मंगलुरू – कर्नाटकात सध्या कोविडचे अजूनही अनेक निर्बंध कायम आहेत. हे निर्बंध दसऱ्यानंतर हटवले जातील असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी म्हटले आहे. आज येथे विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की दसऱ्यानंतर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील स्थितीचा आढावा घेतला जाईल आणि निर्बंध उठवण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
राज्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतही त्याचवेळी निर्णय घेतला जाईल असे त्यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. दक्षिण कन्नड जिल्ह्यात काही उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी मोरल पोलिसांची भूमिका बजावत जी कृत्ये केली आहेत.
त्याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की प्रत्येकानेच जबाबदारीने वागले पाहिजे. आपण सामाजिक सलोखा कायम ठेवला पाहिजे आणि समाजातील नैतिकताही टिकवली पाहिजे असे ते म्हणाले.