंवा आॅनलाईन तिकीट काढण्यासाठी स्थानकावर थांबावे लागणार आहे.
वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट असा मेट्रो मार्गाचा विस्तार केल्यानंतर प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या होत्या. त्यामुळे परतीची तिकीट सेवा सवलतीच्या दरात सुरू केली होती.
सकाळी व सायंकाळी मेट्रोला गर्दी असते. त्या वेळी प्रवाशांना रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करावे लागते; पण रिटर्न तिकीट सेवा असल्यामुळे परतीच्या प्रवासामध्ये प्रवाशांना तिकीट खिडकीवर थांबावे लागत नव्हते. शिवाय तिकिटाच्या दरात देखील बचत होत होती.
त्यामुळे परतीचे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. अलीकडे मेट्रोने परतीच्या तिकिटावर सवलत बंद केली आणि आता परतीचे तिकीट काढण्याची व्यवस्थाच बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ही सेवा बंद न करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
परतीच्या तिकिटासंदर्भात खूप तक्रारी येत होत्या. त्यामुळे अनेक वेळा बाचाबाची आणि प्रवाशांना दंड भरावा लागत होता. परतीचे तिकीट काढणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. – हेमंत सोनवणे कार्यकारी संचालक (जनसंपर्क), महामेट्रो