571 कोटींच्या आराखड्याला मंजुरी; एक हजार प्राथमिक शाळांच्या खोल्या पुढील तीन वर्षांत बांधणार ः पालकमंत्री
नगर – जिल्ह्यात जलशिवार योजना,चारा छावण्या व पाण्याच्या टॅंकरमध्ये घोटाळा झालेला आहे. त्याच्या चौकशीचे मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज,दि.20 नियोजन समितीच्या बैठकीत करत याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे लक्ष वेधले. त्यावर पालकमंत्र्यांनी या तिन्ही घोटाळ्यांच्या चौकशीचा ठराव करत तो शासनाकडे पाठविण्याची घोषणा केली. तसेच जिल्ह्याचा सन 2020-21 या वर्षाच्या 571 कोटीच्या आराखड्यास पालकमंत्र्यांनी या बैठकीत मंजूरी दिली.
मात्र,सदर यंत्रणांची मागणी बघता राज्यस्तर बैठकीत 971 कोटी रूपयांच्या आरखड्यास मंजुरी देण्यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल. तसेच जिल्ह्यातील एक हजार प्राथमिक शाळांच्या खोल्याचे बांधकाम व दुरूस्ती येत्या तीन वर्षात टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठक आज दि.20 जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
त्यावेळी विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले.तसेच अनेक लोकप्रतिनिधी व समित्याच्या सदस्यांनी विविध तक्रारींचा पाऊस पाडला. यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले,उपाध्यक्ष प्रताप शेळके,आमदार किरण लहामटे,आशुतोष काळे,लहु कानडे,मोनिकाताई राजळे,बबनराव पाचपुते,रोहित पवार, संग्राम जगताप,निलेश लंके या आमदारांसह जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी,मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील,विविध लोकप्रतिनिधी,अधिकारी व नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
रोहित पवार यांनी जलशिवार योजना तसेच चारा छावण्या व टॅंकर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरली. टॅंकर योजना सुरळीत असती तर मला माझ्या मतदारसंघात खाजगी टॅंकर कशाला लावावे लागले असते असा सवाल त्यांनी केला. जिल्हा परिषद अध्यक्षा घुले यांनी जिल्ह्यातील शाळा खोल्यांचे बांधकाम व खोल्या दुरूस्त्या याकडे लक्ष वेधले. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना एक हजार खोल्यांची कमतरता असल्याचे निर्दशनास आणून दिले असता या खोल्यांचे काम पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली.
यासाठी नियोजन समिती,साई संस्थान व लोकप्रतिनिधींचा 20 टक्के निधी खर्च केला जाणार आहे. आपापल्या मतदारसंघातील रस्त्यांचे प्रश्न व विजेचे प्रश्न या बैठकीत लोकप्रतिनिधीनींनी मोठ्या प्रमाणात मांडले. जिल्ह्यातील श्री सुद्रिकेश्वर महाराज देवस्थान,पारगाव सुद्रीक,ता.श्रीगोंदा,श्री गणेश मंदीर ट्रस्ट,पोहेगाव,ता.कोपरगाव,श्रीराम देवस्थान,कौठा ता.श्रीगोंदा या स्थळांना ग्रामीण क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून जिल्हा नियोजन समितीत मान्यता देण्यात आली.