नगर – जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत 478 क्षयरुग्ण आणि 156 नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले. या रुग्णांना आरोग्य विभागाने तातडीने औषधोपचार सुरू केले आहेत. जिल्ह्यात कुष्ठरुग्णांची संख्या वाढत असल्याचे या मोहिमेतून दिसून आले.
राज्यात ही मोहिम राबविण्यात आली होती. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. या मोहिमेत कुष्ठरुग्णांसह क्षयरोगाचेही रुग्ण शोधण्यात आले. नव्याने सापडलेल्या या रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार सुरू केले आहेत. तसेच या मोहिमेत 478 क्षयरुग्ण आढळून आले. देशात असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे.
“त्यामध्ये’ सरकारचे अपयश
-देशात 2020 पर्यंत कुष्ठरोगाचे निर्मुलन करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने केले होते. मात्र या आजाराचा नायनाट करता आलेला नाही. आजार आटोक्यात आहे मात्र कायमचा नष्ट झालेला नाही. आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात असले तरी आजार नाहीसा करणे सोपे नाही. त्यामुळे 2022 संपत आले तरी सुद्धा कुष्ठरोगाचे रुग्ण सापडतच आहेत.
लक्षणे माहिती करून घ्या..
-कुष्ठरोग हा अतिशय सौम्य प्रकारातील संसर्गजन्य आजार आहे. शरीरावर न खाजणारा न दुखणारा बधीर चट्टा, कान व चेहऱ्यावरील गाठी, बऱ्या न होणाऱ्या जखमा, हाता पायातील बधीरता, विकलांगता अशी काही या आजाराची लक्षणे आहेत.
.. तर कुष्ठरोगाची लक्षणे दिसतात
-कुष्ठरोग हा मायक्रो बॅक्टेरियम लेप्री या कुष्ठजंतूमुळे होतो. साधारणपणे आपल्याकडे 98 टक्के नागरिकांत कुष्ठरोगाशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती असल्याने कुष्ठरोग सहसा होत नाही. कुष्ठरोगाच्या जंतूंनी शरिरात प्रवेश केल्यानंतर शरिरातील रोग प्रतिकारकशक्ती कमी असेल तर मात्र तीन ते पाच वर्षांच्या काळानंतर शरिरावर कुठेही कुष्ठरोगाची लक्षणे दिसू शकतात. शंभर नवीन कुष्ठरुग्णांपैकी साधारण 10 ते 15 रुग्णांपासून दुसऱ्यास कुष्ठरोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. कुष्ठरोगासाठी विशिष्ट वयोगट नाही, हा आजार कुणालाही होऊ शकतो. देशात कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त आहे. या आजारावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. उपचार झाले नाहीत किंवा उशिराने उपचार केल्यास रुग्णांमध्ये कायमस्वरूपी विकृती येण्याचा धोका असतो.