राहू, (वार्ताहर)- दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव उपबाजारास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवार (दि.१५) सुमारे १८ हजार 500 पिशव्यांच्या वर कांदा पिशवीची आवक झाली आहे, अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती शरद कोळपे यांनी दिली.
कोळपे म्हणाले की, केडगाव उपबाजारामुळे शेतकऱ्याच्या वाहतूक खर्चात व वेळेत मोठी बचत झाली आहे. केडगाव उपबाजारात लिलावाच्या अगोदर वजन केले जाते. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे. योग्य नियोजन व पारदर्शक कारभार आदी कारणांमुळे केडगाव उपबाजारात शेतकऱ्यांचा विश्वास वाढत आहे. पुढील काळात अजून उलाढाल वाढण्यास मदत होईल, असा विश्वास कोळपे यांनी व्यक्त केला. यावेळी संचालक बापूसाहेब झगडे, श्रीकांत कदम व संतोष आखाडे उपस्थित होते.
आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचा कायापालट होणार असून त्याची चांगली सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून त्यांना न्याय देण्याचे काम करण्याचा प्रयत्न निश्चितच बाजार समिती करेल. – शरद कोळपे, उपसभापती, बाजार समिती, दौंड.