पिंपरी – विमा संरक्षण ही सध्याच्या काळाची अत्यावश्यक गरज झाली आहे. विम्याचे संरक्षण नसेल तर रुग्णांनी उपचार घ्यावे का, असा प्रश्न पडतो. कारण रुग्णालयात दाखल होताच लाखोंच्या घरात बिल मिळते. त्यामुळे विम्याचे संरक्षण अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळे विम्याचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य लोकांनाही मिळावा, यासाठी इंडिया पोस्ट आणि टाटा एआयजी या कंपन्यांनी विमा योजना सादर केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये ही योजना सुरू आहे. दररोज 500 ते 700 जण हा विमा काढत असून योजनास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सुमारे 13 टपाल कार्यालये आहेत. तेथे ही योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना वार्षिक 299 रुपये किंवा 399 रुपये प्रीमीयमपोटी भरून 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण प्राप्त करून घेता येते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेचे नूतनीकरण करावे लागते. विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्याला 10 लाख रुपयांच्या विमा संरक्षण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंत, तर बाह्यरुग्ण उपचारासाठी 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च दिला जातो. तसेच वय वर्षे 16 ते 65 वयोगटातील लोकांसाठी ही योजना असून 18 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील लोकांना या योजनेत सहभागी होता येणार नाही.
ही योजना टाटा एआयजी आणि इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेतर्फे सादर करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित व्यक्तीला पोस्ट पेमेंट बॅंकेमधे खाते उघडावे लागते. सध्या 500 ते 700 जण हा विमा सुरू करत असून या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– काळूराम पारखी, जनसंपर्क अधिकारी, चिंचवड.